व्हीएस न्यूज - माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांना राज्य सरकारमध्ये सामावून घेतले जाईल. त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राणे यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा आहे. राज्य सरकारसाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. अशी नेतेमंडळी सरकारची ताकद असतात, असे फडणवीस यांनी सांगितले. एकनाथ खडसे प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन शक्यच नाही. कारण, पुनर्वसन विस्थापितांचे होते, असे सांगून फडणवीस यांनी खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली.
गुजरात निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुजरातच्या निवडणूकीपूर्वी राज्यात वेगळे वातावरण तयार करण्यात आले होते, मात्र गुजरातच्या निकालामुळे राज्यात आम्ही अजून स्थिर झालो आहोत, असा दावा फडणवीस यांनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ४९.४ टक्के मते मिळाली. २२ वर्षानंतरही गुजरातमधील ५० टक्के जनतेने भाजपवर विश्वास दाखविला आहे. देशाच्या राजकारणात विधानसभेत ५० टक्के मते मिळवणारी सरकारे फार कमी आहेत. त्यामुळे हा विजय अभूतपूर्व आहे. मात्र ‘नोटा’मध्ये वाढ होणे दुर्दैवी आहे. सर्व पक्षांनी याचा विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
राज्यात आम्हाला कधीही विजय न मिळालेल्या ठिकाणी विजय मिळत आहेत. आमचे सर्वाधिक सरपंच आहेत, असा दावा फडणवीसांनी केला. इतर सर्व पक्ष विरोधात असताना अनेक ठिकाणी आमचा विजय होत आहे. तिन्ही पक्ष समोर असताना विजय झाला. म्हणजे भाजप हा पक्ष मजबूत होत आहे. प्रत्येक निवडणुकीत सातत्याने महाराष्ट्रात भाजप पहिल्या नंबरचा पक्ष ठरल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेताना वर्धा येथील सभा वगळता राष्ट्रवादीच्या सभांना केवळ ३०० लोकांचीच गर्दी जमत होती, असे सांगितले. नागपूरातील संयुक्त मोर्चाला दोन्ही काँग्रेसने मोठी ताकद लावून सरकार विरोधी चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा मोर्चा पूर्णत: फसला, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात येवू घातलेल्या पेट्रोलियम कंपन्यांची रिफायनरी आणण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले. ही ग्रीन रिफायनरी असल्याने यातून प्रदूषण होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002