व्हीएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रा नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असतानाच वर्धा रस्त्यावर चक्काजाम करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी काही काळ अटक करून पुन्हा त्यांची सुटका केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात नागपूरमध्ये मंगळवारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या १ डिसेंबरपासून यवतमाळपासून हल्लाबोल पदयात्रा सुरू केली. पदयात्रेच्या ११ व्या दिवशी ही पदयात्रा सोमवारी नागपूर शहरात पोहोचली. या पदयात्रेचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख करीत होते. या पदयात्रेत जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते होते व शांततेत ते नागपुरात येत होते. या पदयात्रेला नागपूर पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडविले. त्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसले.
सुप्रिया सुळे व अनिल देशमुख पोलिसांशी चर्चा करीत होते. दिंडी शांततेने येत आहे. वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी अडेलतट्टू भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. हल्लाबोल हल्लाबोल अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला. सुप्रिया सुळे यांना अटक केल्यामुळे शांत राहिलेले कार्यकर्ते संतप्त झाले. या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडय़ांची हवा सोडली तसेच पोलिस व्हॅनच्या टपावर चढले. कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी खासदार सुळे व अनिल देशमुख यांची सुटका केली.
आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाजवळ चक्काजाम आंदोलन सुरु केले त्यावेळी महिला पोलिस आंदोलकांना ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार संदीप बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बजोरिया हे यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुप्रिया सुळेंना ताब्यात घेण्याचा महिला पोलीस प्रयत्न करत होते. त्यावेळी बजोरिया यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून जात असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ आवरले.
‘हल्लाबोल’ची जय्यत तयारी
फडणवीस सरकारच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षांकडून काढण्यात येणा-या हल्लाबोल मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - काँग्रसच्या अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. येत्या १६ तारखेला राहुल गांधी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. त्यांच्या निवडीचे महाराष्ट्रात जल्लोषात स्वागत करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील टिळक भवनात राहुल यांच्या निवडीचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’मध्ये जल्लोष करण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी ४ डिसेंबरला अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राहुल यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवार ही शेवटची तारीख होती. राहुल यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. सोनिया गांधी या गेल्या १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी होत्या.
काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एखाद्या व्यक्तीने इतक्या दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्षपद भूषविले होते. मात्र, राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे कधी जाणार, याची चर्चा सातत्याने सुरू होती. लोकसभा निवडणुकांनंतर सोनिया गांधी या प्रकृतीच्या कारणामुळे संघटनेच्या कामकाजापासून दूर राहू लागल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला होता.
लोकसभेनंतर काँग्रेस पक्षाला लागलेल्या पराभवाच्या ग्रहणामुळे राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्यासाठी योग्य मुहूर्त सापडत नव्हता. याशिवाय, राहुल गांधी यांनीदेखील ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, मध्यंतरी अमेरिकेत झालेल्या एका चर्चासत्रात राहुल यांनी आपण निवडणूक लढवण्यास आणि पक्षाचे नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी तयार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल पाहायला मिळाला होता.
गेल्या काही दिवसांपासून ते गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा झंझावती प्रचार करत आहेत. यावेळी त्यांच्या देहबोली आणि भाषणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवत आहे. याच पार्श्वभूमीचा लाभ उठवण्यासाठी काँग्रेसकडून गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या आधीच राहुल यांना पक्षाध्यक्षपदी बसवण्यात आल्याची शक्यता आहे.
व्हीएस न्यूज - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) आपल्या सुमारे १३०० शाखांची नावे आणि IFSC कोड बदलले आहेत. स्टेट बँकेच्या सर्व सहयोगी बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळूरू,चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या शहरांमधील बहुतांश बँकेच्या शाखांच्या नावात हे बदल करण्यात आले आहेत. फस्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.
यासंदर्भात स्टेट बँकेचे प्रबंध निदेशक (डिजिटल बँकिंग) प्रवीण गुप्ता यांनी सांगितले, आमच्या काही जुन्या सहयोगी बँकांच्या शाखांचे भारतीय स्टेट बँकेत विलिनिकरण करण्यात आले आहे. हे विलिनिकरण झाल्याने त्यांच्या IFSC कोडमध्ये देखील बदल झाले आहेत.
गुप्ता पुढे म्हणाले, बँकेच्या ग्राहकांना कोड बदलल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अंतर्गत व्यवहारांसाठी देखील बँकांना नव्या कोडसोबत जोडण्यात आले आहे. त्यामुळे जर कोणी जुना IFSC कोड वापरुन व्यवहार केला तर तो नव्या कोडमध्ये समाविष्ट होऊन जाईल. यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण होणार नाही.
