व्हीएस न्यूज - सोशल मीडियावरील आपल्या विधानांमुळे महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा अनेकदा चर्चेत असतात. आयुष्य सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे जगावे, हे सांगण्यासाठी त्यांनी मध्यंतरी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आनंद महिंद्रा त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नुकताच एक व्हिडिओ शेअर ट्विटरवरील काही युजर्सनी केला होता. हा व्हिडिओ मंगलोरमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या महिलेचा असून या महिलेने महिंद्राच्या बोलेरो गाडीत फुड सेंटर उभारले आहे. सोशल मीडियावर या अनोख्या फूड सेंटरचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत होता. ही गोष्ट ट्विटरवरील काही युजर्सनी आनंद महिंद्रा यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि ते यामुळे खूपच प्रभावित झाले. या महिलेला व्यवसायात मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. या महिलेला मदतीची गरज नसली तरी आपण तिच्या व्यवसायात गुंतणवूक करू. जेणेकरून व्यवसाय वाढायला मदत होईल. साहजिकच महिलेसाठी आनंद महिंद्रांचा हा प्रस्ताव स्वप्नवत होता. तर दुसरीकडे अनेक युजर्सनी आनंद महिंद्रा यांनी दाखवलेल्या मोठेपणाचे कौतुक केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगलोरमधील शिल्पा यांचा हा व्हिडिओ असून महिंद्राच्या बोलेरो गाडीचे रुपांतर त्यांनी फूड सेंटरमध्ये केले आहे. कानडी पद्धतीचे खाद्यपदार्थ याठिकाणी त्या विकतात. त्यांचे हे फूड सेंटर उत्तम चवीमुळे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. या फूड सेंटरचा व्हिडिओ येथील काही ग्राहकांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
व्हीएस न्यूज – सोमवारी रात्री दोन तासामध्ये हरियाणाच्या पलवलमधील वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याची घटना उघड झाली असून या सहाही हत्या एकाचा पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पलवलमध्ये सध्या एकाच वेळी सहा हत्येच्या या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे.
शहर पोलीस ठाण्यापासून १०० मीटरच्या अंतरावर सगळ्या हत्या झाल्या आहेत. या सगळ्या हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे वृत्त आहे. या हत्या लोखंडी रॉडने डोक्यात घाव करून करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन तासात सहा हत्या करणाऱ्या या सायको किलरचा फोटो कैद झाला आहे. आरोपीचा शोध या फोटोच्या आधारे घेतला जातो आहे. त्या सायको किलरच्या हातात सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोखंडी रॉड स्पष्ट दिसतो आहे. सोमवारी रात्री झालेल्या या हत्याकांडानंतर शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - अरबी समुद्रात मोठा तेलसाठा ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) या कंपनीला सापडला असून सध्याच्या मुंबई हाय तेलक्षेत्रानजीक हा साठा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
त्यांनी या साठय़ाची माहिती लोकसभेमध्ये प्रश्नोत्तर तासात एका लेखी उत्तरात दिली. तो साठा मुंबई हायच्या पश्चिमेला स्थित असून त्यातून पूर्ण क्षमतेने उपसा केल्यास देशाच्या तेल उत्पादनात वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. याच क्षेत्रात आणखी नऊ ठिकाणी खोदकाम चालू असून तेथेही कच्चे इंधन तेल आणि नैसर्गिक वायू सापडेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्या आधारावर उत्खनन सुरू आहे.
साधारणतः ३ कोटी टन तेल नवीन सापडलेल्या साठय़ात मिळू शकेल. तसेच तेवढय़ाच प्रमाणात नैसर्गिक वायूही मिळेल, असे त्यांच्या उत्तरात म्हटले आहे. सध्या मुंबई हायमधून दिवसाला २ लाख ५ हजार बॅरल तेल उपसण्यात येत आहे. नव्या साठय़ामुळे त्यात आणखी २० हजार बॅरल्सची भर पडू शकेल. ओएनजीसीने २०१६-१७ या वर्षात २ कोटी ५५ लाख टन तेलाचे उत्पादन केले. ते २०१९-२० पर्यंत २ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोचू शकेल, असे कंपनीच्या अधिका-यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
व्हीएस न्यूज – स्टेट बँक ऑफ इंडियाने १ जानेवारीपासून बेस रेट ८.९५%वरून ८.६५% केला असून इतर सर्व बँकांपेक्षा हा दर कमी असल्यामुळे २० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा ईएमआय सुमारे ३८४ रुपयांनी कमी होणार आहे.
