व्हीएस न्यूज - भीमा कोरेगांव घटना का घडली, सरकारचा कुठेच धाक राहिला नाही. महिला वर्ग सुरक्षित नाही. भीमा कोरेगांव प्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवला परंतू पंतप्रधानांनी अजून एक शब्द काढलेला नाही. एरवी मन की बात करणारे पंतप्रधान भिमा कोरेगावच्या प्रश्नावर गप्प का असा सवाल माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. ते रायगड जिल्ह्यातील माणगाव नगरपंचायत हद्दीतील विवीध विकास कामांच्या शुभांरभ सोहळ्यानंतर आयोजीत जाहिर सभेत बोलत होते.
केंद्रात व राज्यात भाजप व शिवसेना सत्तेवर आहे. या सरकारने जनतेला दिलेली आश्वसने पाळलेली दिसत नाहीत. गुजरातने त्यांना नाकारले. समविचारी पक्षांनी एकत्रित निवडणूका लढवल्या असत्या तर गुजरातचे चित्र आज वेगळे असते. आताच्या सरकारला मुंबई गोवा महामार्गाचे काम साडेतीन वर्षांत करता आलेले नाही. त्यावर कोणीच काय बोलत नाही. साडेतीन वर्षांत सरकार आपली टिमकी वाजवत आहे. पण त्यांची विकासकामे काहीच दिसत नाही. शिवसेना भाजप सरकारने कोकणावर अन्याय केला आहे. शेतकरयांच्या आत्महत्तयेचे प्रमाण वाढले आहे. विजेच्या संदर्भातील प्रश्न बिकट झाले आहे. लोकांना भूलभुलया करण्याचे काम हे सरकार करीत आहे.
उध्दव ठाकरे भाजप वर टिका करतात पण सत्तेतून बाहेर पडण्याची हिम्मत करत ना्ही. मेक इन इंडियाच्या नावाखाली अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला पळविले आहेत. या काळात समाजाचा कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी समाधानी नाही. त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. उस उत्पादक कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी १०० दिवसात महागाई कमी होणार असे सांगितले होते. सत्ता येऊन १००० दिवस झाले अजून महागाई कमी झालेली नाही.उलट जास्त प्रमाणात महागाई झालेली आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने महिला वर्ग नाराज आहे. आमच्या काळातील कित्येक योजना आहेत त्या योजनांची फक्त नांवे या सरकारने बदलली आहेत. शेतकरयांचा पेकाट या सरकारने मोडला आहे. या मुख्यमंत्र्यांना शाश्वत शेती काय समजणार असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. कमला मिल प्रकरणात वरिष्ठ अधिकारयांवर राजकीय दबाव आहे.त्यांनी तो वेळीच स्पष्ट करणे गरजेच आहे असेही मतही त्यांनी यावेळी मांडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनील तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, माणगावचे नगराध्यक्ष आनंद यादव उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - मुंबईतील आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारी सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आगीची घटना ताजी असतानाच आता रे रोड परिसरातील एका वेल्डिंगच्या दुकानाला रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे सात दुकाने व गोदामे आगीत जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दुकानांचे मोठे नुकसान झाले असले तरी या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.
मुंबईतील रे रोड परिसरातील एका वेल्डिंग दुकानाला रात्री उशिरा आग लागली. परिसरात गोदाम असल्याने आग लगेच पसरली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझली असली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या आगीत ७ दुकाने जळून खाक झाल्याचे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील अग्नितांडवाचे सत्र सुरुच आहे. रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.
व्हीएस न्यूज - मराठा समाज किंवा ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने कुठलाही बंद नाही. जाणीवपूर्वक १० जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद असल्याचे काही व्हॉट्सअॅप मेसेज फिरविले जात आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. अफवा पसरवू नयेत, असे आवाहन सकल मराठा समाज आणि ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने करण्यात आले आहे.
भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर एका मराठा बांधवाला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. यांच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण ‘महाराष्ट्र बंद’ बाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे ‘मराठा क्रांती मोर्चा’चे समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी जाहीर केले आहे. मराठा समाजातील तरूणांचा वापर काही लोक राजकारणासाठी करू पहात आहेत. मराठा – दलित वाद पेटविण्याचे कारस्थान केले जात आहे. या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये. मराठा समाजाला या दंगलीत उतरवून जातीय तेढ निर्माण करून मराठय़ांची चळवळ मोडीत काढण्याचे या मागे कारस्थान आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे लक्ष ठरलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या पोस्ट फिरवून आपल्या लक्ष्यावरून मराठय़ांना विचलित करण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत आहेत. दंगली पेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी,उद्योग, व्यवसाय या कडे लक्ष देणे गरजेच आहे. ‘मराठा क्रांति मोर्चा’ व ‘सकल मराठा समाजा’चे नाव वापरून कोणी खोटी पोस्ट टाकत असेल तर अशा व्यक्तीला तिथेच जाब विचारून पुढे पोस्ट जावून समाजात दुही पसरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोखरकर यांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने केले आहे.
