व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम अंतर्गत सुक्ष्म, लघु, उद्योजक समिती, मध्यम उद्योजक, बॅंकिंक आणि करकायदे समिती, लेबर वेलफेर, औद्योगिक कायदे समिती अशा पाच समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समित्यांची स्वतंत्र अध्यक्ष व कार्यकारिणीही फोरमतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
सुक्ष्म, लघु, उद्योजक समितीची कार्यकारणी पुढीलप्रमाणे ः जयंत कड (अध्यक्ष), गोडगे-पाटील, सुनिल गोसावी, नितीन गहाणी, प्रमोद राणे, मिलिंद जोशी (सर्व सदस्य).
मध्यम उद्योजक समिती ः योगेश बाबर (अध्यक्ष), पी. के. सावंत, विनोद बन्सल, सुनिल बन्सल, प्रेमचंद आर. मित्तल, लाला जैन (सर्व सदस्य).
बॅंकिंग आणि करकायदे समिती ः विनोद बन्सल (अध्यक्ष), ऍड. आप्पासाहेब शिंदे, संजय ववले, मिलिंद जोशी, रोहिर बोरा, नितीन कोंढाळकर (सर्व सदस्य).
लेबर वेलफेर समिती ः रंगनाथ गोडगे-पाटील, विनोद पटकोटवार, विनोद बन्सल, संदीप लखानी, प्रेमचंद आर. मित्तल, संजय राऊत (सर्व सदस्य).
औद्योगिक कायदे समिती ः नितीन बनकर (अध्यक्ष), ऍड. आप्पासाहेब शिंदे, विनोद पटकोटवार, संजय सातव, नितीन गहाणी, रंगनाथ गोडगे-पाटील (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.
व्हीएस न्यूज - समाजात माता जिजाऊ यांचे कुठेतरी संस्कार हरवत असल्याने आजचा तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे.म्हणून समाजाला राजमाता जिजाउंचे संस्कार तर छत्रपती शिवाजी महराजांच्या विचारांची आज गरज आहे, असे उद्गार शिवव्याख्यात्या अर्चना भोर- कारंडे यांनी काढले.
स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत "गरज जिजाऊंच्या संस्काराची- छत्रपतींच्या विचारांची" या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका व माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक अजय सायकर, उद्योजक संदीप नेवाळे, वास्तुविशारद कवि राजेंद्र कोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी उपस्थित होते.
भोर पुढे म्हणल्या कि, शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. शाहू महाराज 18 व्या वर्षी सिंहासनावर विराजमान झाले. महात्मा फुले यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शाळा सुरू केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 28 व्या वर्षी संविधान लिहिले. भगतसिंग हे 21 व्या वर्षी हसतमुखाने फासावर गेले. या सर्व युगपुरुषांनी अल्प वयातच कारकिर्द गाजवली. आजचे तरूण 30 ओलांडली तरी आईवडिलांच्या जीवावर बसून खातात. काही उनाडक्या करीत फिरतात. काही तरुण शिवरायांसारखे दिसावे म्हणून दाढी वाढवून, कपाळावर चंद्रकोर लावून स्वतःला मिरवतात. तरुणांनी शिवरायांचा एकतरी विचार आत्मसात केला तरी समाजात परिवर्तन होईल.
महाराष्ट्रात बलात्काराचे प्रमाण वाढले. कारण आपल्या घरातील जिजाऊ संस्कार देण्यात कमी पडत आहे. आज आपण महापुरुषांना जाती धर्मात वाटून घेतलेच. त्याचबरोबर निसर्गाने दिलेले रंग देखील आपण वाटून घेतले. महापुरुषांनी आपल्याला दिले काय? अन् आपण घेतले काय? शिवराज व भिमराय समजले असते तर त्यांनी जातीच्या नावावर दंगली घडून आणल्या नसत्या. सुत्रसंचालन संतोष ठाकुर यांनी तर उल्हास तापकिर यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - पतंगाच्या मांज्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्याला दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहा वाजता काळेवाडी येथे घडली आहे. तीन दिवसापुर्वी नातेवाईकाबरोबर दुचाकीवरून जाणाऱ्या एका दोन वर्षीय मुलाच्या डोळ्याला मांज्यामुळे गंभीर जखम झाली होती. त्यामुळे पतंगाचा मांजा जीवघेणा ठरत आहे.
रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा. ज्योतिबा नगर काळेवाडी), असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. भुजबळ गुरूवारी सायंकाळी काळेवाडीतील तापकीर चौकातून दुचाकीवरून जात होते. अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला गुंडाळला गेला. मांजा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता हाताच्या अंगठ्यालाही जखम झाली. गळ्यालाही जबर जखम झाली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी काळेवाडीतच हमजा खान या दोन वर्षाच्या मूलाच्या पतंगाच्या मांज्यामुळे जबर जखम झाली होती. यामध्ये त्याच्या डोळ्याला तब्बल 32 टाके पडले आहेत.
मांजा ठरतोय जीवघेणा …
मकरसंक्रात हा सण उद्या (रविवार) आहे. यानिमित्त शहरातील विविध भागात लहान मुले पतंग उडवत आहेत. या पतंगाचा मांजा नायलॉनच्या धागा असतो. त्यामुळे नागरिकांनाही यापासून मोठी इजा होत आहे. पतंगाचा माजा सर्वाधिकपक्षांसाठी घातक ठरत असून यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
व्हीएस न्यूज - आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार प्रसिद्ध असून पुन्हा एकदा याची प्रचिती बारामतीच्या कार्यक्रमात आली. यावेळी अजित पवारांनी फेटा फारसा न बांधण्यामागील रहस्य सांगितले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तुम्हाला माहित आहे कि मी तर कधी फेटा बांधत नाही. पण मलाही तुम्ही फेटा बांधल्यावर राहवले नाही, म्हटले बांध बाबा, आता काय करु? कारण फेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत की काय, सगळे केस गेले, तुमच्यासाठी काम करता करता माझे केस पण गेले. मी सुनेत्राला म्हणत असतो आता माझे केस बारामतीकरांकरता गेले, का तुझ्यामुळे गेले बघ आता.
बारामतींसाठी केलेल्या कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाशी केस गळतीचा संबंध अजित पवारांनी जोडला. उपस्थितांची अजित पवारांचे बिनधास्त वक्तव्य ऐकून हसूनहसून पुरेवाट झाली.
व्हीएस न्यूज - महेंद्र सिंह धोनी आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा कर्णधार असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली असल्याचा खुलासा सुरेश रैनाने केला आहे. गेल्या २ वर्षापासून रैना गुजरात लायंस टीमचा भाग होता. गुजरात लायंसचा तो कर्णधार होता. धोनी आणि जडेजाला ११ व्या सीजनसाठी फ्रेंचायजीने रिटेन केले आहे. पहिल्या सीजनपासून आठव्या सीजनपर्यंत धोनी टीमचा कर्णधार होता. यंदा देखील त्यालाच कर्णधार बनवले जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा रैनाला धोनीनंतरची जबाबदारी मॅनेजमेंटने सोपवली आहे.
धोनी जर अनफिट असला तर रैना कर्णधार असेल. सीएसके २ वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या लिलावावर आता सगळ्यांची नजर असणार आहे. रैनाने म्हटले आहे की, टीमचा कर्णधार धोनी असेल तर मी उपकर्णधार. एक ऑलराउंडर म्हणून जडेजा टीममध्ये असेल. यानंतर आता आमची नजर लिलावावर आहे. लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत. त्यानंतर लिलावाची तयारी करु.
व्हीएस न्यूज - पुढील ५० दिवसांत राज्यभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज, पोस्टर्स हटवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दिले आहेत. जानेवारी अखेरीस ही मुदत संपत होती, पण ही मुदत प्रशासनाच्या विनंतीवरून २३ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली.
