व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता लोकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ महिला नाहीशा होण्यामागे महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे ही बाब चिंताजनक आहे.
विशेष बाब म्हणजे बेपत्ता घटनांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातून ९४ हजार ९१९ लोक नाहीसे झाले आहेत. पश्चिम बंगालपाठोपाठ पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातून ४९ हजार ३३८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. देशभरातून गेल्या वर्षभरात ५ लाख ४९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २ लाख २९ हजार ३८१ नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले असून, अजूनही ३ लाख १९ हजार नागरिकांची नोंद बेपत्ता नागरिकांच्या यादीत आहेत. यामध्ये १ लाख ७४ हजार ८१६ महिला आहेत.
हेतूपूर्वक अत्याचारातही आघाडी…
हेतूपूर्वक करण्यात आलेल्या महिलांवरील हल्ल्यांमध्येही महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. राज्यात तब्बल ११ हजार ३९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आहे. या गुन्ह्यांच्या बरोबरीने ६४ हजार ५१९ जणींचे अपहरण झाल्याची नोंद आहे. अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये दुस-या, तर बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर आहे. अशामध्ये राज्यातून ६ हजार १७० स्त्रियांचे अपहरण करण्यात आले आहे. तर ४१८९ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमधून ५३ हजार ६५४ महिला बेपत्ता आहेत. पश्चिम बंगालमधून अनेकदा नोकरीच्या बहाण्याने महिलांना मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये वेश्याव्यवसायात अडकविले जात असल्यामुळे त्यांचे नाहीसे होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी परिस्थिती असताना पश्चिम बंगालपाठोपाठ राज्यातूनही महिला नाहीशा होण्याचे प्रमाण सर्वाधिक असणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.
काही महिला प्रेमभंग, पूर्ववैमनस्य, ऑनर किलिंग, एकतर्फी प्रेमाच्या शिकार ठरतात. यामध्ये अनेकदा त्यांची हत्या करण्यात येते. मात्र मृतदेह सापडत नाहीत. काही जणी स्वत:हून पळून जातात, भवितव्य घडविण्यासाठी, नोकरीच्या शोधात अनेक जणी घर सोडतात. अशा विविध बाबी महिला बेपत्ता होण्यामागे असतात.
– प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002