व्हीएस न्यूज - गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने गावाला मटणाची पार्टी देण्याचा दंड सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जातपंचायतीच्या पाच जणांना अटक केली असून राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
धानोरा तालुक्यातील मोहली येथे राहणाऱ्या पाचवीतील मुलीवीर अनिल मडवी या नराधमाने बलात्कार केला होता. नराधमाने पीडित मुलीला घरी सोडतो असे सांगत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यावर मुलीने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. आई-वडिलांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी हे प्रकरण जातपंचायतीकडे नेले. जातपंचायतीने अनिलला गावाला मटण पार्टी देण्याचा आणि पीडित मुलीला उपचारासाठी १२ हजार रुपये देण्याचा दंड सुनावला. तिकडे उपचार न मिळाल्याने पीडित मुलीची प्रकृती खालावली. आई- वडिलांनी हे प्रकरण पुन्हा जात पंचायतीसमोर आणले. जातपंचायतीच्या पंचांनी आई-वडिलांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.
आई- वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीवर कारवाई झाली. या प्रकरणात जातपंचायतीचाही सहभाग असल्याचे भूमकाल संघटनेने उघड केले. पीडितेवर अन्याय करणाऱ्या जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली. आता पोलिसांनी जात पंचायतीच्या पाच पंचांना अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
व्हीएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी आमदार संदिप बजोरीया यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज पुन्हा सिंचन कंत्राटाच्या अनियमितता प्रकरणात अजित पवार आणि संदिप बजोरीया यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश दिला आहे.
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांची चौकशी का नाही? अशी परखड मौखीक विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी केली होती. तसेच त्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी झाली, यावेळी सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि संदिप बजोरिया यांचे संगनमत आहे की नाही, याबाबत एकाही शपथपत्रात स्पष्टता नसल्याचे सांगत या घोटाळ्याची ही चौकशी संशयास्पद असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अमरावती जिल्ह्यातील जिगाव, निम्नपेढी, भातुकली आणि वाघाडी सिंचन प्रकल्पांचे कंत्राट बजोरीया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या कंपंनीने बोगस कागदपत्र सादर करुन कंत्राट घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या घोटाळ्यात अजित पवार यांच्या राजकीय लाभातून हे कंत्राट बजोरीया कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत नागपूर खंडपीठात ४ जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर बुधवारी आणि गुरुवारी सुनावणी झाली. या सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, त्यांनी आतापर्यंत केलेला तपास, आणि अजित पवार, संदिप बजोरीया यांच्यावरील सरकारची भुमिका, याबाबत २ आठवड्यात शपथपत्र सादर करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
व्हीएस न्यूज - शिवसेनेचे दलाल नाणार प्रकल्पाजवळील जमीन खरेदी करण्यासाठी फिरत असून येथील जनतेला या प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उल्लू बनवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजापूरमधील कात्रादेवी येथील सभेत बोलताना केला.
राणे म्हणाले, की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे सिद्ध करुन दाखवा, राजकीय जीवनातून मी निवृत्त होईल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. मोदी-अमित शहा यांनी हा प्रकल्प आणला, असे खासदार विनायक राऊत सांगतात. पण नाणार कुठे आहे, हे त्या दोघांना माहीत तरी आहे का ? विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आंध्रमध्ये हा प्रकल्प जात होता, तो याच विनायक राऊत यांनी राजापुरात आणला. शिवसेनेला कोकणाने २४ आमदार दिले. पण कोकणाला शिवसेनेने काय दिले? शिवसेना नारायण राणे यांना घाबरते. हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
प्रकल्पाला रामदास कदम यांचा विरोध आहे, तर मग प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला. थापा मारण्याचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाई करत आहेत, तर या प्रकल्पावरुन जनतेला उद्धव ठाकरे उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. १५ दिवसात प्रकल्प रद्द करण्याची भाषा शिवसेनेने केली होती. त्याचे काय झाले असा सवालदेखील राणेंनी यावेळी केला. न्याय मिळेपर्यंत नाणारच्या जनतेसोबत असेन, तुम्ही अशीच एकजूट दाखवा. माझा प्रकल्पाला शंभर टक्के विरोधच असणार असल्याची घोषणा यावेळी नारायण राणेंनी केली.
हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे सांगत यासाठी आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वतः करणार असल्याची हमी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. आपण सरकारकडे या रिफायनरी प्रकल्पाविरोधात दाद मागणार मागणार असून, या प्रकल्पाच्या विरोधातील सर्व मुद्दे घेवून आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या या जाहीर सभेला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
व्हीएस न्यूज – विरोधकांचेही म्हणणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ऐकून घेत होते. पण नरेंद्र मोदी कुणाचोच ऐकून घेत नाहीत, असा गंभीर आरोप पाणीवाले बाबा म्हणजेच राजेंद्रसिंह यांनी अहमदनगरला जलसाक्षरता कार्यशाळेच्या वेळी केला आहे.
