व्हीएस न्यूज - उत्तरांना प्रश्न करणारे राहुल गांधी आता कमीत कमी प्रश्न विचारायला शिकले, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे. जी व्यक्ती आजपर्यंत उत्तरांना प्रश्न विचारायची, ती व्यक्ती कमीतकमी प्रश्न विचारायला शिकली, अशा शब्दांमध्ये इराणी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. याबद्दल स्मृती इराणी यांना विचारण्यात आले असता, त्यांनी राहुल गांधी यांना चिमटा काढला. आज राहुल गांधींनी खासगी वीज कंपन्या आणि महागडे वीज दर यावरून मोदींना लक्ष्य केले. सरकारी वीज निर्मिती प्रकल्पांमधील निर्मिती कमी करुन ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरले?, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
जनतेच्या पैशांची मोदींनी लूट का केली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २००२-१६ या काळात ६२ हजार ५४९ कोटी रुपयांची वीज खरेदी करून ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरण्यात आले? सरकारकडून केली जाणारी वीज निर्मिती क्षमता ६२ टक्क्य़ांनी कमी करुन ३ रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज खासगी कंपन्यांकडून २४ रुपये दराने का खरेदी करण्यात आली?, असे प्रश्न राहुल गांधींनी ट्विटरवरून विचारले आहेत. जनतेच्या कमाईची लूट का करण्यात आली? असा सवालदेखील राहुल गांधींनी या ट्विटमधून उपस्थित केला.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, २२ वर्षाचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या, असे ट्विट करून राहुल गांधींकडून दररोज मोदींना प्रश्न विचारले जात आहेत. काल (गुरुवारी) राहुल गांधींनी मोदींच्या जाहिरातबाजीमुळे गुजरातवर कर्जाचा डोंगर असल्याची टीका केली होती. मोदींच्या जाहिरातबाजीचा आर्थिक भार जनतेने का वाहायचा, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता.
‘१९९५ मध्ये गुजरातवर ९ हजार १८३ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१७ मध्ये कर्जाचा हा आकडा २ लाख ४१ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीवर ३७ हजार रुपयांचे कर्ज आहे, अशी आकडेवारी राहुल यांनी ट्विटमध्ये दिली होती. तुमच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाची आणि जाहिरातबाजीची शिक्षा जनतेने का भोगायची?, असा सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002