व्हीएस न्यूज - महाराष्ट्राच्या सत्तेवर भाजपची मालकी आहे शिवसेनेची साथ ही फक्त नावापुरती आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपकडून शिवसेनेवर जेवढी टीका होते तेवढी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नाही त्यामुळे आगामी काळात भाजप हाच आमचा विरोधी पक्ष असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
शिवसेना आणि भाजप यांचे संबंध ताणले गेलेले असताना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते असे बालिश राजकारण करतील असे वाटत नाही असे राऊत यांनी म्हटले. तसेच फेरीवाल्यांच्या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.
फेरीवाल्यांसंदर्भात सर्वात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता असे त्यांनी म्हटले. तसेच जोवर मुख्यमंत्री पोलीस संरक्षण देत नाहीत तोवर महापालिका अतिक्रमण कसे काढू शकेल? असाही प्रश्न त्यांनी विचारला. गो. रा. खैरनार यांना शिवसेनेने सर्वप्रथम जनतेसमोर आणले. शिवसेनेने त्यावेळी खैरनार यांना पाठिंबा दिला म्हणूनच त्यावेळी मुंबईने मोकळा श्वास घेतला होता असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशासनाने मोठा झटका दिला. एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने हा पगार कापण्यात येईल. या निर्णयामुळे अगोदरच तुटपुंजा पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हालाखीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. तसेच अगोदरच संतप्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळू शकतात. संप केल्यास दंडात्मक कारवाई म्हणून प्रत्येक दिवसाकाठी आठ दिवस याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याची तरतूद नियमात आहे. त्यानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे दंडात्मक कारवाईचे ३२ दिवस आणि संपाचे ४ दिवस असे मिळून एकूण ३६ दिवसांचे वेतन कापण्यात येईल, असे परिपत्रक एसटीकडून जारी करण्यात आले. चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाचे १२५ कोटींचे उत्पन्न बुडाले होते.
एसटी प्रशासनाच्या या निर्णयानंतर कर्मचारी संघटनांना नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय अयोग्य असून त्याविरोधात औद्योगिक न्यायालयात दाद मागणार असल्याचे ‘इंटक’चे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. आम्ही संपावर जाण्यापूर्वी एसटी प्रशासनाला रीतसर नोटीस दिली होती. त्यामुळे न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला असला तरी ही कारवाई खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
विविध पक्ष संघटनांसह सर्वच स्तरातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. एसटीच्या कामगारांवर कमी पगारामुळे निश्चितच अनेक वर्षे अन्याय होत असल्याचा सर्वसाधारण सूर होता. परंतु, ऐन दिवाळीत एसटीबंद आंदोलन छेडले गेल्याने त्याची सर्वाधिक झळ ही सर्वसामान्य जनतेलाच बसली. त्यामुळे शासनाची कोंडी करावयास गेलेल्या एसटीच्या संपकऱ्यांमुळे सर्वसामान्यांची मोठी परवड झाल्याचे चित्र होते. दिवाळीच्या महत्त्वाच्या चार दिवसांतच हा संप झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. दररोज होणाऱ्या ५८ हजार ७८० फेऱ्यांपैकी चार दिवसांत मोजक्याच फेऱ्या झाल्या. संपकऱ्यांचा शासनावरील रोष कायम असून सकारात्मक तोडगा न निघाल्यास राज्यकर्त्यांना धडा शिकवू अशी आक्रमक भूमिका एसटी कर्मचारी व्यक्त करीत होते. मात्र, एसटी प्रशासनाच्या आजच्या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना चांगलाच झटका बसला आहे.
व्हीएस न्यूज - राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे झाले असून खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्तिकी एकादशीनिमित्त सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचले. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते असून या रस्त्यांवर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाटील यांनी यापूर्वीही रस्त्यावर खड्डे नसतील, असा दावा केला होता. मात्र यानंतरही राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे आता तरी चंद्रकांत पाटील दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केल्याने त्यांचा दर्जा चांगला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कोकणातील रस्ते पावसाळ्यापूर्वी चांगले केले होते, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबतही भाष्य केले. नारायण राणे यांचा ११ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसेना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, याबाबत पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री चर्चा करतील. राज्याच्या तिजोरीवर चार लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. खर्च वाढला असला तरी उत्पन्न वाढीला मर्यादा आहेत. पण कर्जाचा डोंगर वाढला तरी विकासकामांना कात्री लावणार नाही, असेही ते म्हणालेत.