दरम्यान, एसबीआयने गेल्या महिन्यांत गृहकर्ज आणि ऑटो कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात केली होती. गृहकर्जात ०.०५ टक्के कपात केली असल्याने ते आता ८.३० टक्के झाले आहे. तर दुसरीकडे ऑटो कर्जासाठी ग्राहकांना ८.७५ टक्के व्याजदर लागू असणार आहेत. पूर्वी ऑटो कर्जाचे दर ८.७० इतके होते. नवे दर नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
व्हीएस न्यूज – चेकने व्यवहार करणा-यांसाठी एक खूषखबर आहे. आता चेक वटण्यासाठी तीन दिवस वाट पाहण्याची गरज नाही. तो काही तासांतच चेक वटणार असल्याने तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्हाला काढता येणार आहे. चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना हद्दपार होणार असून यापुढे ऑनलाईन पद्धतीने बँकेतले तुमचे चेक खात्यात वळते केले जाणार आहेत. त्यामुळे बँकेत चेक वटण्याचा अवधी कमी होणार आहे.
राज्यांतर्गत चेक असेल तर तो वटण्यासाठी साधारणपणे तीन दिवस लागतात. तर इतर राज्यांतील चेक वटण्यासाठी आठवडा लागतो. याशिवाय आतंरराष्ट्रीय चेक वटण्यासाठी किमान आठवडा जातो. मात्र ऑनलाईन पद्धतीने बँकेतील चेक खात्यात वळते करण्यात येणार असल्याने चेक वटण्याचा हा कालावधी कमी होणार आहे. एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजिटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही चेकचे पैसे काही तासांतच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत.
विशेष म्हणजे या नव्या बदलानुसार आता सायंकाळी ५.३० वाजता जरी बँकेत चेक जमा केला तरी तो तासाभरात वटणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. पोस्टाने येणारा चेकही वटण्यासाठी दहा दिवस लागायचे, आता नव्या बदलानुसार हा चेकही दुस-याच दिवशी वटणार असल्याने बँक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
पंचरंगी लढतीत प्रतिस्पर्धी रवींद्र शोभणे यांचा पराभव
व्हीएस न्यूज - बडोदा येथे फेब्रुवारी २०१८ मध्ये होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या पंचरंगी निवडणुकीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी रवींद्र शोभणे यांना ३५७ मते मिळाली.
बडोदा येथे होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक रविवारी झाली. या निवडणुकीच्या रिंगणात लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, राजन खान, किशोर सानप, रवींद्र गुर्जर हे पाचजण होते. या पंचरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या मराठी साहित्यविश्वाचे लक्ष लागले होते. या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी घवघवीत मते घेऊन बाजी मारली. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता संमेलनाध्यक्ष पदासाठीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली आणि देशमुख विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिका-यांनी केली.
या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषदेने लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर शोभणे यांच्यामागे विदर्भ साहित्य संघ उभा होता. नागपुरातून डॉ. शोभणे आणि डॉ. किशोर सानप अशी दोन नावे असल्यामुळे विदर्भ साहित्य संघाची मते विभाजित झाली आणि त्याचा देशमुख यांना फायदा झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, देशमुख यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
देशमुख यांनी विपुल साहित्य लेखन केले आहे. त्यांच्या ‘पाणी ! पाणी !!’ आणि ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ या कादंबरींना ‘मराठवाडा साहित्य पुरस्कार’ मिळालेला आहे. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर अॅवार्ड आणि महाराष्ट्र शासनाच्या आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. याशिवाय २०१० मध्ये पुण्यात भरलेले दुसरे शासकीय कर्मचारी साहित्य संमेलन, नागपूर येथे झालेले तिसरे परीक्षा साहित्य संमेलन, सांगलीतील पहिले लोकजागर संमेलन आणि नांदेड येथे झालेल्या ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. देशमुख यांची नऊ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
देशमुख यांचा अल्प परिचय-
शिक्षण : एम. एस्सी (केमिस्ट्री), एम. ए. (मराठी साहित्य), एमबीए (पब्लिक पॉलिसी), सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनॅशनल पॉलिसी.
नोकरी : भारतीय प्रशासन सेवा. माजी सनदी अधिकारी
वास्तव्य : मूळ गाव मुरूम (जि. उस्मानाबाद), सध्या मुक्काम- पुणे
देशमुख यांची साहित्य संपदा….
