व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या खासदार नाना पटोले यांनी अखेर शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपला हादरा बसला आहे.
खासदार नाना पाटोले यांनी शुक्रवारी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सोपवला. पटोले दुपारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडतील असे सांगितले जाते. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात जाणार, त्यांची भावी वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक… खासदार नाना पटोले हे गेल्या महिन्यांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. नरेंद्र मोदी व अमित शहांच्या कार्यशैलीविषयी भाजपत कुजबुज होती, मात्र नाना पटोले यांनी उघडपणे कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजप सरकार आंधळे आणि बहिरे आहे, असा आरोप करत त्यांनी रागही व्यक्त केला होता. यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात नाना पटोले सहभागी झाले होते. तर यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीदरम्यान शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यावरुनही पटोले भाजपवर बरसले होते.
विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तिथेही त्यांचे पक्षनेत्यांशी मतभेद होते. विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही त्यांना तात्काळ प्रवेश दिला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. यात भर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व पक्षात पटोलेंचे वजन कमी होत गेले. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, अशी चर्चा आता सुरु आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002