व्हीएस न्यूज - बॉक्स ऑफीसवर संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपट चांगलीच कमाई करत असून मागच्या वर्षी सुपर हिट ठरलेला‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचा रेकॉर्ड या चित्रपटाने तोडला आहे. चित्रपटाने १० दिवसाच्या आतच २०० कोटींचा आकडा पार केला आहे.
‘पद्मावत’ने प्रदर्शित झाल्यानंतर नवव्या दिवशी १६ कोटींची कमाई केली. त्याचबरोबर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने १४ कोटी कमविले होते. अभिनेता रणवीर सिंह पद्मावतच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल खूपच आनंदात आहे. यावर तो म्हणाला, की बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला यश प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मनोरंजनाच्या रुपात चांगले काम केले आहे. कलाकारांचे मनोरंजन करण्यात यश म्हणजेच चित्रपटाचे यश होय. यावर दीपिका पदुकोण म्हणाली, की यावेळी बॉक्स ऑफिसचे कलेक्शन महत्वाचे आहे. चित्रपटाच्या शुटींगसाठी भरपूर पैसे लागले, चित्रपटाची जास्त कमाई होणे महत्वाचे आहे.
व्हीएस न्यूज - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंडर १९ वर्ल्डकप पटकावणारा भारतीय संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर बक्षिसाची उधळण केली असली तरी बीसीसीआयवर प्रशिक्षक राहुल द्रविड नाराज आहे. द्रविड स्वतःला ५० लाख रुपये मिळाले असतानाच सपोर्ट स्टाफला मात्र फक्त २० लाख रुपये दिल्याने नाराज असल्याचे समजते. पण द्रविडचे यावरुन कौतुक होत असून पुन्हा एकदा द्रविडमधील प्रामाणिकपणा आणि खेळाप्रती असलेली भावना याची प्रचिती आली.
बीसीसीआयने अंडर- १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. पण द्रविड यावरच नाराज आहे. द्रविडने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपेक्षा मुख्य प्रशिक्षकाला जास्त रकमेचे पारितोषिक जाहीर केल्याबद्दल नाराजी दर्शवली. सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक दिले पाहिजे, असे द्रविडचे म्हणणे असून दुजाभाव होऊ नये यावर द्रविडने भर दिला आहे. आपले मत द्रविडने बीसीसीआयपर्यंत पोहोचवल्याचे वृत्त आहे. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याने एक टीम म्हणून काम केले आणि भारताला वर्ल्ड कपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. त्यामुळे सर्वांना समान पारितोषिकच मिळाले पाहिजे,अशी द्रविडची भूमिका आहे.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांना भेट देत असून मोदी ११ फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणाऱ्या भारतीयांना मित्रों अशी साद घालताना प्रथमच दिसणार आहेत. हा दौरा फेब्रुवारी ९ ते १२ या दरम्यान असून हा ऐतिहासिक सोहळा मस्कत, ओमान येथे रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींविषयी ओमानमध्ये प्रचंड कुतूहल असून मोदींचे मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधील हे सर्वात मोठे स्टेडियम आहे.
ओमानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी येथे खूपच उत्सुकता असल्याचे म्हटले आहे. मोदी नेहमीच जगभरातील भारतीयांशी संवाद साधण्यासाठी तत्पर असतात आणि जगभरातील भारतीयांना देशाचे राष्ट्रदूत किंवा एकप्रकारे अँबॅसिडर असेच ते संबोधतात असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
मोदींना या दौऱ्यात अबू धाबीमध्ये पहिले मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिला–पूजन समारंभाची व्हिडीओ लिंकही बघायला मिळणार आहे. मोदींसाठी पश्चिम आशियातील हा दौरा या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे.
व्हीएस न्यूज - मुंबईत 2008 साली झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिळालेल्या 4600 बुलेट प्रूफ जॅकेटपैकी एक तृतीयांश जॅकेट महाराष्ट्र पोलिसांनी परत केली आहेत. एके-47 बंदुकीच्या गोळ्यांच्या चाचणीत अयशस्वी ठरल्यामुळे हे जॅकेट परत करण्यात आले आहेत. कानपूर येथील उत्पादन कंपनीकडून तीन टप्प्यांमध्ये हे जॅकेट आले होते. त्यातील 1430 जॅकेट परत करण्यात आले आहेत. ही कंपनी अन्य केंद्रीय सुरक्षा दलांनाही अशा प्रकारचे जॅकेट पुरवते.