२० हजार कोटींची तरतूद मोदींनी स्वच्छ गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केली. पण त्यातील २ टक्केही खर्च करु शकले नाहीत. फार मोठे काम मोदी करतील असे वाटत होते. परंतु त्यांनी सपशेल निराशा केली असल्याचे स्पष्ट मत सिंह यांनी यावेळी मांडले आहे. सिंह यांनी नदीजोड प्रकल्पावरून नाराजी व्यक्त केली. देशाला सध्याच्या नदीजोड प्रकल्पामुळे मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. वाजपेयींना समजाऊ शकत होतो. ते मोठ्या मनाचे आणि विरोधकांचे म्हणणे ऐकून घेणारे होते. मात्र मोदी ऐकतच नसल्याचे सिंह यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यांनंतर त्रिमूर्ती आवारातून पडलेल्या हर्षल रावतेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्या तरुणाला नेण्यात आले. पण डोक्याला जबर मुका मार बसलेल्या हर्षलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ह्या घटनेची माहिती मिळताच मंत्रालयात येऊन घटनेची माहिती घेतली. पाटील यांनी यावेळी मंत्रालय सुसाईड पॉईंट झाला आहे का ? महिनाभरात आत्महत्येच्या प्रयत्नाची ही तिसरी घटना आहे. नेमकी ही घटना का घडली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी केली. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयाकडे जनता न्याय मिळेल या आशेने पाहत असते, पण जनतेला न्याय मिळत नाही. अशा घटना वारंवार घडणे हे सरकारसाठी भूषणावह नाही, या शब्दात सरकारवर टीका केली.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना कळताच घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मंत्रालयात वारंवार आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटना घडत आहेत, याचा अर्थ जनता त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
तावडे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, पैठण तुरुंगात हर्षल रावते हा खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्याने २००३ साली त्याच्या मेव्हणीची हत्या केली होती. तो २०१४ पासून पैठण तुरुंगात शिक्षा भोगत होता. तसेच त्याने आत्महत्या केली की हा अपघात आहे, याचा तपास पोलीस करत असल्याचेही तावडे यांनी सांगितले होते.
व्हीएस न्यूज - राफेल विमान खरेदीविषयक सौदा उघड करण्याच्या कारणावरून देशात वादळ निर्माण झाले आहे. काँग्रेस याप्रश्नी कमालीची आक्रमक झाली असून मोदी सरकारने ही विमाने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजलेत हे जाहीर करावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत एनडीए सरकारने राफेल विमान खरेदीच्या सौद्याची माहिती देण्यास नकार दिला आहे. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारने केलेल्या करारानुसार एका राफेल लढाऊ विमानासाठी ९१ दशलक्ष युरो किंवा ७१७ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. हा ३६ विमानांचा करार असून एकूण २५,८१२ कोटी रुपये भारताला मोजावे लागणार आहेत. तर, यूपीए सरकारच्या करारानुसार एका विमानासाठी ९९ दशलक्ष युरो किंवा ७८० कोटी रुपये मोजावे लागणार होते. त्यामुळे नवीन करारानुसार प्रति राफेल विमान ६३ कोटी रुपये वाचणार आहेत. एकूण ३६ विमानांच्या खरेदीचा विचार करता भारताची नवीन करारामुळे २,२६८ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘इंडिया टुडे’ने सूत्रांचा हवाला देत यासंबंधीचे वृत्त दिले आहे. ‘इंडिया टुडे’ने विविध सूत्रांबरोबर चर्चा करून राफेल विमान सौद्याबाबत माहिती मिळवली. शस्त्रे, सुटे भाग आणि देखभाल खर्चासह ३६ लढाऊ विमानांसाठी २५,८१२ कोटी रुपये खर्च येणार आहे. यूपीए सरकारने केलेला करार कायम ठेवला असता तर सरकारला यासाठी २८,०८० कोटी रूपये द्यावे लागले असते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली. मोदी सरकारने वर्ष २०१५ मध्ये यूपीएचा १२६ विमानांचा करार रद्द केला आणि ३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यूपीए सरकारने केलेल्या करारात अनेक विसंगती होत्या.
उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बेंच मार्क किंमतीचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, अशा निर्णयांना आक्षेप घेणे हा सरकारी प्रक्रियेतील एका भाग असल्याचे एका सूत्राने सांगितले. यूपीएने केलेल्या करारात हिंदुस्तान ऍरोनॉटिकलला तंत्रज्ञान हस्तांतरण करार झाला होता. पण मेटोर मिसाईलचे सुटे भाग आणि देखरेखीचा या करारात समावेश नव्हता. दरम्यान, राफेल विमान खरेदीविषयक सौदा उघड करण्याची काँग्रेसची मागणी म्हणजे देशाच्या सुरक्षेशी गंभीर तडजोड ठरेल, अशी टीका करीत ही मागणी करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकेकाळी संरक्षणमंत्रीपद भूषविलेले प्रणब मुखर्जी यांच्याकडून ज्ञान घ्यावे, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना गुरुवारी लगावला होता. गेली चार वर्षे आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे या करारात भ्रष्टाचार झाल्याचे फसवे ढोल बडवले जात आहेत, अशी टीकाही जेटली यांनी केली. तुम्ही संरक्षण करार जाहीर करता तेव्हा नुसती त्या अस्त्रांची किंमतच जाहीर करीत नाही, तर त्या अस्त्रांची संहारकक्षमताही उघड होते, असे जेटली म्हणाले.
व्हीएस न्यूज - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी हे आता माझेही ‘बॉस’ आहेत, असे सांगत पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षातील ज्येष्ठांना राहुल यांचे ऐकावे असा संदेश दिला. पक्षाच्या भवितव्याच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आपण समविचारी पक्षांसमवेत काम करणार असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. संकुचित राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण करून सरकार अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार घडवीत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.
पक्षाच्या खासदारांनी समर्पित भावनेने, निष्ठेने राहुल गांधी यांच्यासमवेत काम करावे आणि पक्ष मजबूत करावा, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले. आपण पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड केली आहे, त्यांना तुमच्या वतीने आणि आपल्या वतीने शुभेच्छा देत असल्याचे सोनिया म्हणाल्या. राहुल गांधी आता आपलेही बॉस आहेत, त्याबद्दल कोणाच्याही मनात संशय असण्याचे कारण नाही. आपण सर्व जण राहुल यांच्यासमवेतही तेवढय़ात समर्पित भावनेने काम कराल, अशी अपेक्षा असल्याचेही सोनिया म्हणाल्या.
मोदी सरकार हे वास्तवाशी समक्रमित नाही आणि पंतप्रधानांनी लोकसभेत बुधवारी केलेल्या भाषणावरूनच ते स्पष्ट होत आहे, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा या नात्याने आपण पक्षाचे अध्यक्ष आणि अन्य सहकारी यांच्याशी सल्लामसलत करून काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला भीती दाखविण्याचा जो कोणी प्रयत्न करेल. त्याने अमेरिकी लष्करी बळाकडे दुर्लक्ष करू नये, असेही पेन्स यावेळी म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत, असेही ते म्हणाले. अमेरिका आणि जपानचे लष्कर या दोन्ही देशांतील नागरिकांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कोणालाही आव्हान देण्यास सज्ज आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्हाला कोणी आण्विक शस्त्रांची भीती दाखविणार असेल तर त्यांना त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. बुधवारीच पेन्स यांनी उत्तर कोरियावर कठोर र्निबध लादण्याचे संकेत दिले होते.
व्हीएस न्यूज - सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’वरून भारतात रंगलेला वाद थांबला असतानाच आता पाकिस्तानातही ‘पद्मावत’वरून वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात अल्लाउद्दीन खिलजीला खलनायक दाखवून मुसलमानांची प्रतिमा चुकीची रंगविल्याने या सिनेमावर बंदी घालण्यात यावी,अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सेन्सॉर बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वी ‘पद्मावत’ पाकिस्तानात झळकला. मात्र, या सिनेमात मुसलमानांची प्रतिमा चुकीची रंगवल्याचा आरोप करण्यात आल्याने हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. लाहोर न्यायालयाने याचिका दाखल करून घेत पंजाब सेन्सॉर बोर्डाला या सिनेमाचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सिनेमाचं पुनरावलोकन करण्यासाठी बोर्डाने बैठकीचं आयोजन केलं आहे. तशी पत्रही सदस्यांना पाठविण्यात आली आहेत.
‘पद्मावत’मधील दृश्य आणि संवाद ऐकून नंतरच सिनेमावरील बंदीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या आधी भारतातही ‘पद्मावत’ला विरोध करण्यात आला होता. गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या चार राज्यात या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून ठिकठिकाणी जाळपोळही करण्यात आली होती.
