कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
व्हीएस न्यूज - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. १९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
२०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शशी कपूर यांनी हिंदी तसेच इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. निर्माते म्हणून त्यांनी ‘जुनून’ (१९७८), ‘कलियुग’ (१९८०), ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘विजेता’ (१९८२), ‘उत्सव’ (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली होती. तसेच ६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मीली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकीरा’ या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.
शशी कपूर यांचे समकालीन कलाकार व्यावसायिक चित्रपटांमध्येच अडकलेले असताना कपूर यांनी त्याबरोबरीने कलात्मकतेची कास धरत निर्माता होण्याचे धाडस दाखवले. फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये यंदा काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्ता राखलेल्या भाजपला या निवडणुकीत काँग्रेसने आव्हान दिले आहे. त्याचेच प्रतिबिंब निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून पाहायला मिळत आहे. यंदा पहिल्यांदाच काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ४३% मतदान होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. ‘एबीपी-लोकनिती-सीएसडीएस’ने हे सर्वेक्षण केले आहे.
भाजप आणि काँग्रेसला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी सारखी असेल, असा अंदाज आहे. मात्र असे असले तरी भाजपला ९१ ते ९९ जागा मिळतील, तर काँग्रेसला ७८ ते ८६ जागांवर समाधान मानावे लागेल. या जागांची सरासरी काढल्यास भाजपला ९५, तर काँग्रेसला ८२ जागा मिळतील. त्यामुळे मतदानाची टक्केवारी जरी समान असली, तरी भाजप वरचढ ठरताना दिसत आहे. मात्र तरीही भाजपच्या जागा १०० पेक्षा कमी होतील, असे सर्वेक्षण पहिल्यांदाच समोर आले आहे.
नोटाबंदी आणि जीएसटी हे मुद्दे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ले केले. या हल्ल्यांना यश मिळताना दिसत आहे. जीएसटीवरुन गुजरातचे व्यापारी नाराज असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, ४४ टक्के व्यापारी जीएसटीच्या अंमलबजावणीवर नाराज आहेत. तर ३७ टक्के व्यापारी जीएसटीवर खूष आहेत. व्यापारी वर्गाचा विचार केल्यास ४० टक्के व्यापारी वर्ग भाजपच्या बाजूने आहेत. तर ४३ टक्के वर्ग काँग्रेसला अनुकूल आहे.
गुजरातमध्ये जातीय राजकारणानेही जोर पकडला असून दलित, आदिवासी आणि पटेल काँग्रेसच्या बाजूने आहेत. तर सवर्ण आणि कोळी समाज भाजपला अनुकूल आहे. दोन दशकांपासून भाजपसोबत असणारा पटेल समाज आता काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. तर कोळी समुदाय काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या बाजूने सरकतो आहे. याशिवाय भाजपची आदिवासी मतपेढी आता काँग्रेसकडे गेली आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील आकडेवारी पाहिल्यास ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. ग्रामीण भागातील ४३ टक्के जनता भाजपला मतदान करेल, असा सर्वेक्षणचा अंदाज आहे. तर ४९ टक्के मतदार काँग्रेसला साथ देतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरी भागात भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे आहे. शहरांमध्ये भाजपला ४६ टक्के मतदारांची साथ लाभेल. तर काँग्रेसला ३० टक्के जनता मतदान करेल, असे सर्वेक्षण सांगते.
व्हीएस न्यूज - हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पती आणि पत्नीच्या शारीरिक संबंधाचे चित्रीकरण करून ते महिलेला दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र चित्रीकरण करणारा आरोपी फरार आहे. विशेष म्हणजे याआधीही आरोपीने पती-पत्नीचे चित्रीकरण केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंदन अष्टे हा फिर्यादी महिलेच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहायचा. तो गेल्या तीन महिन्यांपासून फिर्यादी महिला आणि तिच्या पतीमधील शारीरिक संबंधाचे चित्रीकरण त्यांच्या नकळत करत होता. सेल्फी स्टिकच्या मदतीने कुंदन हे चित्रीकरण करायचा. हे सर्व व्हिडिओ त्याने लॅपटॉपमध्ये सेव्ह केले होते. विशेष म्हणजे या अगोदरही त्याने पती-पत्नीचे व्हिडिओ काढले असून, ते फिर्यादी महिलेला मोबाईलद्वारे दाखविले आहेत. यानंतर पीडित महिलेने हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल केला. आरोपी कुंदन अष्टे हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा ‘गौरव’ प्राप्त केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध झाला आहे. यानुसार २०१६ मध्ये राज्यात भ्रष्टाचाराची १ हजार १६ प्रकरणे समोर आली. म्हणजे देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल २२.९ टक्के घटना या एकटय़ा महाराष्ट्रात समोर आल्या आहेत. २०१५ मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या १२७९ तर २०१३ मध्ये १३१६ घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत २०१६ मध्ये आकडेवारी कमी झाल्याचे दिसते.