एमसीएलआर पद्धत एप्रिल २०१६ पासून सुरू होण्याआधी कर्जांवरील व्याज हे बेस रेटनेच ठरवले जात होते. बँकांच्या निधी उभारणीशी निगडित एमसीएलआरमध्ये बदल करण्यात आलेला नाही. एका वर्षाचा एमसीएलआर ७.९५% आहे. म्हणजे एप्रिल २०१६ नंतर कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय कमी होणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाने याआधी २८ सप्टेंबरला बेस रेट ०.०५% घटवला होता. बँकांनी व्याजदरात किंचित कपात केल्याने रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदवला होता. रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत रेपोदरात १.७५% कपात केली आहे. तुलनेत बँकांनी बेसरेटमध्ये सरासरी ०.६० टक्केच कपात केली आहे.
व्हीएस न्यूज - भाजपने काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांना दिलेले आश्वासन काही पूर्ण होताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना ३१ डिसेंबरपूर्वी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन वर्ष सुरु झाले तरी काहीही हालचाल होताना दिसत नसल्याने आश्वासन गाजर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळात ३१ डिसेंबर पूर्वी स्थान मिळाणार असल्याची माहिती दिली होती. पण ३१ डिसेंबरची मुदतही आता उलटून गेली आहे. त्यामुळे राणे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. राणे यांनी डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यात नागपूर येथे जाऊन यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी हा शब्द या भेटीत दिल्याचे राणे यांनी विशेष मुलाखतीत सांगितले होते. राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता होती. मात्र अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला.
भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही या पक्षाने घेतला. राणेंचा मंत्रीमंडळात समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच त्यांना दिले होते. राणेंचा मंत्रीमंडळात दिवाळीपूर्वी समावेश होईल, अशी तेव्हा चर्चा होती. पण तेव्हा राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ३१ डिसेंबरपूर्वीचा शब्द दिला होता. तो शब्दही पाळला न गेल्यानं भाजप राणेंना झुलवत ठेवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
व्हीएस न्यूज : भाजपला गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दुर करण्यात यश आले आहे. हा तात्पुरता अंतर्गत कलह भाजपने त्यांच्या मागण्या मंजूर करून सोडवला आहे. उर्जेचे खाते आणि अजून काही छोटीखानी खाती गुजरातचे उपमुख्यमंत्री यांना देण्यात आली होती. पण त्यांना अर्थ खाते हवे होते. गुजरातमध्ये अर्थ खाते सगळ्यात प्रतिष्ठेचे मानले जाते. सौरभ पटेल यांना हे खाते देण्यात आले होते. नितीन पटेल आपल्याला साजेसे खाते मिळाले नाही म्हणून नाराज होते. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. अमित शहांनी तुमच्या मागण्या मंजूर होतील असे आश्वासन त्यांना दिले होते. भाजपमध्ये यामुळे फूट पडू शकणार होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तेव्हा हस्तक्षेप केला. नितीन पटेल यांना अमित शहांच्या हस्तक्षेपानंतर हवे असलेले अर्थ खाते मिळाले. तसेच सौरभ पटेल यांच्याकडचे अजून एक खाते कमी झाले आहे.
व्हीएस न्यूज – आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चिमटा काढला असून खडसे यांनी नांदुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नवीन वर्षात बोंड अळीचा प्रादूर्भाव होवू नये, अशी आशा व्यक्त करताना केवळ अभ्यास करण्यातच आमचा वेळ जातो असा टोला लगावला आहे.
खडसे यांच्या हस्ते नांदुरा नगर पालिकेच्या ५५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पक्षश्रेष्ठींवर एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे ते पक्ष नेत्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाविषयी कार्यक्रमानंतर पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना छेडले असता, पक्ष प्रवेशाच्या केवळ चर्चा आहेत. आपले या चर्चांनी मनोरंजन होत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - गुरू-ता-गद्दी २००८ सालच्या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त गुरुद्वारा परिसरातील विविध कामे पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला बिनव्याजी स्वरूपात दिलेले ६१ कोटी रुपये माफ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.