मुंबईत प्रत्येक वॉर्डनुसार या कामाकरता दररोज दोन सशस्त्र पोलीस अधिकारी देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. तसेच या कामावर इतर ठिकाणीही एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत. यापुढे यासंदर्भात जर सरकारी अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला, तर उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल कारवाईला तयार राहा, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
यासुनावणी दरम्यान राज्यभरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या भिंती आणि खांब हे सध्या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि फलक लावून अथवा रंगाने लिहून विद्रुप केल्या जातात. राजकिय पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा ज्यात प्रामुख्याने समावेश असतो असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. त्यामुळे कुणाचीही हयगय न करता या संदर्भात थेट गुन्हे नोंदवण्याचे आदेश याआधीच उच्च न्यायालयाने दिलेत. या संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी नगरविकास खात्याच्या दोन अधिकाऱ्यांची समिती नेमावी, असे निर्दोशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
व्हीएस न्यूज - सध्या सोशल मीडियावर २० जानेवारीपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा बंद होणार असून त्यासाठी पैसे मोजावे लागणार अशा बातम्यांनी धूम उडवली आहे. पण अर्थ मंत्रालयाने ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या वतीने सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या अफवांकडे दुर्लक्ष करावे असे सांगण्यात आले आहे, त्याचबरोबर याबाबत इंडियन बँक असोसिएशननेही स्पष्टीकरण दिले आहे.
अशाच प्रकारे ट्वीटरवर व्हायरल होणाऱ्या एका मॅसेजला रिट्वीट करत अर्थ मंत्रालयाने म्हटले की, २० जानेवारीपासून मोफत सेवा बंद करण्याचा असा कोणताही प्रस्ताव नाही. ही केवळ अफवा आहे. याकडे दुर्लक्ष करा. बँकिंग असोसिएशनला मंत्रालयाने सल्ला दिला की, सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या मॅसेजवर स्पष्टीकरण द्यावे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत एक मॅसेज व्हारल होत होता. त्यात म्हटले होते की, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांसाठी २० जानेवारीसाठी शुल्क वसूल केले जाईल. ग्राहकांमध्ये हा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर बँकांबद्दल संताप निर्माण झाला होता. आधीच मिनिमम बॅलेंन्सच्या नावाखील पैसे कापले जात असताना आता इतर सेवांसाठीही पैसे वसूल करण्याची ही योजना त्रासदायक असल्याचे लोकांचे म्हणणे होते.
व्हीएस न्यूज - मात्र राजस्थानात आपल्या विधवा आईचे लग्न करून देण्यासाठी मुलीने पुढाकार घेतल्याचे उदाहरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी स्वतःच उपवर आहे.
राजधानी जयपुर येथील या आगळ्यावेगळ्या लग्नाचा निर्णय व त्याचे आयोजन यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. संहिता अग्रवाल असे या मुलीचे नाव आहे. संहिताचे वडील मुकेश गुप्ता यांचे वयाच्या 52 व्या वर्षी 13 मे 2016 अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे संहिताची आई गीता नैराश्यात गेल्या होत्या. संहिताच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर घरात केवळ ती व आई हेच राहिले होते. संहिताला नोकरी लागल्यानंतर तिची आई पूर्णपणे एकटी राहिली.