व्हीएस न्यूज - तरुणांचे आयुष्य उध्वस्त करणा-या आणि मुंबईतील विविध इमारतीला आगीचा धोका निर्माण करणा-या हुक्का पार्लरच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने धडक मोहीम सुरू केली आहे. या हुक्का पार्लरपासुन दूर राहण्यासाठी तरुणांना आवाहन करीत असतानाच त्यावर कारवाई करण्यासाठी या मोहीमेद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
मुंबईतील कमला मिल येथील पबमध्ये आग लागून १४ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद थेट देशाच्या संसदेपर्यंत उमटले. ही आग लागली त्याच दिवशी आमदार नितेश राणे यांनी या आगीला अनधिकृत हुक्का पार्लर कारणीभूत असू शकतात, अशी शक्यता वर्तविली होती. पुढे या आगीच्या झालेल्या चौकशीत तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. समाजाला घातक असणा-या हुक्का संस्कृतीच्या विरोधात आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. १० ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने संपूर्ण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहीमेत सर्व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे नेते, आमदार कपिल पाटील यांनी केली. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ८० हजार शाळा बंद करण्यात येणार असल्याचे औरंगाबाद येथे स्पष्ट केले होते. यावर बोलताना कपिल पाटील यांनी ही मागणी केली.
याआधी या सरकारने हजारो शिक्षकांना अतिरिक्त केले, कला-क्रीडा शिक्षण संपवले, रात्रशाळांवर घाव घातला, विनाअनुदानित शिक्षकांना फसवले आणि आता ८० हजार शाळा बंद करण्याचा डाव आखण्यात आला आहे, असे सांगतानाच शाळा बंद करायला सरकारचे डोके फिरले आहे काय? कष्टाने उभारलेल्या शाळा बंद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पतंजलीच्या शाळा उभारण्यात येणार आहेत काय? असा सवालही त्यांनी केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापासून शिक्षण विभाग वाचवण्याची गरज असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
८० हजार शाळा बंद होणार नाहीत – तावडे
मुंबई – येत्या १५ वर्षात राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही उद्दिष्ट नसून या सर्व अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिले. विनोद तावडे यांनी हे स्पष्टीकरण ट्विटरवरून दिले आहे. येत्या १५ वर्षात राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असे मत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवाने व्यक्त केले नसल्याचा दावाही तावडे यांनी केला आहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही, असे सांगत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही तावडे यांनी केले.
व्हीएस न्यूज – मरिन ड्राईव्हच्या समुद्रातील प्रस्तावित असलेल्या तरंगत्या हॉटेलला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मुंबई उच्च न्यायालयाने ही परवानगी नाकारताना हेरिटेज कमिटीचा निर्णय योग्य ठरवत,मुंबईच्या सागरी किना-याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
हे हॉटेल प्रस्तावित असलेल्या मरिन ड्राईव्हच्या भागात अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. याशिवाय नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने परवानगी देताना सुरक्षेच्या मुद्यावरही बोट ठेवले होते, याचा उल्लेख या हॉटेलला परवानगी नाकारताना उच्च न्यायालयाने केला. राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने एमटीडीसीद्वारा प्रस्तावित या हॉटेलकरता एमएमआरडीए, तटरक्षक दल, पश्चिम नौदल मुख्यालय या सर्वांची परवानगी असली, तरी २०१५ मध्ये स्थापन झालेल्या हेरिटेज कमिटीने मात्र परवानगी नाकारली होती.
याला या हॉटेलचे विकासक रश्मी डेव्हलपर्सनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. राजभवनच्या नजीक समुद्रात या विशाल क्रूझरूपी हॉटेलसाठी जागा निश्चित केली असून तिथे जाण्यासाठी एनसीपीएजवळ एक जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यामुळे मरिन ड्राईव्ह परिसरात येणा-या वाहनांची संख्या वाढेल. यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होईल.
या कारणामुळे मुंबई पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त आणि मुंबई पुरातत्त्व संवर्धन समितीच्या देखरेखीखालील कमिटीने ही परवानगी नाकारली. उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार मरिन ड्राईव्हच्या बाबतीत कोणताही निर्णय या समितीच्या परवानगीशिवाय घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हा महत्त्वाचा मुद्दा राहील असे उच्च न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले होते.