व्हीएस न्यूज - रेल्वेकडून लवकरच आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. सध्या रेल्वे तिकिटासाठी आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला असे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र आता तिकीट आरक्षित करताना आणि ते रद्द करताना भरावा लागणाऱ्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी वेगळा पर्याय दिला जाणार आहे. याबद्दलची सूचना रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागांना देण्यात आली आहे.
‘तिकीट अर्जात पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे एम आणि एफ असे दोन पर्याय देण्यात येतात. मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी टी हा पर्याय द्यावा,’ अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्व बोर्डाने सर्व विभागांना लिहिलेल्या पत्रात सामाजिक न्याय मंत्रालयाकडून तृतीयपंथीयांसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख आहे. तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक २०१६ चा संदर्भही या पत्रात आहे. संसदेच्या स्थायी समितीकडून सध्या तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयकाचा आढावा घेतला जात आहे. ‘सामाजिक न्याय मंत्रालयाकडून याबद्दलची सूचना येण्यापूर्वी तिकीट अर्जावर तृतीयपंथींयांसाठी ‘टी’ हा पर्याय देण्यात यावा,’ असे रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना १७ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रेल्वेच्या सर्व विभागांनी या सूचनेचे पालन करावे, अशी ताकीदही पत्रातून देण्यात आली आहे.
२०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना दिलासा देणारा निकाल दिला. या निर्णयामुळे महिला आणि पुरुषांसोबतच तृतीयपंथीयांना न्यायालयाने मान्यता दिली. याआधी तृतीयपंथीयांना कोणताही अर्ज भरताना महिला आणि पुरुष यापैकी एक पर्याय निवडावा लागायचा. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पासपोर्ट, शिधावाटप पत्रिका, बँकांचे अर्ज, मतदार ओळखपत्र यांच्यासह अनेक ओळखपत्रकांवर तृतीयपंथीयांना पर्याय दिला जाऊ लागला.
रेल्वेने २०१६ मध्ये तिकीट अर्जात टी (एम/एफ) असा पर्याय दिला होता. मात्र यामुळे तृतीयपंथीयांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले जात असून त्यांना महिला किंवा पुरुष यापैकी एका पर्यायावर बरोबरची खूण करावी लागते, असा आक्षेप सामाजिक संघटनांनी घेतला. त्यामुळे आता रेल्वेकडून तृतीयपंथीयांना वेगळा कॉलम दिला जाणार आहे.
व्हीएस न्यूज - आणीबाणीच्या काळात देशात पुन्हा लोकशाही रुजावी यासाठी अनेकांनी संघर्ष केला. या संघर्षामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पण पक्षवाढीसाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारख्या ‘त्यागी’ नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरु आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
सोमवारी धुळे येथे मदनलाल मिश्रा यांच्या ‘आणीबाणी- चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला एकनाथ खडसे उपस्थित होते. भाषणादरम्यान खडसे यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झाली. देशात पुन्हा लोकशाही रुजावी आणि नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी अनेकांनी आणीबाणीच्या काळात संघर्ष केला. हा संघर्ष केला नसता तर आज केंद्रात भाजपचा पंतप्रधान आणि १८ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री नसते, अशी आठवण खडसेंनी करुन दिली. सध्याच्या तरुण पिढीला हा इतिहास माहित नसून सध्याच्या अनेक आमदार आणि खासदारांनाही याची माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी आमदार- खासदारांचे विशेष वर्गही घ्यावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणीत संघर्ष करणारे सत्तेबाहेर आणि नारायण राणेंसारख्या त्यागी नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे असेच सुरु राहिले तर जुन्या माणसांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला.