तेव्हा 2016 मध्ये संहिताने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर आईचे प्रोफाईल बनविले. त्यातून गोपाल गुप्ता या 55 वर्षांच्या महसूल अधिकाऱ्याचा प्रस्ताव त्यांना आला. त्यांच्या पत्नीचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. एका मोठ्या ऑपरेशननंतर त्यांनी रुग्णालयात सेवा केली. त्यांच्या निस्वार्थ सेवेने प्रभावित होऊन संहिताच्या आईने लग्नासाठी होकार भरला. दोघांनीही आपल्या निवडक नातेवाईकांसमक्ष आर्यसमाज मंदिरात लग्न केले. ‘मी केवळ पुढाकार घेतला आहे. तुम्ही साथ दिली तर आपल्याला या देशातील घरांबाहेर हातात जपमाळ ओढणाऱ्या व कोणीतरी बोलण्याची वाट पाहणारे वृद्ध दिसणार नाहीत. ती असहायता संपवायची आहे,’ असे संहिताने आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले आहे.
व्हीएस न्यूज – फेसबुकवरून आपल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी संधी शोधणाऱ्या कंपन्यांसाठी वाईट बातमी. फेसबुकने आता जाहिरातींऐवजी लोकांना त्यांच्या मित्रमंडळीच्या व कुटुंबियांच्या पोस्टला जास्त दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्ध फेसबुकचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याने यंदा फेसबुकमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांची खुली चर्चा केली आहे.
या बदलांनुसार लोकांच्या मित्र किंवा कुटुंबियांनी शेअर केलेल्या सामग्रीला न्यूज फीडमध्ये अधिक प्राधान्य देणार आहे. तसेच एखाद्या ब्रँड किंवा अन्य पब्लिशर्सच्या सामग्रीला कमी महत्त्व देण्यात येणार आहे. “आतापर्यंत लाईक्स किंवा कॉमेंट्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना बांधून ठेवणाऱ्या साहित्याला फेसबुक महत्त्व देत होते. मात्र आता कंपनीने हे धोरण बदलण्याचे ठरविले आहे,” असे झुकेरबर्गने सांगितले. मात्र फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींवर या बदलांचा कोणताही परिणाम होणार नाही, असे फेसबुकचे उपाध्यक्ष जॉन हेगमॅन यांनी स्पष्ट केले. जगभरातील दोन अब्जपेक्षा जास्त लोक दर महिन्याला फेसबुकचा वापर करत असून हे जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क आहे.
व्हीएस न्यूज - रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी लवकरच जगभर लोकप्रिय ठरलेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या धर्तीवर जिओ कॉईन्स आणण्याच्या तयारीत असल्याचे बिझनेस न्यूजपेपर मिंट च्या रिपोर्ट मध्ये नमूद केले गेले आहे. या योजनेवर मुकेश यांचा मुलगा आकाश याच्या नेतृत्त्वाखाली ५० युवा सदस्यांची टीम काम करत असल्याचेही सांगितले जात आहे. ही टीम ब्लॅकचेन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे.
विशेष म्हणजे जगभरात कांही महिन्यांच्या अवधीत रेकॉर्ड ब्रेक किंमत नोंदविणारे बिटकॉईन सध्या घसरणीला लागले असतानाच रिलायन्स कडून क्रिप्टेाकरन्सी सुरू केली जात असल्याची बातमी आली आहे. बिटकॉईनला सर्वाधिक मागणी असलेल्या दक्षिण कोरियाने बिटकॉईन एक्स्चेंजला टाळे ठेाकण्याची तयारी चालविली असून यामुळे बिटकॉईनच्या प्रतिकॉईन १७ हजार डॉलर्सवर गेलेल्या किंमती वेगाने घसरून १२८०० डॉलर्सवर आल्या आहेत.जगभरातील बहुतेक सर्व देशांचे सरकार लोकांचे आकर्षण बनत चाललेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे सावध झाली आहेत.
भारतात अर्थमंत्री अरूण जेटली व रिझर्व्ह बँकेनेही क्रिप्टेाकरन्सीमधील कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीला सरकार जबाबदार नसल्याचे व हे व्यवहार धोकादायक ठरू शकत असल्याचा इशारा यापूर्वीच वारंवार दिला आहे. तरीही ज्यांना या करन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी ती स्वतःच्या जबाबदारीवर करावी अशा सूचनांही जारी केल्या गेल्या आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002