व्हीएस न्यूज - प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपी विद्यार्थ्याला सज्ञान धरले जाणार असून त्याप्रमाणेच त्याच्यावर खटला चालणार आहे. बाल हक्क न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
व्हीएस न्यूज - ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार, शेतकरी आणि फळबागायतदारांना राज्य सरकारने आज भरीव मदत जाहीर केली. या वादळात नुकसान झालेल्या बहुवार्षिक फळबागांसाठी प्रतिहेक्टर 18 हजार रुपये , फळबागांसाठी साडेतेरा हजार रुपये प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टर सहा हजार आठशे रुपये मदत देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेत केली.
व्हीएस न्यूज - कसोटी आणि त्यापाठोपाठ एकदिवसीय मालिका झाली. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची रंगत क्रिकेटविश्वाला पाहता येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे. त्यामुळे या मालिकेचा विजयी श्रीगणेशा कोणता संघ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताने कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकली. कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते. त्यानंतर लग्नासाठी कोहलीने सुट्टी घेतली आणि रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली. रोहितने एकदिवसीय मालिका जिंकवून देत, संघाचे नेतृत्व कोणाकडेही असले तरी हा संघ जिंकू शकतो, हे एकदिवसीय मालिकेत दाखवून दिले. आता ट्वेन्टी-२० मालिका तो संघाला जिंकवून देऊ शकतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता; पण दुसऱ्या सामन्यात रोहितच्या द्विशतकाच्या रूपात संघाला संजीवनी मिळाली. दुसरा आणि तिसरा सामना जिंकत भारताने मालिका सहजपणे खिशात टाकली. ट्वेन्टी-२० संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा आहे, त्यामुळे या युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला रोहित कसा न्याय देतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल. रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. श्रेयस अय्यरनेही एकदिवसीय मालिकेत चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी अडचणीतून संघाला बाहेर काढण्यात सराईत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये हार्दिक पंडय़ाला सूर गवसलेला नाही आणि संघासाठी ही चिंतेची आहे. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन्ही युवा फिरकीपटू सातत्याने भेदक गोलंदाजी करत आहेत. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पध्र्याच्या धावा रोखण्याचे काम चोख बजावत आहे; पण या सामन्यात त्याला कोण साथ देणार,याची उत्सुकता साऱ्यांना असेल. कारण मोहम्मद सिराज, बासिल थम्पी आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एकाला बुमराहबरोबर गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर या युवा अष्टपैलू खेळाडूला या मालिकेत तरी संधी मिळते का हे पाहावे लागेल.
श्रीलंकेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आहे. कसोटी मालिकेच्या अखेरीस त्यांना सूर गवसला होता. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी विजय मिळवला खरा, पण त्यानंतर पुन्हा एकदा ते पराभवाच्या दुष्टचक्रात अडकले. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेचा संघ आसुसलेला असेल. उपल थरंगा हा सातत्याने चांगल्या धावा करत आहे, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळताना दिसत नाही. अँजेलो मॅथ्यूजसारख्या अनुभवी खेळाडूला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. कर्णधार थिसारा परेराला अपेक्षापूर्ती करता आलेली नाही; पण संघाने एकजूट केल्यास त्यांच्यामध्ये भारताला पराभूत करण्याची धमक आहे. ट्वेन्टी-२० संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूने किमान २० ते ३० आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पणाचे दडपण नाही. चांगली कामगिरी उंचावण्यासाठी आयपीएलमधील अनुभव मोलाचा ठरेल. युवा क्रिकेटपटूंना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळे ते सवरेत्कृष्ट कामगिरी करताना संधीचे सोने करतील. भारताच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असल्याचे म्हटले जात असले, तरी त्यांची कामगिरी नक्कीच उजवी ठरेल.
– दिनेश कार्तिक, भारताचा क्रिकेटपटू
वनडे मालिकेत आम्हाला पराभव पाहावा लागला. मात्र पहिल्या लढतीतील विजयामधून बोध घेणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक मालिका वेगवेगळी असते. एकदिवसीय प्रकारातून ट्वेन्टी-२० प्रकाराशी जुळवून घेण्याचे आव्हान आहे. मात्र ट्वेन्टी-२० मालिकेत आम्ही नव्याने सुरुवात करू. त्यामुळे या मालिकेत भारताला आम्ही चांगली लढत देण्यासाठी उत्सुक आहोत.
– थिसारा परेरा, श्रीलंकेचा कर्णधार
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी, जयदेव उनाडकट.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, दनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, दासून शनाका, चतुरंगा डीसिल्व्हा, सचिथ पथिराना, धनंजय डीसिल्व्हा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नाडो, दुष्मंथा चमीरा.
वेळ : सायंकाळी ७.०० वा.पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.
व्हीएस न्यूज - परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या ०.६ ते १.१ कोटी आहे, असे २०१७ च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.
रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत. भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत. सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. २००० पासून ४९ टक्के वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे. विश्वासार्ह माहिती व पुराव्यांच्या आधारेच स्थलांतराबाबतचे गरसमज दूर करून स्थलांतर धोरणे ठरवणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक उपमहासचिव लिउ झेनमिन यांनी सांगितले. स्थलांतरामुळे काही देशांत लोकसंख्या वाढली असून, तेथे लोकसंख्या कमी असण्याचा कल बदलला आहे, २००० ते २०१५ दरम्यान उत्तर अमेरिकेत लोकसंख्यावाढीचा दर ४२ टक्के होता, तर ओशियानात तो ३१ टक्के होता. युरोपात २००० ते २०१५ दरम्यान स्थलांतराअभावी लोकसंख्या कमी झाली आहे.
व्हीएस न्यूज - आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली.
गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेतून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपूरच्या हेडगेवार स्मृतीमंदिरात बुधवारी अधिवेशनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री या ठिकाणी आले होते. मात्र, एकनाथ खडसे आणि विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी बौद्धिक वर्गाला दांडी मारली. या दोघांसह आणखी काही आमदार या बौद्धिकाला गैरहजर असल्याचे समजते. या सर्वांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली.
नागपूर अधिवेशनात दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं जातं. आजही या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी खडसे आणि देशमुख यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली. त्यांनी म्हटले की, पुनवर्सन हे विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नाही. एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविषयी सकारात्मक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजपच्या ‘आयाराम संस्कृती’ला गळती लागणार!
तर दुसरीकडे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ७ पानांचे पत्र लिहले होते. या पत्रामध्ये त्यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. विदर्भ स्वतंत्र झाला नाही तर राजीनामा देईन, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी आजच्या बौद्धिक वर्गाला दांडी मारल्याची चर्चा आहे. दरम्यान, आजच्या बौद्धिकाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे देखील उपस्थित नव्हते. तब्येतीचं आणि निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देऊन बहुतेक आमदारांनी बौद्धिकाला दांडी मारली असली तरी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारण्यात येणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002