व्हीएस न्यूज - महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून ७१८० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी राज्यपाल सी. विद्यसागर राव यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या राज्यपाल परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
राष्ट्रपती भवनात झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये नवभारत २०२२ मधील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास त्याचबरोबर राज्य आणि राजभवनाच्या माध्यमांचा पुढाकारातून करण्यात आलेले उपक्रम याविषयी चर्चा करण्यात आली.
सन २०२२मध्ये नवभारताच्या विकासाचे लक्ष्य साधण्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना भारतीय राज्यघटनेच्या ७३ आणि ७४व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेले अधिकार बहाल करावे, जेणेकरून सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देणे त्यांना शक्य होईल अशी मागणी राज्यपालांनी ‘सार्वजनिक सेवेमधील आमूलाग्र बदल’ या विषयावरील परिसंवादात केली. राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठवाडा, विदर्भातील १४ जिल्ह्यमधील ११४ सिंचन प्रकल्प अपूर्ण असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठय़ा निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विशे, बाब म्हणून केंद्राने हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निदी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्यपालांनी यावेळी केली. राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्य सुविधा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतील अॅम्ब्युलन्स सेवा पुरविताना विशेष करून गरोदर मातांना बाळंतपणासाठी नेताना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
मुंबईतील राजभवनमध्ये असलेल्या बंकरमध्ये आधुनिक म्युझियम करण्यात येणार असून त्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास,संस्कृती आणि स्वातंत्र्य लढय़ामध्ये असलेला त्याचा सहभाग याविषयी माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. केंद्रीय पर्यटन विभागाने या बंकरच्या संवर्धनासाठी आणि म्युझियमच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनशी करणे उत्तर प्रदेशच्या व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. कानपूरमधील २३ व्यापाऱ्यांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या व्यापाऱ्यांनी मोदींची किमशी तुलना करणारे बॅनर आणि होर्डिंग्ज संपूर्ण कानपूर शहरात लावले होते. बँकेकडून १० रूपयांची नाणे स्वीकारण्यात येत नसल्याचा आरोप करत याचा विरोध दर्शवण्यासाठी १२ ऑक्टोबरला हे पोस्टर लावण्यात आले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या होर्डिंग्जवर एका बाजूला हुकूमशहा किमचा फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली, मी संपूर्ण जगाला संपवून टाकेन अशी ओळ आहे. दुसऱ्या बाजूला मोदींचा फोटो लावण्यात आला असून, त्याखाली मी व्यापाऱ्यांना संपवून टाकेन अशी ओळ लिहिली आहे.
हा प्रकार समोर येताच पोलिसांनी विविध कलमे व उत्तर प्रदेश विशेष अधिकारानुसार या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली आहे. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव प्रवीणकुमार आहे. पोलीस अधीक्षक अशोक वर्मा यांनी अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मोदींचे हे वादग्रस्त पोस्टर लावताना प्रवीणकुमारला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, दुसरीकडे पोलिसांकडून व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईचा इतर व्यापारी विरोध करत आहेत. यावेळी दिवाळी साजरा करणार नसल्याचे या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, बँक आणि दुकानदार १० रूपयांचे नाणे घेत नाहीयेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाईलाजाने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार हे नाणे देऊनच करावा लागत आहे. बँका नाण्यांच्या बदल्यात नोटा देण्यासाठी २५ टक्के रक्कम कापत असल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर चर्चा झाली होती. परंतु, यावर काहीच तोडगा न निघाल्याने नाईलाजाने व्यापाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