कादंबरी : सलोमी, होते कुरूप वेडे, अंधेरनगरी, ऑक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण
कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, अग्नीपथ आणि मृगतृष्णा
नाटके/ बालनाटके : अखेरची रात्र आणि दूरदर्शन हाजिर हो..
ललितेत्तर साहित्य : प्रशासननामा, बखर भारतीय प्रशासनाची, अविस्मरणीय कोल्हापूर, मधुबाला ते गांधी
संपादित : लक्षदीप (लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य), अन्वयार्थ ( लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम.
इंग्रजी साहित्य : द रिअल हिरो अँड अदर स्टोरीज, अॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस आणि करिष्मॅटीक कोल्हापूर.
हिंदी साहित्य : खोया हुआ बचपन (प्रकाशनाच्या मार्गावर)
स्फूट साहित्य : नाती जपून ठेवा (नातेसंबंधावरील लेखमाला) आणि बी पॉझिटिव्ह (लेखमाला).
व्हीएस न्यूज - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी हे मतदान होत आहे. या ८९ जागांसाठी तब्बल ९७७ उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.
गेली २२ वर्षे सत्तेत असलेला भाजप आणि सरकारविरोधी असंतोषाला बळ देत पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाच्या युवा नेतृत्वाशी संधान बांधणारी काँग्रेस या दोन पक्षांत निर्णायक लढतीची पहिली फेरी रंगणार आहे. एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली आहे. त्या उलट प्राथमिक स्तरावर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसस्याने काँग्रेसचे आव्हान वाढले आहे.
पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघ आहेत. सूरतसारखा महत्त्वाचा भाग असलेल्या दक्षिण गुजरातमधील शहरी भागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सूरतमध्ये १६ जागा असून पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. गुजरातमधील एकूण मते लक्षात घेता भाजपकडे ४७.८ टक्के तर काँग्रेसकडे ३८.८ टक्के मतदार होते. ही नऊ टक्के मतांची दरी कमी करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. गेली २२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपविरोधातील असंतोषाला मतांमध्ये रूपांतरित करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. त्याचवेळी भाजपच्या तगडय़ा ‘पानप्रमुखां’शी त्यांना सामना करावा लागणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘पानप्रमुख’ ही संकल्पना यशस्वी ठरली होती. मतदार यादीत प्रत्येक पानावर साधारण ४० ते ४५ मतदारांची नावे असतात. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पानागणिक एक कार्यकर्ता नेमण्यात आला होता.
तीन महिन्यांत ताबा देण्याचे आदेश
व्हीएस न्यूज – ‘रेरा’ कायद्याला आव्हान देणा-या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याला काही तास उलटत नाही, तोच विक्रोळीतील एका विकासकाला ‘रेरा’ने दणका दिला आहे. ‘महारेरा’अंतर्गत नोंदणी करताना विकासकाने चार वर्षानंतरची तारीख नोंदविली. तक्रारदाराने त्यास आक्षेप घेतला असता ‘महारेरा’ने सुनावणी घेऊन येत्या तीन महिन्यांत ताबा द्या, अन्यथा ग्राहकांनी भरलेल्या रकमेवर व्याज देण्याचे आदेश दिले.
विक्रोळीत ‘बीबीजे सिएना’ या नावे गीताई डेव्हलपर्समार्फत गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तक्रारदार वीरेंद्र पांढरे यांनी ८ फेब्रुवारी २०१३ मध्ये विक्री करारनाम्याद्वारे तब्बल ९० टक्के रक्कम भरली. डिसेंबर २०१५ मध्ये सदनिकेचा ताबा मिळणार होता. ताबा न मिळाल्याने तक्रारदार हैराण झाले होते. या प्रकल्पाची महारेराअंतर्गत नोंदणी करताना ३१ डिसेंबर २०२१ ही प्रत्यक्ष ताब्याची नवी तारीख देण्यात आली होती. प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही सदनिकेच्या ताब्याबाबत लांबची तारीख दिल्यामुळे तक्रारदाराने विकासकाकडे विचारणा केली. तेव्हा त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
भूखंडाचे आरक्षण बघा अॅपवर…
एखाद्या भूखंडावर कोणते आरक्षण आहे, हे पाहण्यासाठी आता विकास आराखडय़ाची शेकडो पाने चाळावी लागणार नाहीत. महापालिकेच्या टउॠट 247 या मोबाईल अॅपवर एक क्लिक केले की संबंधित भूखंडावर कोणते आरक्षण आहे, हे क्षणात पाहाता येणार आहे. या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे हे देशातील पहिलेच अॅप असल्याचा दावा पालिकेने केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांसाठीच्या सेवेसाठी डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यास राज्य सरकारचा नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी या बाबी महत्त्वाच्या असून अॅप व वेबसाइटमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देते येतील. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे अॅप सुरू केल्याबद्दल त्यांनी पालिकेचे कौतुक केले.