महाराष्ट्राच्या खालोखाल ओडिसाचा नंबर लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या ५६९ घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये ४३० , मध्य प्रदेशमध्ये ४०२, आणि राजस्थानमध्ये ३७८ प्रकरणे समोर आली आहेत.
गुन्हेगारीत उत्तर प्रदेश अव्वल…
देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशातच झाली आहे. २०१६ मधील एकूण गुन्ह्यांची संख्या ४८ लाख ३१ हजार ५१५ इतकी आहे. २०१५ मध्ये हीच संख्या ४७ लाख १० हजार ६७६ इतकी होती. म्हणजे गुन्ह्यांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात २ लाख ८२ हजार गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
गुन्हे नोंद अहवालामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक
महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या २०१५ मधील ४ लाख २३ हजारांवरून २०१६ मध्ये ४ लाख ३० हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे २१७ इतके आहे.
व्हीएस न्यूज - सरकारी नोक-यांमध्ये ३० टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे जवळपास साडेपाच लाख पदे रिकामी होणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचा-यांमध्ये मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सातव्या वेतन आयोगामुळे आधीच राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत आहे. त्यातच संगणकीकरण आणि आऊटसोर्सिगमुळे मनुष्यबळाची गरजही कमी होत आहे. तसेच काळाच्या ओघात अनेक पदे कालबाह्य ठरली आहेत,तर काही कामांचे स्वरूप बदलल्याने नव्या पदांच्या निर्मितीची गरज असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे सरकारी नोकरदारांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करून नवे आकृतिबंध सादर करण्याचे आदेश वित्त विभागाने दिल्याने राज्य सरकारमधील सुमारे सहा लाख पदे कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व विभागांनी ३० टक्के कर्मचारी कपातीसह पदांचा नवा आकृतिबंध ३१ डिसेंबपर्यंत सादर करावा, असा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत जलसंपदा, ग्रामविकास व अल्पसंख्याक या तीनच विभागांनी नवीन आकृतिबंध तयार केला आहे. आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून शासकीय सेवेतील एकूण मनुष्यबळाची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आणणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत.
व्हीएस न्यूज - कमी गुणवत्तेमुळे ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे, अशा राज्यभरातील जवळपास १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा राज्य सरकारचा महाराष्ट्रातील शाळांबाबत मोठा निर्णय म्हटला जात आहे. तसा पत्रव्यवहारही शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७६ शाळांचा समावेश आहे. यानुसार ज्या शाळातील पटसंख्या कमी आहे अशा विद्यार्थ्यांना जवळच्याच म्हणजेच सध्याच्या शाळेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे. अशा शाळांना शिकविण्यासाठी शिक्षकही येत नसल्याचे समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या डिसेंबर महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
यापूर्वी राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी २५ नोव्हेंबरलाच अहमदनगरमध्ये या प्रकरणी इशारा दिला होता. ढासळत्या शैक्षणिक दर्जावर त्यांनी चिंता व्यक्त करून गांभीर्याने दखल घेण्यासही त्यांनी बजावले होते. अहमदनगरला ते प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी कमी पटसंख्याच्या शाळा बंद करून चांगल्या पटसंख्यांच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात येतील. जिल्ह्यातील वीस हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे वीस हजार कुटुंबे उद्ध्वस्त होणार असल्याने याबाबत गांभीर्य बाळगण्याचे आवाहन केले. तसेच शाळा बंद करण्यात सरकारचा पैसा वाचवण्याचा उद्देश नाही. शाळेची गुणवत्ता कमी होत असल्याचे लक्षात येताच, पालक विद्यार्थ्यांना दुस-या शाळेत घालतात. मात्र मी त्या पाल्यांचा पालक असल्याचेही नंदकुमार यांनी म्हटले होते.
यावेळी नंदकुमार यांनी झेडपीच्या शिक्षण विभागाला खडेबोल सुनावले होते. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिका-यांना कामात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. गुणवत्तेसाठी विचारात बदल करून शिकविताना नाटक करू नये, असेही बजावले आहे. शंभर टक्के पगारानुसार शंभर टक्के मुले का प्रगत होत नाहीत, असा सवालही नंदकुमार यांनी विचारला. गरिबाच्या ताटातील अन्नातून कपात करून तुम्हाला पगार मिळतो, याची जाणीवही त्यांनी शिक्षकांना करून दिली.
