व्हीएस न्यूज - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साहित्यातील मर्म कळत नसल्याची टीका केली आहे. तसेच साहित्यिकांविषयीची राज ठाकरेंची भूमिका चुकीची असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. तात्कालिक आणि तात्काळ नव्हे तर साहित्यिक साहित्यातून भूमिका मांडतात असे देशमुख म्हणाले.
तर फक्त राजकारण आणि निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांची भूमिका असते असे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा असून यावर राज्य सरकारचाही निषेध केला. महाराष्ट्र आणि मराठीसाठी आज महाराष्ट्रातील साहित्यिकांनी भूमिका घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगलीत भरलेल्या औदुंबर साहित्य संमेलनात केले होते.
व्हीएस न्यूज - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गुगल आणि ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी कोर्सेराने बुधवारी नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घोषणा केली. यातून माहिती तंत्रज्ञान आरंभिक रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
कुठलाही पूर्वानुभव नसलेल्या युवकांनाही केवळ आठ ते 12 महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात नोकरी मिळविणे या अभ्यासक्रमातून शक्य होणार आहे. या योजनेनुसार प्रशिक्षणार्थी आपली माहिती प्रमुख कंपन्यांना देऊ शकतील, यात बँक ऑफ अमेरिका, वालमॉर्ट, स्प्रिंट, जीई डिजिटल, पीएनसी बँक, इन्फोसिस व यूपीएमसी अशा कंपन्यांचा समावेश आहे.
सुपात्र आयटी तंत्रज्ञ शोधणे हे अनेक कंपन्यांसाठी आव्हान असते. आयटी समर्थित किंवा सहयोगी क्षेत्रात 1,50,000 रोजगार असून देशातील सर्वाधिक वेगाने वाढत्या रोजगार क्षेत्रात त्याचा समावेश आहे, असे गुगलचे अधिकारी बेन ब्रॉयड म्हणाले.
डिजिटल इंडिया अभियान आणि मोबाईल डेटाच्या उतरत्या किमती यांमुळे ऑनलाईन शिक्षणाचे क्षेत्राने वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
व्हीएस न्यूज - सुखोई विमानातून देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी भरारी घेतली. त्यांनी हवाई दलाच्या जोधपूर विमानतळाहून सुखोई-३० एमएके या विमानातून उड्डाण केले.
त्या सुखोईतून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी सुखोईतून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही भरारी घेतली होती. संरक्षण मंत्र्यांच्या उड्डाणाची जबाबदारी ३१ स्वार्डन लॉयन यांच्याकडे होती. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी आयएनएस विक्रमादित्यवर मिग-२९ या विमानातून उड्डाण केले होते.
एअरफोर्समध्ये सुखोई-३० एमएकेआय या विमानाला मानाचे स्थान आहे. २०२०पर्यंत भारताकडे अशी तब्बल २७० विमाने असतील. ही लढाऊ विमाने मिग-२१ आणि मिग २७ यांची जागा घेतील. निर्मला सीतारमण संरक्षण मंत्रीपद स्वीकारल्यापासून या जवानांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. भारत-पाकिस्तान सीमा, भारत-चीन सीमेवर त्यांनी हजेरी लावली होती. त्यांनी अरुणाचल सीमेवर हजेरी लावली होती, त्यावेळी चीन सैनिकांनीही त्यांना अभिवादन केले होते.
व्हीएस न्यूज – ब्राझीलचा विश्वचषक विजेत्या संघातील फुटबॉलपटू रोनाल्डिनोने अधिकृत निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ३७ वर्षीय रोनाल्डिनो हा आंतराष्ट्रीय फुटबॉलपासून दूर आहे.