व्हीएस न्यूज – वारंवार सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कोणाच्या कानशिलात तरी मारली आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आजची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याची घणाघाती टीका शुक्रवारी केली. दरम्यान, शिवरायांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेलाच धर्मग्रंथ मानून समाजवादी लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घटना तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात स्वाभिमान पक्षाच्या झेंडय़ाचेही अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर राणे यांनी आपल्या महाराष्ट्र दौ-याचा प्रारंभ ऐतिहासिक शाहूनगरीतून केला. दिवसभरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाईचे आशीर्वाद घेतल्यानंतर शिवछत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ज्या ऐतिहासिक दसरा चौकात विजयादशमीला सोने लुटले जाते त्याच चौकात राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विचारांचे सोने वाटले.‘यायला लागतंय’ असे घोषवाक्य घेऊन संपूर्ण करवीर नगरीत झळकलेल्या फलकांवरील आवाहनाला कोल्हापूरच्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि दसरा चौकाचा सारा परिसर तुडुंब भरून गेला होता. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या सभेत राणे यांच्या आक्रमक आणि आवेशपूर्ण विचारांचे सोने लुटूनच करवीरकर नागरिक परिवर्तनाचा संदेश घेऊन परतताना दिसत होते.
राणे यांनी आपल्या आवेशपूर्ण आणि आपल्या स्वभावाला साजेल असेच अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला. वर्तमानपत्रांतून गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोपांना आणि टीकेला त्यांनी उत्तर दिले. विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार ‘प्रहार’ केले.
वारंवार सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करणा-या उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत कोणाच्या कानशिलातही मारली नसेल अशी खिल्ली उडवतानाच उद्धव ठाकरे एखाद्या बँकेच्या मॅनेजर (सुरुवातीला भाषण करताना माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे म्हणजे एखाद्या बँकेचा मॅनेजर वाटतो असा उल्लेख केला होता.) नव्हे तर देवळातला पुजारी वाटतो असे म्हटले. पुजा-याचे लक्ष देवाकडे किंवा भक्ताकडे नसते. तर भक्त किती दक्षिणा टाकतो त्याच्याकडे असते. त्याचप्रमाणे उद्धव महापालिकेतून किती टक्केवारी मिळते, महापौर बंगला आपल्याला कसा बळकावता येईल, आमदारांकडून आपल्याला किती आणि कसे पैसे मिळतील याकडेच त्यांचे लक्ष असते आणि केवळ त्याच्यासाठीच सरकारला वेठीस धरण्याचे काम ते करीत आहेत. सत्तेत असताना जनतेला न्याय मिळवून देण्याचे सोडून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका करतात. सत्तेत राहूनही ते शेतक-यांना न्याय मिळवून देऊ शकत नाहीत, उलट सरकारला वेठीस धरून जनतेची फसवणूक सुरू आहे, असेही राणे म्हणाले.
मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारी शिवसेना आता राहिलेली नाही. उद्धव यांनी मुंबई पूर्ण भकास केली आहे. माझ्यावर आकसाने टीका करणारे उद्धव ठाकरे यांची आजची शिवसेना म्हणजे केवळ टक्केवारी घेणारा पक्ष झाला आहे. मुंबई महापालिका हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास उद्धव ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप राणे यांनी केला.
व्हीएस न्यूज - दाऊद इब्राहिमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरुवात केली आहे. यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाऊदच्या गँगकडून आता थेट महिलांना धमकावूनही पैसे उकळले जात आहेत. यासाठी दाऊद इब्राहिमने गँगमध्ये खास महिलांची विंग तयार करण्यात आली आहे. महिला उद्योजकांना हेरून त्यांची संपूर्ण आर्थिक माहिती काढून ही माहिती या विंगकडून दाऊदला पुरवली जाते. छोटा शकीलच्या उस्मान नावाच्या गुंडाकडे महिला उद्योजकांना धमकवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सूत्र सांगतात. तपास यंत्रणांनी इंटरसेप्ट केलेल्या काही कॉल्सनुसार महिला टारगेट्सचा उल्लेख करण्यासाठी बेगम, क्वीनसारखे कोडवर्ड वापरले जात आहेत.