व्हीएस न्यूज - निश्चलनीकरणाच्या निर्णयाची वर्षपूर्ती असलेला ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येईल. यानिमित्त काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनही करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे केवळ सामान्यांवरच काटकसर करण्याची वेळ आली असे नव्हे तर अर्थव्यवस्थेलाही मोठा झटका बसला,असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी अचानकपणे नोटाबंदीची घोषणा करत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात तब्बल महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे खूप हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळायचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेस नेते आणि प्रवक्ते देशभरात फिरून नोटाबंदीच्या दुष्परिणामांचा प्रचार करतील. तसेच नोटबंदी कशाप्रकारे अपयशी ठरली, हे दाखवून देण्यासाठी पक्षाच्या रिसर्च टीमकडून व्यापक प्रमाणावर माहिती गोळा करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदी म्हणजे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पाऊल, असे निर्णयाचे वर्णन केले होते. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी म्हणजे ‘महाकाय गैरव्यवस्थापन आणि संघटित व कायदेशीर लूट’ असल्याची टीका केली होती. त्यामुळे आता काँग्रेस येत्या ८ नोव्हेंबरला या मुद्द्यावरून सरकारविरोधात कशाप्रकारे वातावरण तापवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीचे ठामपणे समर्थन केले. नोटाबंदीचा निर्णय धाडसी असून यासाठी जगभरात भारताचे कौतुक होत आहे. काँग्रेस हा संधीसाधू पक्ष असल्याने वस्तू आणि सेवा करासारख्या (जीएसटी) आर्थिक सुधारणांचा त्यांनी विरोध केला असा चिमटाही त्यांनी काढला. नोटाबंदीद्वारे काळ्या पैशाला चाप लावण्याचा प्रयत्न होता. पण काँग्रेसच्या रडारवर काळा पैसा कधीच नव्हता. जीएसटीचा प्रस्ताव सर्वप्रथम काँग्रेसनेच मांडला होता. काँग्रेस शासित राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटीला पाठिंबा दर्शवला. मात्र काँग्रेस हा संधीसाधू पक्ष असल्याने आता ते जीएसटीचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - यूपीए २ च्या कार्यकाळात वर्ष २०११ मध्ये विमानतळावर जाऊन योगगुरू रामदेव बाबांची भेट घेणे आपली चूक होती, अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात दिली. यूपीए २ च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे २०११ मध्ये दिल्ली विमानतळावर रामदेव बाबांना उपोषण न करण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, हा आमचा चुकीचा निर्णय होता. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे यूपीए सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे रामदेव बाबांनी उपोषण करण्यापूर्वीच हे प्रकरण मिटवायचं होतं, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, मी आणि कपिल सिब्बल रामदेव बाबांना भेटण्यास गेलो. राजकीय कारणांसाठी त्यांना भेटण्यास गेलो होतो. आम्ही आधीच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे त्रस्त होतो. सरकारच्या अडचणीत यामुळे वाढ झाली होती. यात भर म्हणून रामदेव बाबा उपोषण करणार होते. त्यामुळं मला असं वाटलं की, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मिटवून टाकावं. त्याचवेळी मला एका नेत्याने रामदेव बाबांशी चर्चा करून हे आंदोलन मिटवता येईल, असा सल्ला दिला होता. मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही. त्यासाठी मी काही जणांशी संपर्क साधला. त्या व्यक्तीनं मला म्हटलं की, रामदेव बाबा दिल्लीत जाऊन आपल्या अनुयायांशी चर्चा करण्यापूर्वीच आपण त्यांना भेटलं पाहिजे. ते तुमचं ऐकतील.
यावेळी तुम्ही कपिल सिब्बल यांना का नेले, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, मी त्या व्यक्तीला सांगितलं की माझी हिंदी चांगली नाही. मी त्यांच्याशी चर्चा कसं करू शकेल. त्यावेळी त्यानं एका अशा व्यक्तीला घेऊन जा, जो तुमच्यासाठी दुभाष्याचं काम करेल, असे सांगितले. त्यासाठी मी कपिल सिब्बल यांना नेलं. पण नंतर मला पश्चाताप झाला, हा माझा चुकीचा निर्णय होता. ती आमची चूक होती, हे सांगण्यास मला त्यावेळीही संकोच वाटला नाही व आताही वाटत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुखर्जी त्यावेळी मनमोहन सिंग सरकारमध्ये अर्थमंत्री तर सिब्बल हे मनुष्यबळ विकास मंत्री होते. रामदेव बाबा १ जून रोजी उज्जैनहून दिल्लीला पोहोचले होते. रामदेव बाबांची विदेशातील काळ्या पैशासह इतर मुद्यांवर मुखर्जी आणि सिब्बल यांच्याबरोबरील बैठक अयशस्वी ठरली होती.