त्याच्या निवृत्तीबाबत माहिती देताना रोनाल्डिनोचा बंधू आणि समन्वयक रॉबटरे अॅसिसने सांगितले की, यापुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉल रोनाल्डिनो खेळणार नाही. फुटबॉलसाठी निवृत्तीनंतर खूप काही करण्याची त्याची इच्छा आहे. रशियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर तो त्याची भूमिका स्पष्ट करेल. १९९९ ते २०१३ या कालावधीमध्ये रोनाल्डिनोने ९७ सामन्यांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ३३ गोल केले. त्याचा २००२च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघात समावेश होता. रोनाल्डिनोने त्या स्पर्धेत दोन गोल केले होते. २००३-०८ या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्लब कारकीर्द ग्रेमिओपासून सुरू करणाऱ्या रोनाल्डिनोने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले. याच काळामध्ये २००५मध्ये रोनाल्डिनोला प्रतिष्ठेच्या ‘बॅलन डी ऑर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
व्हीएस न्यूज - आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा आयसीसीने केली असून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा २०१७ मधील उत्कृष्ट वन डे क्रिकेटर म्हणून गौरव करण्यात आला.
‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार विराट कोहलीला जाहीर झाला. कोहलीने गेल्या वर्षभरात तब्बल ६ शतके ठोकली आहेत. त्याची सध्याची वन डेची सरासरी ५५.७४ ऐवढी आहे. ही कोणत्याही वन डे खेळाडूची सर्वोत्तम सरासरी आहे. दुसरीकडे टी-२०तील कामगिरीबद्दल टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला गौरवण्यात आले आहे.
आयसीसी टी-२० परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार चहलला जाहीर झाला. गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात चहलने २५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार स्मिथला जाहीर झाला. पाकिस्तानच्या हसन अलीने उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. हसन अलीने चॅम्पियन्स ट्रॉफीत १३ विकेट्स घेत, पाकिस्तानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. असोसिएट प्लेअर ऑफ द इयरचा मान अफगाणिस्तानच्या राशीद खानला मिळाला. तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा पाकिस्तानी संघ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच फॅन्स मुमेंट ऑफ द इयरचा पुरस्कार पाकिस्तानी संघाला जाहीर झाला.
व्हीएस न्यूज - ‘आधार’ हा बांधून ठेवणारा ‘इलेक्ट्रॉनिक पट्टा’ असल्याचे सांगताना, हा १२ आकडी क्रमांक बंद करून सरकार एखाद्या व्यक्तीचे नागरी अस्तित्वच नष्ट करू शकते, असा दावा एका ज्येष्ठ वकिलाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला. सरकारने हाती घेतलेला ‘आधार’ कार्यक्रम आणि तो अमलात आणण्यासाठी २०१६ साली केलेला कायदा यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने सुरू केलेल्या सुनावणीत हा युक्तिवाद करण्यात आला.
यावर, शाळांची व त्यात शिकणाऱ्या मुलांची संख्या किंवा एखाद्या कल्याणकारी योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांची संख्या जाणून घेण्याचा, तसेच आपण जो प्रचंड निधी खर्च करत आहोत त्याच्या खऱ्याखुऱ्या लाभार्थीची पडताळणी करण्याचा आपल्याला हक्क आहे असे सरकार म्हणू शकत नाही काय, असा प्रश्ना न्या. ए. के. सिक्री, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. अशोक भूषण यांचाही समावेश असलेल्या पीठाने विचारला. यासाठी आधार क्रमांक आवश्यक असून हा युक्तिवादही योग्य आहे, असे न्यायालय म्हणाले.
आपण कल्याणकारी योजनांवर कोटय़वधी रुपये खर्च करत असून, त्यांचे फायदे गरजूंपर्यंत पोहचतात की नाही हे तपासून पाहण्याची, तसेच या निधीची चोरी अथवा गळती थांबवण्याची गरज असल्याचे म्हणण्याचा सरकारला हक्क आहे किंवा नाही, असाही प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. याच वेळी, आधार कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करण्यात आल्यास या कायद्यापूर्वी गोळा केलेल्या माहितीचे (डेटा) काय होणार- तो नष्ट केला जाईल काय, अशी विचारणाही न्यायालयाने केली.
