व्हीएस न्यूज – मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून सरकारदरबारी अडचणी घेऊन येणाऱ्या एका तरुणाने नैराश्यातून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची मंत्रालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मंत्रालय परिसरात गेल्या काही दिवसांत तीन वेळा आत्महत्येचे प्रयत्न झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या इमारतीच्या लॉबीबाहेर नायलॉनच्या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी ४३ वर्षीय हर्षल रावते या चेंबूरच्या तरुणाने उडी घेतली होती, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर, अहमदनगरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय अविनाश शेटे या तरुणाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनीही मंत्रालय परिसरात विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा आयसीयूत उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात वारंवार खेटे घालूनही काम होत नसल्याने धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते.
व्हीएस न्यूज - नवरा मारहाण करतो, अशी तक्रार करणाऱ्या महिलांना तुम्हीही काठी घेऊन त्यांना मारहाण करा, असा सल्ला मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दिला आहे.
ग्वालियर जवळील अड़ूपुरा येथे सोमवारी आनंदीबेन यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मालती नावाच्या अंगणवाडी कार्यकर्तीने राज्यपालांकडे कैफियत मांडली. त्यांच्या गावात पुरुषांमध्ये दारू पिण्याचे प्रचलन असून तिचा पतीही दारू पितो. तिने मनाई केली तर मारहाण करतो, अशी तक्रार तिने केली. त्यावर गुजरातच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या आनंदीबेन यांनी “तुम्हीही काठी घेऊन त्यांना बदडून काढा,” असे मालती हिला सांगितले. तसेच व्यसनमुक्तीसाठी तुम्ही आंदोलन सुरू करा, असा सल्लाही त्यांनी या कार्यकर्त्यांना दिला.
आमच्या गावात दारूचे दुकान असून सर्व महिलांचा त्याला विरोध आहे. मात्र हे दुकान वजनदार लोकांचे असल्यामुळे त्या काही करू शकत नाहीत. या दारू दुकानाचा मालक गावातील लोकांना उधारीवर दारू पाजतो आणि घरी येऊन पैशासाठी गोंधळ घालतो, असे आम्ही राज्यपालांना सांगितल्याचे मालतीने ‘नईदुनिया’ वृत्तपत्राला सांगितले.
व्हीएस न्यूज – सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सोमवारी महिला बचत गटांच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन ‘दक्खन’ जत्रेत भरवण्यात आले. या जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना कर्ज दिले की त्या शंभर टक्के कर्जाची परतफेड करतात, पण पुरुष मंडळींना कर्ज दिल्यावर बहुतेक पुरुष कर्जाची परतफेड करण्याऐवजी पार्टी, कोंबड्या, बकऱ्यांमध्ये अडकतात, असा मिश्किल टोला लगावला.
दरम्यान पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बचत गटांसाठी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जात असल्याचे सांगितले. शिवाय दिलेले कर्जही त्या वेळेत परतफेड करतात असेही पंकजा यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी हाच धागा पकडत पुरुष मंडळींनी घेतलेल्या कर्जावर मार्मिक टोलेबाजी केली. यावेळी माझ्या इशाऱ्यावर जाऊ नका, असे मिश्किल उत्तर मुख्यंमत्र्यांनी देताच एकच हास्यकल्लोळ उडाला.
व्हीएस न्यूज – जिजाऊंचा ब्रिटिश लेखक जेम्स लेनने केलेला अपमान ही इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंचीच फूस असल्यामुळे आमचा शिवप्रेमींना खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला विरोध असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
आम्ही बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार मानतच नाही असे सांगताना ही शिवसृष्टी देशभरातील इतिहास संशोधकांची समिती नेमून साकारावी अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. आम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रीही दैवतासमान आहेत. पुरंदरे यांनी त्या माऊलीची बदनामी केली. राज्य सरकारने त्याच पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण देऊन सन्मान केला. महाराजांचा आणि माऊलींचा हा अपमानच असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले.