व्हीएस न्यूज - नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एकहाती सत्ता मिळवत पुन्हा एकदा आपला गड राखला. निवडणुकीत भाजपने मोठी ताकद लावली होती. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नांदेडमधील निकाल म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील जनतेची प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं. तसेच धर्मनिरपेक्ष पक्षाचा विजय झाला, याबद्दल समाधान असल्याचं सांगत मुंडे यांनी अशोक चव्हाणांचे अभिनंदन केलं.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह राज्यातील सर्व भागात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर येत आहे. या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठवाड्यात सोयाबीनसह मका,कपाशी, उडीद, मुग इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन भिजल्याने कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकरीही धास्तावला आहे. फळबागा, भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाचा पडलेला खंड, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि रोगांच्या साथी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले असताना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता आणि दिवाळी बोनस एकत्रित देणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी जोरात होणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून महागाई भत्ता थकीत आहे. दिवाळीपूर्वी महागाई भत्यासह कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देणार असल्याची रावते यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा राज्यातील १ लाख सात हजार एसटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
यंदाच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना मागीलवर्षी प्रमाणे २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. यासोबतच जुलै २०१६ ते सप्टेंबर २०१७ पर्यंतचा महागाई भत्ताही देण्यात येणा आहे. ही रक्कम एकत्रितपणे दिवाळीपूर्वीच म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिवाळी बोनस आणि थकीत महागाई मिळून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेमुळे सरकारी तिजोरीवर जवळपास १४० कोटींचा भार पडणार आहे.
व्हीएस न्यूज - राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील, असे सूतोवाच राहुल यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. दिल्लीत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत सोनिया गांधींना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना लवकरच राहुल पक्षाध्यक्षपदी विराजमान होतील, असे त्यांनी सांगितले. या वेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे वादात अडकलेले पुत्र जय शहा यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया त्यांनी देण्याचे टाळले.
नुकत्याच, अमेरिकेतील दौऱ्यात राहुल गांधी यांनी आपण काँग्रेसची धुरा खांद्यावर घेण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी पक्षाने राहुल यांची अध्यक्षपदी निवड निश्चित केल्याचे बोलले जात होते. राहुल गांधी यांची पक्षाध्यपदी निवड झाल्याची अद्याप घोषणा झालेली नसली, तरी त्यांचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी पुढे येणे हे स्वाभाविक आहे. कारण बऱ्याच काळापासून काँग्रेसचे अनेक नेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी पक्षाध्यक्ष होतील असे सांगत आहेत.
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी नुकतेच राहुल यांच्या पक्षाध्यक्षपदाबाबत भाष्य करताना गांधी घराण्याचे सर्वात लहान वारस आता पक्षाची धुरा सांभाळतील असे म्हटले होते. राहुल गांधी हे सध्या काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांना सध्या कुणाचेही आव्हान नाही. त्याचबरोबर देशभरातील प्रदेश काँग्रेस समित्या एकामागून एक राहुल यांच्या पक्षाध्यक्षपदासाठीचे प्रस्ताव पारित करीत आहेत.
आगामी काळात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका होतील, मात्र पक्षाध्यक्षपदासाठी अद्याप राहुल यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. त्याचबरोबर राहुल यांना कोणी मोठा विरोधही करताना दिसत नाही. यावरुन आगामी काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, गांधी घराण्याचे विश्वासू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नुकतेच म्हटले होते की, आई किंवा मुलगा या दोनच व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. यावरुन काँग्रेसमधूनच गांधी-नेहरु घराणेशाहीविरोधात आवाज उठवला गेल्याची चर्चा सुरु झाली होती.
