१७ जिल्ह्यांतील रस्ते खड्डेमुक्त - चंद्रकांत पाटील
नागपूर
2017-12-16
व्हिएस न्यूज – शुक्रवापर्यंत राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांत आपण रस्त्यावरून प्रवास केला. यादरम्यान, केलेल्या पाहणीत २२ हजार ७९५ किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. तसेच १७ जिल्ह्यांतील रस्ते १०० टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत शुक्रवारी संपली. परंतु राज्यातील बहुतांशी रस्त्यांची स्थिती मात्र जैसे थे असल्याची टीका होत आहे. आता रस्त्यांवर खड्डे दिसले तर चंद्रकांत पाटील खड्डय़ामागे १ हजार रुपये देणार का, असाही प्रश्न विचारला जात असताना त्यांनी नागपूरमध्ये शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी ३० ऑक्टोबर रोजी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली होती. १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा पाटील यांनी केला होता. रस्त्यांच्या दुरुस्तीची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील एकूण २२ हजार ७९५ किमी रस्त्याचे खड्डे भरले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण होईल. राज्यातील एकूण २३ हजार ३८१ किमी लांबी रस्त्यावरील २२ हजार ७३६ रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले.
मी कधी हेलिकॉप्टरमधून प्रवास केला? हे सुप्रिया ताईंनी दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. तसेच, त्या जेव्हा मला यवतमाळला भेटल्या होत्या, तेव्हा माझ्या कामावर समाधान व्यक्त केले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय, जर काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी सांगावे. जिथे खड्डा आहे असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन आणि खड्डा भरून देईन, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.