नुकतीच खार पोलीस ठाण्यात एका महिला उद्योजिकेने दाऊद आणि छोटा शकीलच्या काही गुंडांविरोधात तक्रार नोंदवली आहे. या महिला उद्योजिकेकडे दाऊद गँगने एक कोटींची खंडणी मागितली होती. तसेच न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या तक्रारीनंतर आता दाऊद आणि शकील गँगच्या सर्वच कारवायांवर बारीक नजर ठेवली जात आहे.
व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागचं हेलिकॉप्टरचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाही. आज सकाळी हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. टेक ऑफ झाल्याबरोबर हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं. खानसाम्याला हेलिकॉप्टरमधून उतरविल्यानंतर या हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेनं उड्डाण घेतलं.
आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादला जायला निघाले होते. नाशिकच्या पोलीस परेड मैदानावरून हेलिकॉप्टरने टेक ऑफ करताच उड्डाणात अडचणी निर्माण झाल्याने सर्वच घाबरले. हेलिकॉप्टर वरच्यावर घिरट्या घेऊ लागल्याने त्यात मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याचं लक्षात येताच हेलिकॉप्टरचे तातडीने लँडिंग करण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून खानसामा सतीश याला उतरविल्यानंतर हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतले. या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव प्रवास करत आहेत.
अतिगंभीर ५ कर्मचाऱ्यांना हलवले लातूरला व्हीएस न्युज - परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यातील रसाची टाकी फुटून ९ जण गंभीर भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे . शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हि दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक रसाच्या टाकी फुटली आणि टाकीच्या खालच्या भागातून मोठ्या प्रमाणात उकळता रस बाहेर फेकला गेला. या टाकीत नेहमी १२० डिग्री सेल्सिअस तपमानावर उकळता रस असतो. हा रस अंगावर पडल्याने येथे काम करणारे तंत्रज्ञ आणि कामगार असे ९ जण गंभीर रित्या भाजले. जखमींना तातडीने परळी आणि अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यातील बरेचसे कर्मचारी हे पांगरी परिसरातील आहेत. ज्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले....Read More
व्हीएस न्यूज - लग्नानंतर पतीच्या धर्मामध्ये पत्नीचे धर्मांतर होत नाही आणि तिने पतीच्याच धर्माचे अनुकरण करावे अशी सक्ती करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्पष्ट केले. हिंदू पुरुषाशी लग्न करणाऱ्या पारसी महिलेला‘टॉवर ऑफ सायलन्स’मध्ये प्रवेश देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने वलसाड झोराष्ट्रीयन ट्रस्टला केली आहे.
गुलरोख गुप्ता यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुलरोख या पारसी असून त्यांनी १९९१ मध्ये वलसाडमधील हिंदू पुरुषाशी विवाह केला होता. गुलरोख यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांना ‘टॉवर ऑफ सायलन्स’येथे प्रवेश नाकारण्यात आला होता. ‘टॉवर ऑफ सायलन्स’ ही पारसी समाजाची स्मशानभूमी असते. गुलरोख यांना स्मशानभूमीत जाऊन वडिलांसाठी प्रार्थना करायची होती.
गुलरोख यांनी या प्रकरणात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नानंतर पतीचा धर्मच हाच महिलेचा धर्म होतो, असे म्हटले होते. याविरोधात गुलरोख यांनी शेवटी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिकरी, न्या. ए एम खानविलकर, न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठाने मुंबई हायकोर्टाच्या निकालाशी असहमती दर्शवली. लग्नानंतर महिलेचे तिच्या पतीच्या धर्मात धर्मांतर होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. टॉवर ऑफ सायलन्समध्ये पारसी समाजाच्या बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असा कोणताही कायदा नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकमेकांशी लग्न करु शकतात आणि लग्नानंतरही ते त्यांच्या धर्माचे अनुकरण करु शकतात. त्यामुळे महिलांना पतीचा धर्म स्वीकारण्याची सक्ती करता येणार नाही. तो निर्णय महिलेवरच अवलंबून असेल, असे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने वलसाड झोराष्ट्रीयन ट्रस्टला या प्रकरणात सौम्य भूमिका घ्यावी आणि या घटनेचे गांभीर्य ओळखावे, असे सांगितले. या बाबत आम्ही पुढील सुनावणीला बाजू मांडू, असे ट्रस्टने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002