व्हीएस न्यूज - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ साली आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाची घोषणा केली. त्यावेळी प्रणब मुखर्जी हे नाराज होणे स्वाभाविक होते. कारण, पंतप्रधानपदासाठीचे दावेदार असलेल्या प्रणब मुखर्जी यांच्या नावाऐवजी माझ्या नावाची घोषणा झाली होती, अशी प्रांजळ कबुली माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिली आहे.
नवी दिल्लीत प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडाचा आज प्रकाशन सोहळा पार पडला, यावेळी मनमोहन सिंग यांनी आपले सहकारी मुखर्जी यांच्यासोबतच्या नात्याचा उलगडा केला. आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील त्यांची मैत्रीही त्यांनी उलगडून दाखवली.
मनमोहन सिंग म्हणाले, सन २००४ मध्ये सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. मात्र, माझ्यापेक्षा त्यावेळी या पदासाठी प्रणबदा अधिक योग्य व्यक्ती होते. त्यावेळी माझ्याकडे इतर कुठलाही पर्याय नसल्याचे त्यावेळी प्रणबदांनाही माहिती होते. सिंग यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमातील उपस्थितांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खळखळून हसून त्यांच्या खुलेपणाने बोलण्याला दाद दिली.
सरकार चालवताना आमच्यामध्ये अनेक अपेक्षाच होत्या मात्र, कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळेच आमच्या नात्यात खूपच सहजता होती. आम्ही संलग्न टीम बनून सरकार चालवले, यामध्ये प्रणब मुखर्जी हे सर्वात महत्वाचे सदस्य होते. राजकारणात माझा प्रवेश हा अपघातानेच झाला. मात्र, प्रणब मुखर्जी हे खरे राजकीय व्यक्तिमत्व आहे. सध्या आपल्या देशातील ते सर्वोत्कृष्ट राजकीय व्यक्ती आहेत, असे सिंग यावेळी म्हणाले.
पी. व्ही. नरसिंहराव यांनी मला अर्थमंत्री होण्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर माझ्या क्षमतांनुसार मी प्रणब मुखर्जी यांच्यासोबत खूपच जवळून काम केले. ते तेव्हा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. वाणिज्य मंत्री, परराष्ट्रमंत्रीही होते. अजूनही त्यांचे या पदांशी घट्ट नाते असल्याचे ते म्हणाले.
मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहीले आहे की, आघाडीचे सरकार चालवताना मी कधीही वैयक्तिक गोष्ट आडवी आणली नाही. आघाडीचे सरकार चालवणे अवघड काम होते मात्र, ते सुरळीत पार पडले.
व्हीएस न्यूज - गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पशुधन संजीवनी’ योजनेंतर्गत १५ लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. झारखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्राच्या पशुधन योजनेंतर्गत प्रत्येक गायी आणि म्हशींची प्रजनन क्षमतेची नोंद ठेवली जाणार आहे. ही योजना राबणारे झारखंड हे पहिल राज्य असल्याचे Jharkhand State Implement Agency for Cattle and Buffalo (JSIACB) चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद प्रसाद यांनी सांगितले.
झारखंडमध्ये सुमारे ४८ लाख गोवंश आहे. यापैकी ४१.९४ लाख गायी आहेत. तर १५ लाख दुभत्या गायींसह १८ लाख जनावरांना पहिल्या टप्प्यात हेल्थ कार्ड देण्यात येणार आहेत. याला पुढच्या महिन्यांत सुरुवात होणार आहे. या पशुधन संजीवनी योजनेसाठी केंद्र सरकारने यापूर्वी १.५७ कोटी रुपयांची तरतुद केली होती. तर झारखंड सरकारने या योजनेसाठी १.०४ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये या जनावरांना आधार क्रमांकाप्रमाणे १२ आकडी क्रमांक देण्यात येणार आहेत.