व्हीएस न्यूज - गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडल्याचे शाळेत शिकवले जाते. मात्र, हा सिद्धान्त ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता, असा दावा राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी केला आहे. ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडलेल्या सिद्धान्ताचा आपण अभ्यासक्रमात समावेश का करत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी उपस्थित होते. देवनानी म्हणाले, आजपर्यंत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडला असे तुम्ही शिकला आहात, मी देखील हेच शिकलो. पण तुम्ही सखोल अभ्यास केला तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनच्या अगोदर हजारो वर्षांपूर्वी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडल्याचे दिसेल,असा दावा त्यांनी केला. आपण आधुनिक विज्ञानाचे धडेही दिलेत पाहिजे. उत्तम दर्जाच्या शालेय शिक्षणातूनच उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
राजस्थानमध्येही दुसरा कन्हैया घडू नये, याकडे विद्यापीठांनी लक्ष दिले पाहिजे. उच्च शिक्षणातून फक्त चांगले पॅकेज घेणारे विद्यार्थी घडत आहे. पण संस्काराचे मूल्य कमी होत आहे, असे देवनानी यांनी सांगितले. विद्यापीठांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे, यामुळे देशातील अनेक समस्यावर तोडगा निघू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या काळात पाठ्यपुस्तकांमध्ये झालेल्या बदलांकडेही देवनानी यांनी लक्ष वेधले. ‘पहिली ते १२ वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये बदल झाला आहे. राजस्थानमध्येही अकबर हा चांगला राजा होता असे शिकवले जायचे. पण नंतर आम्ही हा धडाच पाठ्यपुस्तकातून वगळला. त्याऐवजी महाराणा प्रताप यांना पुस्तकात स्थान दिले, असा दावा त्यांनी केला.
व्हीएस न्यूज – अखेर २५ जानेवारी रोजी बऱ्याच वादांचा सामना केलेला संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पद्मावत ( अगोदरचे शिर्षक पद्मावती) प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वायकॉम एटिनच्या प्रवक्त्याने जाहीर केली.
हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी राजपूत करणी सेनेसह अनेक संघटनांनी लावून धरली. त्यानंतर सेन्सॉरनेही आपली नाराजी निर्मात्यावर दाखवली होती. अखेर प्रदर्शन लांबणीवर पडले होते. पद्मावती हा चित्रपट पद्मावत नावाने २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे वायकॉम एटिनच्या प्रवक्त्याने सांगितले. दुसरीकडे संजय लीला भंसाली दिग्दर्शित ‘पद्मावत’ची रिलीज डेट घोषित होताच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी, हा चित्रपट राजस्थानात प्रदर्शित होणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता राजस्थानातील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. यावर वसुंधरा राजे यांनी राज्यातील जनतेच्या भावनेचा विचार करत हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
राजे एका सरकारी जाहिरातीत यांनी, महाराणी पद्मिनीचे बलिदान हे राज्याच्या मान-सन्मानाबरोबर आणि गौरवासोबत जोडले गेले आहे. त्यामुळे राणी पद्मिनी आमच्यासाठी केवळ इतिहासाचा एक आध्याय नाही, तर आमचा स्वाभिमान आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना निर्देशही दिले आहेत.
व्हीएस न्यूज - संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ योजनेला मोठा झटका बसला आहे. दक्षिण कोरियाच्या मदतीने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १२ अॅडव्हान्स माइनस्वीपर्स लढाऊ जहाजांची (विस्फोटकांना निष्क्रिय करणा-या तंत्रज्ञानानाने सुसज्ज जहाजे) निर्मिती करण्यासाठी हाती घेतलेला ३२ हजार कोटींचा प्रकल्प सरकारने रद्द केला आहे. गोवा शिपर्याडात या लढाऊ जहाजांची निर्मिती करण्यात येणार होती.