आमदार अनिल गोटे हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, आमचा पक्ष वाल्याचा वाल्मिकी करतो असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. पण सध्या वाल्यांच्या टोळ्या येत असून यामुळे वाल्मिकीचे वाल्या झाला नाही म्हणजे कमावले, असा टोला त्यांनी लगावला.
व्हीएस न्यूज - भजन आणि किर्तनामुळे ताण-तणाव दूर होऊ शकतो, असे जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या एका संशोधनातून समोर आले आहे. मानसिक आजार दूर करण्याच्या प्रक्रियेत भजन-किर्तन प्रभावी ठरते, असेही संशोधन सांगते. विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने हा दावा केला आहे. ताण-तणाव दूर करण्यात औषधांपेक्षा भजन आणि किर्तनाची जास्त मदत होते, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.
‘ज्या लोकांना बालपणी नैतिक मूल्ये शिकवली जातात, चांगले संस्कार केले जातात, त्यांना भविष्यात तणावाच्या समस्येचा फारसा सामना करावा लागत नाही. तणावातून बाहेर पडण्यात योगदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडतो,’असे संस्कृत विभागाचे प्राध्यापक सुधीर कुमार यांनी सांगितले. विभक्त कुटुंबातील बहुतांश मुलांना तणावाचा सामना करावा लागतो. त्यातही पालकांचे एकुलते एक अपत्य असलेल्या मुलांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे, असे संशोधन सांगते. औषधे शारीरिक समस्यांसाठी उपयोगी ठरतात. मात्र मानसिक समस्यांवर औषधे गुणकारी ठरतातच असे नाही, असेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
‘आधुनिक काळात ताण-तणावाच्या समस्या वाढत आहेत. या सर्व संकल्पना पाश्चात्य जगातून आल्याचे आपल्याला वाटते. मात्र आपल्या पुराण आणि वेदांमध्ये ताण-तणावाचा उल्लेख आहे,’ असे संशोधक नंदिनी दास यांनी म्हटले. चांगल्या आरोग्यासाठी अध्यात्म आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘भजन आणि किर्तन ऐकल्याने तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे लहानपणीच भजन-किर्तनाला दिनक्रमात स्थान द्यायला हवे,’असे दास म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. साफीर करीम असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला आयएएस व्हायचे होते. परीक्षेदरम्यान ब्लूटूथ हेडफोनचा वापर करुन करीम पेपर सोडवत होता.
तामिळनाडूतील तिरुनवेल्लीतील सहायक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेला साफीर करीम २०१५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. मात्र कमी गुणांमुळे त्याला आयएएसऐवजी आयपीएस व्हावे लागले. आयएएस व्हायची इच्छा असल्याने साफीरने यंदा पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र या वेळी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी साफीरने कॉपीचा मार्ग निवडला.
तामिळनाडू पोलिसांना यूपीएससीच्या परीक्षेत साफीर करीमने कॉपी केल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांचे एक पथक साफीरवर नजर ठेवून होते. सोमवारी चेन्नईजवळील परीक्षा केंद्रात साफीर मोबाईल, ब्लूटूथ हेडसेट आणि छुपा कॅमेरा घेऊन बसला होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना तपासणीदरम्यान साफीरने चलाखीने मोबाईल खोलीत नेला होता. प्रवेश करताना साफीरने त्याच्या खिशातील मोबाईल, पाकिट जमा केले. चुकून या वस्तू कारमध्ये ठेवायला विसरलो असे त्याने सांगितले. मात्र त्याने पायमोज्यांमध्ये आणखी एक मोबाईल, ब्लू टूथ हेडसेट आणि कॅमेरा लपवून ठेवला होता. साफीरने खोलीत प्रवेश केल्याच्या २० मिनिटांनी तामिळनाडू पोलिसांचे पथक तिथे पोहोचले. त्यांनी साफीरची झडती घेतली असता हा प्रकार समोर आला.