व्हीएस न्यूज - भारतीय महिला क्रिकेट टीम मधील वेगवान गोलंदाज ३५ वर्षीय झुलन गोस्वामी हिने तिच्या करियरचा १६६ वा सामना खेळत अस्तात्ना एक दिवसीय सामन्यात २०० विकेट घेऊन विश्वविक्रम नोंदविला आहे. असा विक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारत व द.आफ्रिका याच्यात सुरु असलेल्या आयसीसी महिला चँपियनशिप साठीच्या तीन सामन्याच्या मालिकेत झुलनने द.आफ्रिकेची सलामी फलंदाज लारा वूलवार्तची विकेट घेऊन हा विक्रम नोंदविला आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.
झुलनने २००२ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून २००७ मध्ये ती आयसीसीची सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर म्हणून निवडली गेली होती. २०१७ सालातील ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. एक दिवसीय सामन्यात भारतासाठी २०० विकेट घेण्याची कामगिरी कपिल देव याने सर्वप्रथम १९९१ साली नोंदविली आहे.
व्हीएस न्यूज – निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल,असे सांगत असत आणि खरोखरच आघाडी सरकारपेक्षा हे सरकार वेगळे आहे. मंत्रालयाचे भाजप सरकारच्या काळात ‘आत्महत्यालय’बनले असल्याची घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आपल्या शेतात आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आत्महत्येसाठी ते आता मंत्रालयाच्या दारातही येत आहेत. मंत्रालयाच्या दारात गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
बेरोजगार तरुणांनी, शेतकऱ्यांनी तसेच अन्यायग्रस्त लोकांनी गेल्या तीन वर्षांत मंत्रालयामध्ये न्याय मिळण्यासाठी उंबरठे झिजवले. पण आपल्याला मंत्रालयाच्या दारातही न्याय मिळणार नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसच्या काळातील त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. भाजप गेले तीन वर्षे सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजप सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवाल राज यांनी केला.
मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. राजू आंगळे या तरुणाने त्याच वर्षी नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच एका तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज – गंभीर संकटात देश असताना पकोडे- भजी या चर्चेत सर्वांना गुंतवून ठेवायचे आणि जवानांनी काश्मीरात रोज शहीद व्हायचे. सत्तेत येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली असून उकळत्या तेलातच काश्मीर प्रश्नाचा पकोडा फुटला, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.
काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. जगात पाकिस्तानला एकाकी पाडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. पण भारताची साडी पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी काश्मीरमध्ये रोज सोडत असल्यामुळेच तिरंग्यास मान खाली घालावी लागते, असे शिवसेनेने म्हटले आहे.
हाताबाहेर जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती गेली असून दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहे. या बलाढ्य देशाला सीमेवरील घटना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. पकोडे व भजी तळण्यावर देशात राजकीय चर्चा सुरु आहे. सरकारच्या वतीने पाकला चोख उत्तर देऊ असे रोज सांगितले जाते. मग सरकारला अजून उत्तर सापडत नाही का?, दहशतवाद्यांसमोर काँग्रेसने गुडघे टेकल्याचा आरोप करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले का?, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले का?, असे प्रश्नच शिवसेनेने सरकारला विचारले आहेत. देशातील गंभीर प्रश्नांवरून लक्ष उडावे यासाठी वैचारिक पकोड्यांचे तळणे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाकिस्तानचा पराभव करून इंदिरा गांधी यांनी फाळणी केली. अमेरिका त्यावेळी भारताविरोधात पाकच्या बाजूने होती. आता अमेरिकेसह बहुसंख्य देश मोदींच्या तालावर नाचतात असे सांगितले जाते. पण परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही, असे शिवसेनेने नमूद केले.
व्हीएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट उघडून आक्षेपार्ह ट्विट केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नितीन आत्माराम सिसोदे (वय ३९) याला अटक केली आहे. अंधेरी येथील लोकसरिता अर्पाटमेंटमधील फ्लॅटमधून नितीन सिसोदेला पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनने सुमारे पाच महिन्यांपूर्वी गुगलवरून साराचा फोटो डाऊनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने एक बनावट ट्विटर अकाऊंटही सुरू केले. त्याचबरोबर याच बनावट अकाऊंटवरून त्याने ९ ऑक्टोबर २०१७ रोजी एक ट्विट केले,शरद पवार यांच्याविषयी यामध्ये आक्षेपार्ह लिहिले होते. दरम्यान, त्या कालावधीत सारा ही लंडनमध्ये होती, त्यामुळे सचिनच्या सचिवाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ट्विटर अकाऊंट ज्या मोबाइलवरून काढण्यात आला होता, त्या मोबाइलचा आयएमइआय क्रमांक पोलिसांनी मंगळवारी शोधला. त्यांनी त्यावरून इंटरनेट पोट्रोकॉल (आयपी) अॅड्रेसही शोधला. पोलीस आयपी अॅड्रेसवरून नितीनच्या घरी पोहोचले. अटकेनंतर नितीनला किल्ला न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002