व्हीएस न्यूज - त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्रिपुरा येथे १८ फेब्रुवारी रोजी तर मेघालय व नागालँड येथे २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे ६ मार्च, १३ आणि १४ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. तिन्ही विधानसभांमध्ये प्रत्येकी ६० जागा आहेत. २०१३ मध्ये तिन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम ११ जानेवारी रोजीच जाहीर झाला होता. मात्र, यावेळी १५ जानेवारीनंतरही कार्यक्रम जाहीर होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला. शेवटी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तिन्ही राज्यांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारपासूनच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने पूर्वोत्तर राज्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. त्रिपुरामध्ये सीपीआय (एम) समोर भाजपचे आव्हान आहे. त्रिपुरात काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. भाजपने त्रिपुराकडेही लक्ष दिल्याने यंदा प्रथमच त्रिपुरात सीपीआय (एम) विरुद्ध भाजप अशी लढत रंगेल, असे दिसते. त्रिपुरामध्ये योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढली असून निवडणुकीच्या प्रचारात भाजपतर्फे योगी आदित्यनाथांना मैदानात उतरवले जाईल, अशी शक्यता आहे.
नागालँडमध्ये भाजपने नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) या पक्षाशी युती केली असून नागालँडमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. नागालँडमध्ये नितीशकुमारांचा जदयू पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. नागालँडमध्ये भाजपने केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना प्रभारी केले आहे. तर मेघालयमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. देशात फक्त पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असून यात मेघालयचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या चार आमदारांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
व्हीएस न्यूज - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. अहमदाबादमधील रूग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा आरोपांची राळ उठवली. दिल्लीतील ‘पॉलिटिकल बॉस’च्या इशाऱ्यावर गुजरात पोलीस माझ्याविरोधात मोठा कट रचत आहेत. या कटात गुन्हे शाखेचे सहआयुक्त जे के भट्ट यांचाही समावेश असून ज्याप्रमाणे संजय जोशी यांची बनावट सेक्स सीडी बनवण्यात आली. तशीच माझीही बनावट सीडी करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले प्रवीण तोगडिया-
‘गुजरातच्या क्राईम ब्रँचचे ‘कॉन्परन्सी ब्रँच’मध्ये रूपांतर झाले आहे. सहआयुक्त जे के भट्ट यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्स सार्वजनिक व्हावेत. ते दिल्लीतील ‘पॉलिटिकल बॉस’च्या इशाऱ्यावर काम करत आहेत. माझा दावा आहे की, नुकताच त्यांची अनेकवेळा पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली आहे. मी मित्र नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी क्राईम ब्रँचला कॉन्परन्सी ब्रँच बनवून त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये. रात्री दोन वाजता कोणत्याही व्यक्तीला उठवण्याचा कोणाला अधिकार आहे ? माझ्या माणसांना उठवून टॉर्चर करण्यात येत असून त्यांना माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.
व्हीएस न्यूज - काही दिवसांपूर्वी रिलायंस जिओने न्यू ईअर ऑफरच्या अंतर्गत आपल्या युजर्ससाठी १ जीबी प्लॅनची किंमत कमी केली होती. ५०-६० रुपयांनी याची किंमत कमी करण्यात आली होती. कंपनीने पुन्हा एकदा युजर्ससाठी एक जबरदस्त कॅशबॅक ऑफर आणली आहे. कंपनी यात ३९८ किंवा त्याच्याहुन जास्त किंमतीच्या रिचार्जवर ४०० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. ३०० रुपयांचा कॅशबॅक सिलेक्टेड डिजिटल वॉलेटवर दिला जात आहे.
५०-५० रुपयांचे ८ वाऊचर माय जिओ अॅप रिचार्ज करताच जिओ अॅपच्या माय वाऊचर सेक्शनमध्ये ट्रांसफर होतील. तुम्ही ज्याचा वापर ३९८ किंवा त्याहुन जास्त किंमतीच्या रिचार्जसाठी करू शकता. तुम्ही एका वेळी फक्त एकच वाऊचर वापरू शकता. जसजसे तुम्ही पुढे पुढे रिचार्ज करत जाल तसतसे तुम्हाला ५० रुपयांचा कॅशबॅक मिळत जाईल. ऑनलाईन रिचार्ज केल्यास १६ ते ३१ जानेवारीपर्यंत ही ऑफर तुम्हाला मिळेल. ३०० रुपयांचा कॅशबॅक अॅमेझॉन पे, फोन पे, फ्रिचार्ज आणि पेटीएमवर मिळत आहे.