भारतीय नौदलाला अशा प्रकारच्या माइनस्वीपर्सची खूपच गरज आहे. सध्या नौदलाकडे ३० वर्षे जुनी चार माइनस्वीपर्स आहेत. चीनकडील अणू-पाणबुडय़ा सुरुंग पेरण्यास सक्षम आहेत. तसेच हिंद महासागरात चीनचे आव्हान मोडून काढणे भारतासाठी आवश्यक आहे. त्यामुळे नौदलाकडे केवळ चार माइनस्वीपर्स असणे चिंताजनक आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आधीच उशिरा सुरू झालेल्या या प्रकल्पाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने गोवा शिपयार्डाला दिले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे संरक्षणमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाच्या विस्तारासाठी पुढाकार घेतला होता. आता सरकारने गोवा शिपयार्डला ‘ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ जारी करण्यास सांगितले आहे. त्यानंतर एक विनंती प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या कंगनाम शिपयार्डसोबत या प्रकल्पासंबंधीची चर्चा रखडली होती. याशिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि किंमतीवरून काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
व्हीएस न्यूज - काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या असून या निवडणुकी विरोधात अतिरेक्यांनी फतवा काढला आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरने हा फतवा काढला असून निवडणूक लढविणाऱ्या डोळ्यात अॅसिड फेकरण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हत्या केल्याचा दावाही या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
कश्मीरमधील लोकशाहीला आव्हान देण्यासाठी अतिरेक्यांनी वारंवार अशा प्रकारचे धमक्या दिलेल्या आहेत. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची अद्याप पडताळण्यात करण्यात आलेली नाही. लोकांना धडा शिकवण्यासाठी यापूर्वी निवडणुकीत हत्या केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. या क्लीपमध्ये म्हटले आहे की, २०१६ मध्ये तुम्ही पाहिले आहे की पॅलेट गनमुळे किती युवकांना आपले डोळे गमवावे लागले. या वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की, जे लोक काश्मीर पंचायत समितीच्या निवडणुका लढवतील त्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकण्यात येईल.
हिज्बुलचा कमांडर रियाज नाइकोच्या नावाने ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मागील २८ वर्षांपासून आम्ही निवडणूक लढवणा-यांना धमकी देत आलो आहोत. परंतु, त्याचा परिणाम दिसून आला नाही. मागील निवडणुकीत तुम्ही पाहिले आहे की, किती जणांची हत्या झाली. काहींना भारतीय सुरक्षा संस्थांनी तर काहींना आम्ही मारले आहे. त्यामुळे निवडणुका लढविताना पूर्ण विचार करा, अशी धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी २०११ मध्ये धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही पंचायत निवडणुकीत सुमारे ८० टक्के मतदान झाले होते. दक्षिण काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी पाणि यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी ऑडिओ क्लिपबाबत ऐकले आहे. पण अजून ती पाहिलेली नाही. सध्या यावर मी कोणतीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
व्हीएस न्यूज - जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सकाळी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दोन्ही दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून परिसरात सध्या शोधमोहीम सुरु असल्याचे समजते.
अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. सध्या परिसराला जवानांनी वेढा घातला असून संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी देखील दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.जम्मू-काश्मीरमध्ये १४ डिसेंबर २०१७ पर्यंत जवळपास २०६ दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. तर दहशतवाद्यांशी लढताना ७५ जवानांना वीरमरण आले. तर २०१६ मध्ये १५० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. २०१६ मध्ये हेच प्रमाण १५० आणि २०१५ हेच प्रमाण १०८ वर होते.
व्हीएस न्यूज - मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ चे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जामखेडमध्ये विविध ठिकाणी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी विविध संघटनेकडून पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. येथील जामखेड प्रेस क्लब कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर ग्रामीण विकास प्रकल्प व शिवराणा ग्रुपच्या वतीने विकास प्रकल्प कार्यालयात पत्रकार दिन साजरा झाला. यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, बापू ओहोळ, बापूसाहेब गायकवाड, शिवराणा ग्रुपचे अध्यक्ष धनराज पवार, राम पवार , नगरसेवक पवन राळेभात ,अमित जाधव ,सानी सदाफुले ,संतोष गर्जे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. शिवनेरी अकॅडमी मध्येही पत्रकार दिनाचा कार्यक्रम झाला. कॅप्टन लक्ष्मण भोरे , कॅप्टन टेकाळे यांनी पत्रकाराचा सत्कार केला. वसंत सानप ,मिठूलाल नवलखा ,ओंकार दळवी ,मोहिद्दीन तांबोळी ,लियाकत शेख ,सुदाम वराट ,प्रकाश खंडागळे ,नासिर पठाण ,समीर शेख ,गुलाब जांभळे ,यासिन शेख,किशोर दुशी ,दत्तराज पवार ,मनोज कोळपकर ,अविनाश बोधले ,रामहरी रोडे ,किरण रेडे ,बाळासाहेब शिंदे ,फारूक शेख ,सागर पवार ,नंदूसिंग परदेशी ,संजय वारभोग ,अशोक वीर ,राजेश भोगील ,शिवाजी इकडे ,आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते ....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002