पुरंदरेंच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला सरकारने ३०० कोटी देऊन त्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे. ते या शिवसृष्टीच्या माध्यमातून खोटा इतिहास मांडून राजमातेची बदनामी करतील, अशी आम्हाला शंका असल्यामुळे पुरंदरे यांना शिवसृष्टीपासून सरकारने लांबच ठेवावे अशी आमची मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. सरकारने जर तमाम शिवप्रेमींच्या भावनांची कदर न करता पुरंदरेंचीच संकल्पना राबवली तर आम्ही ते सहन करणार नाही हे सांगतानाच शिवसुष्टीला विरोध करण्याची रणनीती आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.
व्हीएस न्यूज - शिवसेना पक्षात मोठे पद मानल्या जाणाऱ्या नेतेपदी ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आदित्य ठाकरे विराजमान झाले आहेतच पण त्यांचे काहीतरी गुफ्तगू सुरु असल्याचेही मीडियात चर्चिले जात आहे. आदित्य अंडी मिर्जीया चित्रपटाची हिरोईन सैयामी खेर या दोघांना बांद्रा येथील एका रेस्टोरंट मध्ये जात असताना मिडिया फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केले आहे. यावेळी आदित्य यांनी डोळ्यावर हात धरून फोटोग्राफर पासून बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही.
या दोघांमधील रिलेशन बद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. सैयामी जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री उषा किरण याची नात आहे व या दोन कुटुंबात दीर्घकाळ घरोबा आहे असे समजते. राकेश ओम प्रकाश याच्या मिर्झिया चित्रपटातून सैयामीने हर्षवर्धन कपूर याच्यासोबत बॉलीवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ती मराठी व हिंदी चित्रपटात दिसली होती. आदित्य यांचा जन्म १३ जून १९९० सालचा आहे. मुंबईत नाईट लाइफ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच त्यांना कविता आणि गाणी लिहिण्याचा छंद असून त्यांचा कविता संग्रह आणि गाण्याचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे. स्टाईल आयकॉन म्हणूनही त्यांची ओळख आहे. मॉडेलसारखे फोटो शूट करून त्यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहेत. बॉलीवूड मध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत मात्र त्यात सैयामी खास आहे असेही समजते.
व्हीएस न्यूज – गुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. दोषी ठरलेल्या नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व देखील करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर न्यायालयाने जर गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तर पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार कसे निवडू शकतात, असा प्रश्न विचारला आहे. तसेच निवडणूक आयोगाने गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस केली आहे.
अमित शर्मा यांनी न्यायालयात निवडणूक आयोगाच्या वतीने बाजू मांडली. अश्विनी उपाध्याय यांच्या भूमिकेला निवडणूक आयोगाने पाठिंबा दर्शवला असून शर्मा म्हणाले, १९९८ पासून यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. पण निवडणूक आयोगाकडे दोषी व्यक्तींना पक्षाचे नेतृत्व करण्यापासून रोखण्याचे अधिकार नाही. संसदेने यासाठी विद्यमान कायद्यांध्ये सुधारणा करणे गरजेचे असून या कायद्याची अंमलबजावणी होईल याकडे निवडणूक आयोग लक्ष देईल, असे शर्मा यांनी सांगितले. आयोगाच्या वतीने न्यायालयात किमान पाच वर्षे शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे आरोप असलेल्या आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेल्या लोकांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी शिफारसही केंद्र सरकारला केली असल्याचे सांगण्यात आले.
न्यायालयाने जर एखाद्यावर निवडणूक लढवण्यास बंदी असेल तर तो पक्षाचे नेतृत्वही करु शकत नसल्याचे सांगितले. राजकीय पक्षाची स्थापना करुन दोषी ठरलेली व्यक्ती पक्षाचे नेतृत्व करु शकते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. गंभीर गुन्ह्यांमध्ये लालूप्रसाद यादव, ओ पी चौटाला आणि शशिकला हे दोषी ठरले असले तरी त्यांच्या राजकीय पक्षातील मोठे पद अजूनही कायम आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयाने यावर चिंता व्यक्त केली.
