व्हिएस न्यूज - शिवसेनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा राज्य सरकारला असलेला पाठिंबा काढून घ्यावा. सेनेने पाठिंबा काढून टाकल्यानंतरही फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी आज विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना बापट म्हणाले, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेत असतात. आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाचे ‘ज्येष्ठ नेते’ आहेत. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या संदर्भात ते निर्णय जाहीर करू शकतात, अशा शब्दात त्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
गेल्या काही दिवसांपासून सेना व भाजपमध्ये सौहार्दाचे बंध राहिलेले नाही. सेना व भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असे विधान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच केले होते. शिवसेनेने पाठिंबा काढून टाकला तरी राज्य सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने आतापर्यंत यशस्वीपणे ३ वर्षे पूर्ण केली आहेत. उर्वरित दोन वर्षाचा कालावधी फडणवीस सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.