व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या होवू घातलेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात एकत्रितपणे लढण्याची घोषणा करणा-या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी एकमेकांची उणीदुणी काढत अख्ख्या महाराष्ट्राला हिडीस राजकारणाचे दर्शन घडविले.
काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर आहे. या निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची रणनीती आखली आहे. नारायण राणे यांनी उमेदवारी दाखल केली तर भाजपचे त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे केवळ राणेंना विरोध करण्यासाठी म्हणून भिन्न विचारधारेच्या या पक्षांची अभद्र युती होवू घातली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी एकिकडे एकत्र येणारी ही मंडळी शनिवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. एकीकडे हे विधान परिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे एकमेकांवर चौफेर हल्ला करतात हे पाहिल्यावर महाराष्ट्रातील राजकीय पातळी कमालीची घसरल्याचे पहायला मिळते. त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवरही टीकास्त्र सोडले. तर उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्तेतील मोठा भाऊ भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका करून आपल्या संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले आहे.
शिवसेनेचा पाय ‘फेव्हीकॉल’सारखा सत्तेला चिकटलेला- शरद पवार
शेतक-यांच्या हिताचा विचार होत नसेल तर आम्ही सत्तेवर लाथ मारु, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले होते. त्याचा संदर्भ देत पवारांनी उध्दव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. तीन वर्षात शेतक-यांच्या हिताचा काहीच विचार झाला नाही. तरीही शिवसेनेचा पाय ‘फेव्हीकॉल’सारखा सत्तेत चिकटलेला असून तो बाहेरच निघत नाही, अशी टीका पवारांनी केली. उद्धव ठाकरे सत्तेत असूनही सरकार विरोधात बोलतात. सत्तेच जायचे आणि सत्तेला लाथा घालायच्या, हे आपण यापूर्वी पाहिले नाही. सत्तेत जावून, सत्तेचा पूर्ण लाभ घेत सत्तेच्या नावाने शंख कसा करायचा, याची एक नवी दिशा शिवसेनेने दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला पाहिजे, असा टोलाही पवारांनी मारला. शेतक-यांचे हित होत नाही हे जगजाहीर असताना उध्दव ठाकरे कशासाठी सत्तेत आहेत? आमच्या मित्रांचे चिरंजीव आहेत त्यामुळे मी फार काय बोलत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे मोठा विनोद…
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना पूर्ण करता आले नाही. ते स्वप्न आमचे सरकार पूर्ण करीत आहे, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थावर केल्याचे समजल्यानंतर पवार यांनी त्यांचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री ज्या विचारधारेत वाढले आणि काम करीत आहेत, त्या विचारधारेचा यशवंतराव चव्हाणांना कधी स्पर्शही झाला नाही, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
१५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी कर्जमाफीची रक्कम जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. त्याबद्दल विचारले असता, यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांनी असेच विधान केले होते. मात्र,कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना झालेला नाही. त्यांचे विधान म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात, असल्याची टीकाही पवार यांनी केली.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडताच राष्ट्रवादी भाजपसोबत नांदायला जाईल : उद्धव ठाकरे
शरद पवार म्हणतात सत्तेत नांदता येत नसेल तर वेगळे व्हा, आम्ही वेगळे होताच हे भाजपासोबत नांदायला जातील, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. मला माझ्या हक्काचे मंत्रिमंडळ हवे आहे. आता रडायचे नाही लढायचे. तुमची तयारी असेल, मी तुमच्यासोबत आहे, असे उद्धव म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्ट्रातील व्यापारी हे का करू शकत नाहीत?, तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करत तुमची सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही देतानाच भाजपविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठाकरे यांनी दर्शविली.
नवसाचे पोर उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे?
सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे? असा भाजपला टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या असा सवालही ठाकरे यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही हल्लाबोल केला. मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करून भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला चढविला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002