व्हीएस न्यूज – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये अव्वल स्थानी असून सर्वात गरीब मुख्यमंत्री त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे ठरले आहेत. फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. तर सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.
असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सर्वात गरीब मुख्यमंत्री त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे ठरले आहेत. फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती माणिक सरकार यांच्याकडे आहे. तर ३० लाख रुपयांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आणि ५५ लाख रुपयांची संपत्ती जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती देशातील १९ टक्के मुख्यमंत्र्यांची आहे. तर १ कोटी ते १० कोटी रुपयांदरम्यान ५५ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती आहे. सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे असून १७७ कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे १२९ कोटी रुपयांची तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर ४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे एडीआरच्या पाहणीतून समोर आले आहे.
सर्वाधिक गुन्हे (२२) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल आहेत. यात तीन गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहेत, तर ११ गुन्हे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर दाखल आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. ३१ पैकी २० मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असून आठ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६ टक्के मुख्यमंत्री हे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी.के. चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे.
व्हीएस न्यूज - हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम ही नावे मराठी रसिकांना काही नवीन नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या विनोदी बादशहांना एकत्र आणत ‘सायकल’ या चित्रपटाचा प्रवास केला असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. लहान मुलगी हृषिकेषला सायकलची गोष्ट सांगण्याचा हट्ट या टीझरमध्ये करते. मग हृषिकेषचा सायकलची गोष्ट सांगण्याचा प्रवास सुरू होतो. भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव हे प्रवासीही सायकलच्या या प्रवासात दिसतात.
प्रकाश कुंटे यांनी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘& जरा हटके’, ‘हंपी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘& जरा हटके’ या चित्रपटातून कुंटे यांनी एक प्रगल्भ प्रेमकथा मांडली होती. या चित्रपटांनंतर प्रकाश आता ‘सायकल’ हा चित्रपटा घेऊन येत आहेत. हा टीझर पाहता चित्रपटाही आश्वासक वाटत आहे.
व्हीएस न्यूज – राज्याच्या शिक्षण विभागाने पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि द्रष्टे समाजसुधारक महात्मा फुले यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्राला अधिक झुकते माप दिले असून ३ लाख रुपये गांधी यांच्या पुस्तकांसाठी, २४ लाख रुपये आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी तर तब्बल ५९ लाख रुपये मोदी यांच्या पुस्तकासाठी खर्च करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे सरकारी पुस्तक खरेदीतील दुजाभावामुळे पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत.
एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत पुस्तक खरेदी केली जाते. नुकतीच त्यासंबंधीची ई-निविदा मंजूर करण्यात आली आहे. या निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या ३५ रुपयांप्रमाणे ७२ हजार ९३३ मराठी प्रती घेण्यात आल्या आहेत. त्यासोबतच ३३ गुजराती, ४२५ हिंदी आणि ७ हजार १४८ इंग्रजी भाषेतील मोदी यांच्यावरील प्रतींचा समावेश आहे. डायमंड पॉकेट बुक्स यांच्याकडून ही सर्व पुस्तके घेण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावरील ६९ हजार ४१६ मराठी भाषेतील प्रतींची खरेदी दि विलास बुक एजन्सीकडून करण्यात आली आहे. एकूण ५९ लाख ४२ हजार इतकी रक्कम केवळ नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावर खर्ची पडली आहे.
विभागाने महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी अवघे ३ लाख २५ हजार खर्च केले. त्यामध्ये सम्राट प्रकाशनाच्या २ हजार ६७५ प्रतींचा समावेश आहे. तसेच गुजराती निशिगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गांधी चरित्राच्या ७ हजार २६० प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. गांधी यांच्याप्रमाणेच संविधानाचे कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक खरेदीवर अशीच अल्प रक्कम दिली आहे. बाबासाहेबांच्या चरित्राच्या ७८ हजार ३३८ प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यावर २४ लाख २८ हजार रुपये खर्ची पडले आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी आणि बहुजनांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावरील पुस्तक खरेदीला अशीच अल्प रक्कम दिली आहे.