व्हीएस न्यूज - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देशाच्या विविध भागात हिंदू यात्रेकरुंना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि अनुदान केंद्र सरकारने थांबवावे असे आव्हान केले आहे. हज अनुदान रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी हे वक्तव्य केले आहे.
एकीकडे हज यात्रेकरुंना दिल्या जाणाऱ्या २०० कोटींच्या अनुदानाचा मुद्दा भाजप आणि आरएसएस करत याला अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण म्हणत आहेत तर दुसरीकडे देशातील विविध राज्यातील धार्मिक कार्यक्रमांना आणि यात्रेकरुंना शेकडो कोटींचे अनुदान देत आहे, असे म्हणत ओवेसी यांनी सरकारला फटकारले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने हज अनुदान रद्द करण्याचे आदेश असताना नरेंद्र मोदी सरकारला या मुद्यावर वादंग निर्माण करण्याची गरज नसल्याचे ओवेसी म्हणाले. भाजप सरकार केंद्रात आणि ज्या राज्यांमध्ये आहे अशा ठिकाणी भाजप सरकार अनुदान रद्द करणार का असा सवालही ओवेसी यांनी सरकारला केला आहे.
हज अनुदान जर तुष्टीकरण असेल तर २०१४ मध्ये कुंभ मेळ्यासाठी १ हजार १५० कोटी, सिंहस्थ महाकुंभ मेळ्यासाठी मोदी सरकारने दिलेले १०० कोटी तर मध्य प्रदेश सरकारने खर्च केलेले ३ हजार ४०० कोटी रुपये तुष्टीकरण नाही का? असा सवालही ओवेसी यांनी आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.
उत्तर प्रदेशमध्ये देखील योगी सरकारने काशी, अयोध्या येथील आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी ८०० कोटींचे अनुदान दिले होते. दरम्यान, मानसरोवर यात्रेसाठी दिली जाणारी १ लाख ५ हजारांच्या अनुदानाला देखील ओवेसी यांनी आव्हान दिले आहे. कर्नाटक, राजस्थान,गुजरात, हरियाणा ही राज्ये देत असलेल्या विविध अनुदानाचे दाखले देत हे अनुदान म्हणजे तुष्टीकरण नाही का असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज – देशातील १६ मुलांची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून यातील चार मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये देशाच्या विविध भागांतून धाडसी कामगिरी करणाऱ्या मुलांचा समावेश आहे.
या मुलांची शौर्य पुरस्कारासाठी देशातील विविध राज्यातून निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, कर्नाटक, मिझोराम, मनिपूर, नागालँडसह अन्य राज्यांचा समावेश आहे. भारत पुरस्कार, संजय चोपडा पुरस्कार, गीता चोप्रा पुरस्कार, बापू गायधनी पुरस्कार आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार अशा पाच श्रेणींमध्ये हे पुरस्कर्ते वर्गीकृत करण्यात आले आहेत.
प्रत्येक प्रजासत्ताक दिन भारतीय बाल कल्याण परिषद (ICCW) च्या वतीने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. आयसीसीडब्ल्यूच्या सदस्यांच्या तपशीलवार चर्चेनंतर आणि मुलांच्या प्रकरणांची काळजीपूर्वक छाननी केल्यानंतर ही नावे निवडली जातात.
व्हीएस न्यूज - पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी तोंडसुख घेतले आहे. देवेंद्रच्या नव्हे, तर देवाच्या भरवशावर राज्याचा कारभार सुरु असल्याचा टोला लगावत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आमदार देशमुख अकोल्यात विदर्भ आत्मबळ यात्रेच्या निमित्ताने आले होते. त्यांनी यावेळी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आमदार देशमुख विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच विदर्भाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी विदर्भातील ६२ मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ते स्वतंत्र विदर्भाबद्दल जनमत अजमावत आहेत.
आमदार देशमुख यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तसेच बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ आत्मबळ यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002