व्हीएस न्यूज - देशातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सैनिक ज्या सीमांवर काम करतात तेथील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशात जितके सैनिक सीमेवर लढतात, अतिरेक्याशी झुंजताना बळी जात नाहीत,त्याच्यापेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-या सैनिकांची संख्याची जास्त आहे, असे वास्तव एका पाहणीत समोर आले आहे.
जवानांच्या बळी जाण्याबाबत केलेल्या एका पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी सैनिकांची भरती केली जाते.
वेळप्रसंगी हे जवान आपल्या प्राणाची बाजी लावून शत्रू राष्ट्रांशी लढतात. त्यात अनेकदा त्यांना वीरमरण येते. अनेकजण अतिरेक्यांशी लढताना शहीद होतात; परंतु असे शौर्य गाजविताना शहीद झालेल्या सैनिकांपेक्षा रस्ते अपघातात बळी जाणा-या सैनिकांची संख्या जास्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. एका वृत्तसमूहाने केलेल्या पाहणीनुसार दरवर्षी ३५० सैनिक रस्ते अपघातात बळी जातात. प्रशिक्षणा दरम्यान होणा-या अवघड कसरती करतानाही काही सैनिकांना जीव गमवावा लागतो. तर वर्षाला सुमारे १२० सैनिक आत्महत्येसारखे पाऊल उचलतात, अशी माहिती या पाहणीतून समोर आली आहे.
या पाहणीत सैनिकांच्या आरोग्यांच्या प्रश्नावरही प्रकाश टाकण्यात आला असून याबाबत सरकारने अधिक सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, असेही ही आकडेवारी सांगते. आत्महत्या करणा-यांचे प्रमाणही आपल्या देशात सर्वाधिक आहे. देशाला शिस्तीचे महत्त्व सांगणारे जवानही अशा गोष्टींना बळी पडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे, असा निष्कर्ष या पाहणीत नोंदविला आहे.
बीड येथे जवानाच्या गाडीला अपघात…
बीड-परळी महामार्गावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या गाडीला अपघात झाला आहे. शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला जाताना हा अपघात घडला असून यामध्ये नऊ जवान जखमी झाले आहेत. चंडीगडमध्ये शहीद झालेले जवान मुरलीधर शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाची गाडी अहमदनगरहून परळीला निघाली होती. या गाडीत एकूण १५ जवान होते.
तेलगावजवळ रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. दिंद्रूडजवळ संगम फाटय़ावर असताना गाडीचे ब्रेक फेल झाले. अपघातात तीन जवान गंभीर जखमी झाले असून सहा जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002