झारखंडमध्ये गायींना हे क्रमांक देण्याला याआधीच सुरुवात करण्यात आली आहे. केंद्राच्या information network for animal productivity and health (INAPH) या योजनेंतर्गत हे क्रमांक देण्यात आले आहेत. गोवंशाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी, त्यांची दूध क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी राज्यात यापूर्वीच ७० हजार गायींना या क्रमांकांचे टॅग लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये ५०० पेक्षा अधिक पशुवैद्यक काम करीत आहेत.
व्हीएस न्यूज - ऐन दिवाळीत सोने मागणी वाढण्याबाबतचा विश्वास सराफ वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या या दिवाळीत सोने विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्य़ांनी वाढण्याचा अंदाज बांधला जात आहे.
सोने खरेदीचा एक मुहूर्त असलेली धनत्रयोदशी येत्या १७ ऑक्टोबर रोजी आहे. यंदाच्या दिवाळीला सोने खरेदीसाठी पूरक वातावरण असल्याचे ‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरशेन’चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी म्हटले आहे. कमी दर असूनही यंदाच्या दसऱ्याला मौल्यवान धातूला फारशी मागणी नव्हती. उलट गेल्या वर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत यंदाच्या मुहूर्ताला कमी सोने विक्री झाली अशी माहिती पु. ना. गाडगीळ सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी दिली.
वस्तू व सेवा कर परिषदेच्या गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या २२ व्या बैठकीत २ लाख रुपयेर्पयंतच्या किंमतीच्या दागिने खरेदीकरिता आता पॅन तसेच आधार अनिवार्य करण्याचा निर्णय झाला. खरेदीदारांकरिता या माध्यमातून झालेली सुलभता तसेच सध्या मौल्यवान धातूचे असलेले किमान स्तरावरील दर यंदाच्या दिवाळसण खरेदीला पूरक ठरतील, असा विश्वास सराफ वर्तुळातून व्यक्त करण्यात आला.
सप्टेंबरमध्ये देशाची सोने आयातही रोडावली होती. गेल्या महिन्यात ४३ टक्के कमी सोने आयात झाली. सोने खरेदीबाबत असलेल्या अटींमुळे सराफा व्यापाऱ्यांनी सोने मागणी कमी नोंदविली होती.
वस्तू व सेवा कर परिषदेने केलेल्या सुलभतेमुळे सोने खरेदीचा ग्राहकांचा कल यंदा वाढण्याचा विश्वास वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या दिवाळीला यामुळे सराफा बाजारात सकारात्मक वातावरण तयार होईल, असेही ते म्हणाले. यंदाच्या सण निमित्ताने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून १०० किलो सोन्याच्या भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ५ किलो सोन्याचे व्यक्तिगत स्तरावरील बक्षीसाची संधीही खरेदीदारांना देण्यात आली आहे.
वस्तू व सेवा कर अंतर्गत ५०,००० रुपयांवरील दागिने खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्यतेची मर्यादा विस्तारित केल्याचे स्वागत सोमवारी भांडवली बाजारातही झाले.
व्हीएस न्यूज - महात्मा गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला तर सर्वाधिक नुकसान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) झाल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेचे संघाशी संबंध असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. मी आज देशातील नागरिकांना आणि माध्यमांना विचारू इच्छिते की, गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?. आम्ही तुरूंगात गेलो, आमच्यावर बंदी लादण्यात आली आणि आजही आम्ही त्रास सहन करत आहोत. देशाला त्रास भोगावा लागला. संघ आणि जनसंघालाही यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी म्हटले.
महात्मा गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करून नवीन राजकीय संघटना उभी केली पाहिजे, अशी घोषणा गांधीजींनी केली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी न्यायमित्रही नियुक्त केला आहे. नेमके याचवेळी उमा भारती हे वक्तव्य केले आहे. गांधींची हत्या गोडसेनी जरी केली असली तरी त्याला भडकवण्याचे काम कोणी केले, असा सवाल उमा भारती यांनी यावेळी उपस्थित केला. नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनजवळ ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002