पोलीस चौकशीत साफीरने गुन्ह्याची कबुली दिली. करीम प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून त्याच्या पत्नीला पाठवायचा आणि त्याची पत्नी फोनवरुन उत्तर सांगायची. पोलिसांनी करीमला फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली अटक केली आहे. चेन्नई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने साफीरच्या पत्नीलाही अटक केली आहे. साफीर हा मूळचा केरळमधील रहिवासी आहे. साफीर दाम्पत्य आणि त्यांच्या एका मित्राने इन्स्टिट्यूटही सुरु केले होता. स्पर्धा परीक्षा, यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे इन्स्टिट्यूट सुरु करण्यात आले होते. तिरुअनंतपूरम, कोच्ची, भोपाळ, हैदराबाद येथे कारिमच्या इन्स्टिट्यूटच्या शाखा आहेत.
व्हीएस न्यूज - नेपाळची राजधानी काठमांडूला जाणारी एक बस त्रिसूला नदीमध्ये कोसळल्याने मधुबनी जिल्ह्यात ३१ प्रवाशासह एका मातेचा व तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये ११ मुलांचा समावेश असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती देताना मनोज ठाकूर या प्रवाशांनी सांगितले, की बस त्रिसूला नदीच्या पुलावरुन खुपच वेगाने जात होती. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ५० फुट खोल नदीमध्ये ही बस कोसळली. नदीमध्ये पाणी ज्यास्त असल्याने बस पूर्णपणे बुडाली आहे. या घटनेतील आम्ही ५ जण प्रवास करत होतो, त्यापैकी ५ जण जीवंत वाचलो असून बसचा चालक फरार झाला आहे.
या घटनेत मृत झालेल्या महिला आणि तिच्या मुलाची ओळख पटली आहे. मधुबनीच्या राजनगर पोलीस क्षेत्रांतर्गत बरहारा गावात राहणाऱ्या ममता ठाकुर आणि मनीष ठाकुर अशी त्यांची नावे आहेत.
१४ वर्षांपूर्वी याच ठिकाणी ब्रिटिश सैन्यात कार्यरत असणाऱ्या लोकांची बस नदीत कोसळली होती. या घटनेत ५२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मागील ३ वर्षात याच ठिकाणी झालेल्या अपघातात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मेष : श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलधार्यांकडून लाभ होईल आणि त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्या संततीकडून शुभ वार्ता मिळतील. प्रवास- पर्यटनाचे यशस्वी बेत आखाल.
वृषभ : नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. गृहस्थ जीवनात सुख- समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्यजीवनात गोडी राहील. तब्येत चांगली राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारीवर्गाला येणे- बाकी वसूल करण्यास अनुकूल दिवस आहे.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. तब्येत बिघडेल. त्यामुळे कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार आहे. नोकरी धंद्यात सहकारी आणि उच्च अधिकारी यांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिकदृष्ट्या निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद- विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.
कर्क : श्रीगणेश सांगतात की आज तुमच्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. तब्येतीच्या तक्रारी राहतील. अनैतिक काम आणि चोरी सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तींशी भांडण,वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी अध्यात्माचा आधार घ्या असा सल्ला श्रीगणेश देतात.
सिंहः : श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या- फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीन असेल. जोडीदाराची तब्येत बिघडेल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी झालेली मुलाखात आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांबरोबर जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.
कन्या : श्रीगणेश सांगतात की कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील आणि स्वास्थ्य पण चांगले राहील. आजारी व्यक्तीची तब्येत सुधारेल. कामात सफलता आणि यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील आणि व्यापार- धंद्यात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्याकडून शुभवार्ता समजतील.
तुळ : आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा यांत भाग घेणे तुम्हाला आवडेल. संततीकडून शुभवार्ता मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तींच्या मिलनाने सुख वाटेल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबरच आज सर्व कामे करील, असे श्रीगणेश सांगतात.
वृश्चिक : आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक स्वास्थ्य बघडेल आणि मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. आईच्या तब्येतीची चिंता राहील. कुटुंबातील व्यक्तींशी जुळणार नाही. त्यामुळे मन दुःखी राहील. स्थावर संपत्ती आणि वाहन इ. व्यवहाराच्या कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून भीती राहील.