कोकणातील शाळांची संख्या जास्त
राज्यभरातील बंद होणा-या शाळांमध्ये कोकण विभागातील शाळांची संख्या जास्त असून, पहिल्या टप्प्यात कोकणातील ५०० शाळा बंद करण्यात येणार आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जवळच्या इतर सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय शिक्षण कायद्याचा भंग करणारा असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज - ओखी वादळाची तीव्रता कमी होत असली तरीही ४ डिसेंबरच्या रात्रीपासून पुढील ४८ तासांत महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर वादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन रविवारी कन्याकुमारी येथे पोहोचल्या असून त्यांनी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची तसेच अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला. त्या सोमवारी केरळ आणि तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. चक्रीवादळाने केरळच्या खवळलेल्या सागरात अडकून पडलेल्या १७ मच्छीमारांची पाच दिवसांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएनएस काल्पेनी या नौकेने १३ मच्छीमारांना वाचवून त्यांना कोल्लम येथील अधिकाऱ्यांच्या हवाली केले. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने कायामकुलमपासून पश्चिमेला ३० मल अंतरावर चार मच्छीमारांची सुटका करून त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. हवाई दलाची नऊ, नौदलाची तीन विमाने तसेच नौदलाची १० जहाजे मदतकार्यात सहभागी होती.
वादळामुळे केरळजवळील समुद्रामध्ये अडकलेल्या ६०० हून अधिक मच्छीमारांची सुटका करण्यात यश आले असले तरी राज्यातील मृतांचा आकडा रविवारी १९ वर पोहोचला आहे. रविवारी सहा नवे मृतदेह सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारीदेखील सहा मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांची संख्या सातवरून १३ वर गेली होती.
नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यास नकार…
ओखी वादळाने केरळ, तामिळनाडू व लक्षद्वीप भागात थैमान घातले असले तरी त्याला नैसर्गिक आपत्ती जाहीर करता येणार नाही असे केंद्राने म्हटले आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अल्फॉन्स कंथानम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आधीच राज्याला निधी दिला असून केंद्राकडे वादळ नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची कुठलीही योजना नाही.
व्हीएस न्यूज - राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात येईल या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दाव्यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. कोणत्या अधिकाराने मोहन भागवत अयोध्येत मंदिर उभारणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत काय सरन्यायाधीश आहेत का? ते कोण आहेत, अशा शब्दांत त्यांनी भागवतांवर शाब्दिक प्रहार केला.
कर्नाटकच्या उडपी येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत भागवत यांनी राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारणार असल्याचे म्हटले होते. राम मंदिरच्या वर एक भगवा झेंडा फडकेल. राम जन्मभूमीवर दुसऱ्या कशाचेही बांधकाम उभारले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशात मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ओवेसींनी ही भागवत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मग कोणत्या आधारावर भागवत अयोध्येतच राम मंदिर उभारण्याचा दावा करत आहेत, असे ओवेसी म्हणाले. दोन्ही बाजूच्या सहमतीने तोडगा काढा असा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिल्यानंतर विविध स्तरातून याबाबत प्रस्ताव देण्यात आले आहेत. नुकताच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनीही अयोध्येत जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर शिया वक्फ बोर्डनेही अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला. अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मशीद उभारावी असा प्रस्ताव त्यांनी सादर केला. मशिदीला शासकाचे नाव देण्याऐवजी ‘मस्जिद-ए-अमन’ असे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता.