व्हीएस न्यूज - मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्याने अवकाळी पाऊस किंवा गारपिटीच्या समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला असून भाजपचे नेते रमेश सक्सेना यांनी जर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करायचा असेल, तर हनुमान चालिसा हाच एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे.
पुढे रमेश सक्सेना म्हणाले, रोज एक तास सर्व गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट किंवा कोणतेही नैसर्गिक संकट येणार नाही, असा माझा दावा आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे कृषिराज्य मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनीही भाजप नेत्याच्या या अजब सल्ल्याचे समर्थन केले आहे. कृषिराज्य मंत्री म्हणाले, माणूस नैसर्गिक आपत्तींना जबाबदार नाही. हनुमान चालिसा वाचायलाच हवी. कारण हनुमान संकटमोचक असल्यामुळे सक्सेना यांनी काही चुकीचे म्हटले नाही. काँग्रेस प्रवक्त्यानेही भाजप नेते आणि कृषिराज्य मंत्री या दोघांच्या अजब सल्ल्यावर अजब विधान केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, रमेश सक्सेना भाजपचे धडाकेबाज नेते असून देवांमध्येच त्यांच्या सल्ल्यामुळे आपापसात वाद होईल. सक्सेना म्हणतात कि, हनुमान चालिसा वाचावी, मात्र मध्य प्रदेशात तर शिव शंकराची उपासना केली जाते. त्यामुळे त्यांचे विधान चूकीचे आहे.
व्हीएस न्यूज - गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां’ची अखेर घोषणा करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येते. पण हे पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. यंदाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली.
२०१४-१५ साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, २०१५-१६ साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि २०१६-१७ साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनाही जाहीर करण्यात आला आहे. साहसी क्रीडा प्रकारासाठी नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना पुरस्कार जाहीर झाला. २०१४-१५साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नुकतेच सात महासागर पोहून पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे. एकूण ७७६ अर्ज पुरस्कारांसाठी आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने १९५ पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियाला होणार आहे.
व्हीएस न्यूज - न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारा पृथ्वी शॉ सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक सामन्यांमध्ये घातलेला धावांचा रतीब आणि विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करुन मिळवलेलं विजेतेपद यामुळे आयपीएलमध्ये पृथ्वीवर चांगल्या रकमेची बोली लागली आहे. पण या सर्व गोष्टींनंतर पृथ्वी भारताच्या सिनिअर संघाकडून खेळण्यासाठी तयार आहे. खुद्द पृथ्वीनेच याची कबुली दिली आहे. भारताच्या सिनिअर संघात मिळणाऱ्या संधीबद्दल विचारलं असता पृथ्वी म्हणाला, “हो, आता मला संघात जागा मिळण्यास काहीच हरकत नाही. फक्त यासाठी मला कामगिरीत सातत्य राखून सतत धावा काढणं गरजेचं आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केल्यासं मलाही सिनिअर संघात लवकरच जागा मिळेलं.”
मुंबईकडून रणजी क्रिकेट आणि दुलीप करंडकात पृथ्वीने केलेली कामगिरी पाहून १९ वर्षाखालील विश्वचषकासाठी संघाचं नेतृत्व पृथ्वीला देण्यात आलं. यानंतर मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्यानंतर भारताला विश्वचषक मिळवून देणारा पृथ्वी भारताचा चौथा कर्णधार ठरला आहे.
भारतीय सिनिअर संघाच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनीही पृथ्वीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “निवड समिती पृथ्वी आणि त्याच्या संघातील इतर सदस्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. सिनिअर संघाकडून आणि भारत अ संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला योग्य वेळी संघात जागा मिळेलं”, असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे. सध्या पृथ्वी शॉ विजय हजारे चषकात मुंबईकडून खेळतो आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002