धनू : श्रीगणेश सांगतात की आज आपणावर गूढ रहस्यवाद आणि अध्यात्म रंग चढेल. म्हणून त्या विषयात खोलवर उतरण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. तब्येत चांगली राहील आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी सुखदायक मुलाखात होईल. भाग्य साथ देईल. व्यापार- धंद्यात प्रगती होईल.
मकर : 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. घरातील व्यक्तींशी मतभेद न होण्याच्या दृष्टीने ही गोष्ट आवश्यक आहे. विद्यार्थीवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका असा श्रीगणेश सल्ला देतात. स्वास्थ्य साधारण राहील. उजव्या डोळ्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कुंभ : श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी आजचा दिवस आपणासाठी चांगला ठरेल. कुटुंबीयां समवेत रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल तर दुसरी कडे चिंतनशक्ती व अध्यात्मशक्ती चांगली जाणवेल. दांपत्य जीवनातील गोडीचा आनंद चोखाल. भेटवस्तू आणि धनप्राप्ती होतील. संपूर्ण दिवस प्रसन्नते मध्ये जाईल.
मीन : कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. आपल्या लोकांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा कोर्ट- कचेरीतील प्रकरणे यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी वेळ अनुकूल नाही.
व्हीएस न्यूज - आपले सिम कार्ड जर आधार नंबरशी जोडले गेले नसेल तर चिंता करू नका. आता तुम्ही घरबसल्या सिम कार्ड आधारशी लिंक करू शकता. दूरसंचार मंत्रालयाने यासंदर्भातले निर्देश मोबाईल कंपन्यांना जारी केले आहेत. त्यामुळे सिम व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सोपी ठरणार आहे.
दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी याविषयी माहिती दिली आहे. सरकारने ही प्रक्रिया सुरळीत करण्याकरता प्रयत्न केले असून आता थेट घरबसल्या फोन क्रमांक किंवा सिम आधारशी लिंक करता येणार आहे. याकरता वन टाईम पासवर्ड (ओटीपी), अॅप किंवा आयव्हीआरएसव्दारे लिंक करता येईल.
मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जावे लागत असे. आता हे सर्व मोबाईल कंपन्यांच्या दुकानात जाऊन करू शकता किंवा घरबसल्या करणे देखील शक्य होईल. सरकारने मोबाईल कंपन्यांना आजारी आणि वयोवृद्ध लोकांसाठी ही सुविधा थेट घरी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
व्हीएस न्यूज - सुरक्षेच्या कारणास्तव जेट एअरवेजच्या मुंबईवरुन दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले असून बॉम्बशोधक आणि सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करत आहे.
विमानातून ११५ प्रवाशांसह ७ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. जेट एअरवेजने ट्विटरवरुन प्रसिध्दपत्रक जारी केले आहे. त्यात इमर्जन्सी लँडिंगबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणेला संपुर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे. तसेच प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम जन्मभूमी वादावर एका मुलाखतीदरम्यान महत्वाचा खुलासा केला आहे. राम मंदिराचा तिढा चंद्रशेखर सरकारच्या काळात सुटण्याच्या मार्गावर होता. मात्र, काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळल्याने हा प्रश्न मागे पडला असे पवार यांनी सांगितले.
अयोध्या राम जन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एक समिती गठीत केली होती. या समितीत शरद पवार यांच्यासह राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचा समावेश होता. या दोघांवर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या चर्चेदरम्यान मंदिराकरता ६०-६५ टक्के तर मशिदीकरता ३५-४० टक्के जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली होती. हा वाद जवळपास सुटण्याच्या मार्गावर होता. दरम्यान, याच काळात केंद्रात राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली. काँग्रेसने चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळले. त्यामुळे अयोध्या राम जन्मभूमी वादाचा प्रश्न मागे पडला.
डिसेंबरमध्ये होणार अंतिम सुनावणी-
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात या वादासंदर्भातील याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू होणार आहे. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी अयोध्या रामजन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002