शीख समाजाचे शेवटचे देहधारी गुरू श्री गुरू गोविंदसिंघजी यांच्या ३५० व्या जयंतीच्या समारोपाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरुद्वारा परिसरात पार पडला, या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा कुलवंतसिंघजी, बाबा बलिवदरसिंघजी, बाबा नरेंद्रसिंघजी, आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, गुरुव्दारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार तारासिंग, भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, संतुक हंबर्डे, प्रवीण साले आदींची उपस्थिती होती.
गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड शहरात कोटय़वधी रुपयांची कामे करण्यात आली. यातील महत्त्वाची कामे गुरुद्वारा परिसरातील होती. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला ६१ कोटी रुपये दिले होते. कालांतराने ही रक्कम परत करण्याची अट त्यावेळी घालण्यात आलेली होती. त्यानुसार सोहळा पार पडल्यानंतर शासनाच्या नियोजन व अर्थ विभागाकडून ६१ कोटी रुपये परत करण्याबाबत गुरुद्वारा बोर्डाला वारंवार कळविण्यात आले होते. त्याच वेळी शीख समाजाने ही रक्कम वसूल न करण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारने हा विषय २०१४ पर्यंत तसाच प्रलंबित ठेवला. विद्यमान सरकारच्या तीन वर्षांच्या काळातही तो प्रलंबितच होता. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ६१ कोटी रुपये माफ करण्याची घोषणा करून गुरुद्वारा बोर्ड व शीख समाजाला नववर्षांची अनुपम भेट दिली. मुळात गुरुजींकडून घ्यायचे असते. द्यायचे नसते असे सांगत जे ६१ कोटी रुपयांचे कर्ज आम्ही माफ केले, येणाऱ्या काळात गुरुजींच्या आशीर्वादाने राज्याच्या तिजोरीत ६१ हजार कोटी रुपये जमा होतील, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या कार्यातून भक्ती-शक्तीचा संगम निर्माण झाला. या प्रेरणेतून स्वाभिमानी समाज घडला आहे. त्याग, बलिदानाची परंपरा असलेल्या श्री हुजुरसाहिब गुरुव्दाराचे दर्शन घेऊन ऊर्जा प्राप्त होते, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
श्री गुरुगोवदसिंघजी यांचे ३५० वे जन्मशताब्दी वर्ष केंद्राने सोहळा म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. देशात उत्सव साजरे झाले. हा सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो, असे फडणवीस यांनी सांगितले. सोहळयाचे प्रास्ताविक आमदार तारासिंग यांनी केले.
गुरुव्दारा परिसरातील नशापानावर बंदी आणू
गुरुव्दारा परिसरात जो नशापान केला जातो, त्या लोकांचा निश्चित बंदोबस्त केला जाणार आहे, इतक्या मोठय़ा धार्मिक स्थळी होणारा नशापान खपवून घेतला जाणार नाही. पोलीस प्रशासन कारवाई करील, असे आश्वासन या वेळी फडणवीस यांनी दिले.
व्हीएस न्यूज - दक्षिण आफ्रिका दौरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सर्वात लक्षवेधी ठरणार आहे तो एबी डी’व्हिलियर्स. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि डी’व्हिलियर्स हे चांगले मित्र आहे. कारण आयपीएलमध्ये ते एकाच संघातून खेळतात. कोहलीला डी’व्हिलियर्सबद्दल आदर आहे. पण जेव्हा डी’व्हिलियर्स प्रतिस्पर्धी म्हणून समोर असेल तर तो सर्वप्रथम संघाच्या रडारवर असेल, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.
डी’व्हिलियर्सला जानेवारी २०१६ साली दुखापत झाली होती. त्यानंतर गेल्या २३ महिन्यांमध्ये तो फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. ‘बॉक्सिंग डे’ला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यामध्ये डी’व्हिलियर्स तब्बल दोन वर्षांनी खेळला होता. या सामन्यात संघाचे कर्णधारपदही त्याने भूषवले होते. ‘‘डी’व्हिलियर्स हा माझा चांगला मित्र आहे. तो एक चांगला फलंदाज आणि माणूसही आहे. त्याचा मी नेहमीच आदर करतो. पण मी भारताकडून खेळताना जेव्हा डी’व्हिलियर्स प्रतिस्पर्धी असतो तेव्हा त्याला झटपट कसे बाद करता येईल, याचाच मी विचार करत असतो,’’ असे कोहलीने सांगितले.