व्हीएस न्यूज - दिवसभर शहरातील विविध चौकात फुगे, खेळणी, टिश्यु पेपरसह आदी साहित्य विकणारे परंतु, रात्री बंद फ्लॅट हेरून चोऱ्या करणाऱ्या दोघांना सांगवी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सोने, चांदी व एक दुचाकी असा पावणे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.जम्बो ऊर्फ गणेश रमेश काळे (वय-20), प्रितेश संगु काळे (वय-31, रा. चतृश्रुंगी पुल्लाखाली, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सांगवी पोलीस परिसरात रात्री गस्त घालत असताना संशयावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सहा गुन्हे उघडकीस आले. दोन्ही आरोपी शहरातील विविध भागातमधील चौकात दिवसभर शहरातील विविध चौकात फुगे, खेळणी, टिश्यु पेपर, मोटार पुसण्याचे कापड यासह आदी साहित्य विकण्याचा व्यवसाय करतात. तसेच रात्री बंद फ्लॅट हेरून चोऱ्या करण्याचा उद्योग करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यांच्याकडून 123. 5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 85.100 ग्रॅम चांदीचे दागिने एक दुचाकी असा तीन लाख 85 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली बलभिम ननवरे, देवेंद्र शिंदे, पोलीस हवालदार बोकड, कोंथिबीरे आदींच्या पथकाने केली....Read More
व्हीएस न्यूज - धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यात काही वेळापूर्वी एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळून अपघात झाला. या घटनेत वैमानिकासह दोनजण जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातील शेवाळी या गावाच्या फाट्याजवळ असलेल्या एका शेतात हे विमान कोसळले, या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले असावे अशी माहितीही मिळते आहे. विमानात बिघाड झाल्याचे समजताच वैमानिकाने विमान लोकवस्तीपासून लांब अंतरावर नेले. वैमानिकाला काय होणार आहे हे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. धुळे येथील फ्लाईंग क्लबचेच हे विमान होते. मात्र विमान नेमके कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी चालले होते आणि बिघाड नेमका का झाला? याचे कोणतेही कारण अद्याप समजू शकलेले नाही. या विमानात पायलटसह एकूण ६ लोक बसले होते अशीही माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात येतो. या विमानात एकूण सहाजण बसले होते. यापैकी दोघांना जास्त मार लागला आहे त्यामुळे या दोघांना साक्री येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पायलटही जखमी झाला आहे. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे अशीही माहिती समोर आली आहे.
व्हीएस न्यूज - मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक या अनिष्ट प्रथेला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर आता, अशा प्रकारे जर कोणत्याही मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तिहेरी तलाक पद्धत संपुष्टात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. हिवाळी अधिवेशनात संसदेत तो मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. ‘न्यूज १८’ ने याबाबत वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांकडे या विधेयकाचा मसूदा पाठवला असून त्यावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत. या विधेयकानुसार, तोंडी तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच तो अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. मात्र, हा कायदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू होणार नाही.
सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांसाठी तिहेरी तलाकवर स्थगिती आणण्यात आली आहे. या कालावधीत सरकारने यासंबंधीचा कायदा करावा असेही कोर्टाने म्हटले आहे. जर सहा महिन्यांत सरकारने यासंबंधीचा कायदा केला नाही तर ही स्थगिती कायम राहिल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याबाबत सगळ्या पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून मत द्यावे आणि कायदा तयार करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे असेही आवाहन केले आहे.
व्हीएस न्यूज - ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले. अरबी समुद्रात शुक्रवारी बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य नौदलाने सुरू केले असून, समुद्र खवळलेला आहे. वादळानंतर जोरदार पाऊस झाला आहे. दोन्ही राज्यांत पाऊस कोसळत असून आता हे वादळ लक्षद्वीपकडे सरकत आहे.
केरळातून शोधमोहिमेसाठी १३ बोटी व ३८ कर्मचारी रवाना झाले असून तामिळनाडूतून चार जणांसह एक बोट शोधमोहिमेवर गेली आहे. नौदलाच्या हेलिकॉप्टरने आठ जणांना वाचवले आहे. काही मच्छीमार समुद्रात पडून तरंगताना दिसले असता हेलिकॉप्टरने त्यांना बाहेर काढले असल्याचे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
तामिळनाडूतील कन्याकुमारी, तुतीकोरीन व तिरुनैवेली जिल्हय़ांना पावसाने झोडपून काढले आहे. लागोपाठ तीन दिवस पाऊस चालू आहे. आता वादळाचा धोका कमी झाला असून, ते कन्याकुमारीपासून ७० किमी अंतरावर आहे. नंतर ते अरबी समुद्राकडे गेले आहे. ओखी वादळ ईशान्येकडील मिनिकॉय बेटात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले, ते आता पुढील २४ तासांत लक्षद्वीपकडे जाणार आहे. वादळाचा वेग ताशी ११० ते १२० किमी होता. पुढील २४ तासांत लक्षद्वीपमध्ये ताशी १३० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले. लक्षद्वीप येथे काही ठिकाणी २० सेमी पावसाची शक्यता आहे.
अनेक मच्छीमार बेपत्ता…
चेन्नई व आजूबाजूच्या भागातही जोरदार पाऊस झाला. नौदलाने केरळ व तामिळनाडूतून डॉर्नियर विमाने व अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर पाठवले आहे. कन्याकुमारीतील पाच मच्छीमार परतलेले नसून ते दोन दिवसांपूर्वी समुद्रात गेले होते. केरळ किनाऱ्यावर पाच जहाजे पाठवण्यात आली आहेत. तेथे अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. लक्षद्वीप येथे मदत सामग्रीने भरलेली दोन जहाजे तयार ठेवली आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002