संघाला जिंकण्याची भूक अधिक
जर तुम्ही एक संघ म्हणून मैदानात उतरता तेव्हा प्रत्येक खेळाडूला विजयात हातभार लावायचा असतो. आपल्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळावा, अशी प्रत्येक खेळाडूची भावना असते. काही वेळा एखादा खेळाडू अशी काही अद्वितीय कामगिरी करतो की, त्याच्या एकटय़ाच्या जोरावरही संघ जिंकू शकतो, पण जेव्हा २-३ खेळाडू विजयात मोलाचे योगदान देतात तेदेखील महत्त्वाचे असते. सध्याच्या घडीला भारतीय संघात प्रत्येक खेळाडूला जिंकण्याची भूक अधिक आहे. प्रत्येक जण संधीच्या शोधात असून संघासाठी ही चांगली गोष्ट आहे, असे कोहली म्हणाला.
व्हीएस न्यूज - तिहेरी तलाकविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक इशरत जहाँ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तिहेरी तलाक हे अवैधानिक आणि मुस्लीम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावड़ा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भाजपाचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस सायंतन बसूंच्या हवाल्याने ‘एनडीटीव्ही’ने हे वृत्त दिले आहे. इशरत जहाँ हावडा येथील कार्यालयात येऊन भाजपात सहभागी झाल्याचे बसू यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी सन्मानित केले आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला. इशरत यांचा गौरव करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही बसू यांनी म्हटले.
व्हीएस न्यूज - मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्याला वारंवार धमकी दिल्यास राजकारणात प्रवेश करण्यास कचरणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज म्हणाले, राजकारणात उतरण्यात मला रस नाही. पण जर मला वारंवार धमकी दिली, जर कोणी माझ्यावर सातत्याने दबाव टाकू लागला, जर कोणी मला वारंवार राजकारणात उतरण्याचे आव्हान देऊ लागले तर मी निश्चित राजकारणात प्रवेश करेल. सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज यांनी केलेल्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. प्रकाश राज अशी वक्तव्ये करून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकमध्ये याचवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकी आधी ते काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
मोदीसरकारवर टीका करण्याची प्रकाश राज यांची ही पहिलीच वेळ नाही. मोदी सरकारवर टीका केल्यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणी त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची धमकी दिली होती. राष्ट्रवाद आणि हिंदुत्व सारखेच असल्याचे म्हटल्याने प्रकाश राज यांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना लक्ष्य केले होते. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा अनेकांचा गैरसमज आहे. इतर धर्मांचा आदर करणे, हा सेक्युलरिझमचा खरा अर्थ असल्याचे प्रकाश राज यांनी म्हटले होते. तुम्ही लोकप्रतिनिधी असूनही एखाद्याच्या पालकांविषयी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसे बोलू शकता, असा सवाल प्रकाश राज यांनी विचारला होता.
व्हीएस न्यूज - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. गतवर्षी दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी एकमेकांना संपवण्याची धमकी दिली होती. आता नवीन वर्षाच्या आरंभीच किम जाँगने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे. नवीन वर्षानिमित्त देशाला संबोधित करताना त्यांनी अमेरिकेच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची आपली क्षमता असल्याचे म्हटले. संपूर्ण अमेरिका आपल्या अण्वस्त्रांच्या आवाक्यात आहे, आणि या अण्वस्त्राचे बटन नेहमी माझ्या टेबलावर असते..ही धमकी नव्हे तर सत्य आहे, असेही ते म्हणाले.
किमच्या मते, अमेरिका आता उत्तर कोरियाविरोधात कधीच युद्ध पुकारणार नाही. आम्ही अमेरिकेच्या सर्वच भागांवर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता विकसित केली आहे. दरम्यान, त्यांनी दक्षिण कोरियाशी आपण चर्चेस तयार असल्याचेही म्हटले. चर्चेच्या माध्यमातून एकमेकांमधील तणाव दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाचे खेळाडू पाठवण्याबाबत किम म्हणाले की, दोन्ही कोरियाचे अधिकारी लवकरच एकमेकांना भेटतील आणि यावर विचार करतील. या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोरियन देशांना चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे. प्योंगयांग आणि सियाल यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत. उत्तर कोरियाच्या सुरक्षेला जेव्हा धोका असेल, असे जाणवेल तेव्हाच आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू असा इशारा देखील त्यांनी दिला.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002