‘‘एके-47च्या गोळ्यांच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे आम्ही 1400 पेक्षा अधिक बुलेट प्रूफ जॅकेट उत्पादक कंपनीला परत केले आहेत,” असे अतिरिक्त पोलिस महासंचालक (खरेदी आणि समन्वय) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
पोलिस खात्याने या कंपनीला 5,000 बुलेट प्रूफ जॅकेट पुरविण्याचा आदेश दिला होता. सीमा शुल्क ड्यूटी आणि अन्य शुल्कांसह कंपनीला 17 कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्या बदल्यात 4600जॅकेट खात्याला मिळाले होते. चंडीगड येथील केंद्रीय फोरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा येथे करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सुमारे 3,000 जॅकेट उत्तीर्ण झाले, अशी माहिती अन्य एका अधिकाऱ्याने दिली. मात्र 1,430 जॅकेटमधून चाचण्यांदरम्यान एके-47च्या गोळ्या आरपार गेल्या त्यामुळे ते परत करण्यात आले.
‘‘आम्ही उत्पादकांना नव्या मालातून 1,430 जॅकेट बदलण्यास सांगितले. बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा आणि मानकांसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि आम्ही ते बुलेटप्रूफ जॅकेट तपासणी करूनच घेऊ,’’ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना उत्तर प्रदेश सरकारने आखली असून त्याला उत्तेजनही दिले जाणार आहे. याबाबत माहिती देताना तेथील आयुर्वेद खात्याचे संचालक डॉ. आर.आर.चौधरी यांनी सांगितले, की गोमूत्रापासून आठ औषधे आमच्या विभागाने बनवली असून यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर ती उपयुक्त आहेत. लखनौ व पीलभीत येथे राज्यातील आयुर्वेद विभागाचे दोन औषध प्रकल्प असून गोमूत्र, गाईचे दूध, तूप यापासून औषधे तयार तेथे केली जातात. राज्यात बांदा, झांसी, मुझफ्फरनगर, अलाहाबाद, वाराणसी,बरेली, लखनौ व पीलभित येथे आठ आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आयुर्वेदातील पदवी तेथे दिली जाते. हजारो रूग्ण रोज तेथे उपचारासाठी येत असतात. रोज सातशे ते आठशे रूग्ण लखनौ येथे आयुर्वेद रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये येतात. जर आठ रूग्णालयांची संख्या एकत्र केली तर रोज हजारो रूग्ण उपचारासाठी या रूग्णालयांमध्ये येतात.
चौधरी यांनी सांगितले, की आयुर्वेदाचा गोमूत्र हा एकात्म भाग आहे, गाईपासूनची इतर उत्पादनेही उपयोगी आहेत. यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर गोमूत्रावर आधारित औषधे सध्या आम्ही देतो. त्यांचा वापर विस्तारण्याचा आता विचार आहे. दोनच औषध प्रकल्प ही औषधे उत्तर प्रदेशात तयार करतात त्यामुळे त्यांची संख्या वाढवण्यात येईल. या दोनच सरकारी कंपन्या आहेत,पण गोमूत्रापासून औषधे तयार करणाऱ्या खासगी कंपन्या अनेक आहेत. आयुर्वेद महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणही चालू करण्याचा विचार आहे.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान होण्याची क्षमता लेवा पाटीदार- पटेल समाजात असून ती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात होती, इतिहासाचा धांडोळा घेतल्यावर हे सहज लक्षात येते. पण पात्र माणसाला राजकारणात केव्हा बाजूला सारले जाईल अन् पात्रता नसलेली व्यक्ती पुढे येईल याचा काही नेम नाही. जशी निर्माण करण्याची धमक आपल्यात आहे तसेच ते भस्मसात करण्याचीही असल्याचा गर्भित इशारा भाजपचे नाराज नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांना दिला.
एकनाथ खडसे यावल तालुक्यातील पाडळसे येथे लेवा पाटीदार समाजाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. या समाजाचे तीन आमदार, पाच माजी आमदार, एक खासदार, दाेन माजी खासदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते. शंखनाद करून पाच युवतींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने ३३ वर्षांनंतर हाेणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी सलग ५२ वर्षे समाजाचे कुटुंबनायक पदाची जबाबदारी सांभाळणारे रमेश विठू पाटील यांचा सपत्नीक गाैरव करण्यात आला.
व्हीएस न्यूज - २००१ मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड येथील हिंदू- मुस्लिम दंगलीसंदर्भात कोरेगाव भीमा हिंसाचाराचा सूत्रधार मिलिंद एकबोटे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची पुणे पोलिसांनी शिफारस केली होती. पण तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना तशी कारवाई न करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.
त्यांनी पुणे पोलिसांना त्यावेळची नोटही पत्रकारांना सादर करत एकबोटेवर तेव्हाच कारवाई झाली असती तर कोरेगावात हिंसाचार घडलाच नसता, असा दावाही केला. ‘मुँह मे राम, बगल मे छुरी’ असे शरद पवार यांचे आजपर्यंतचे वर्तन राहिले असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजपशी संबंधित एकबोटे होते, तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असेल अशा कोणत्याही राजकीय आघाडीत भारिप बहुजन महासंघ सामील होणार नाही. त्यामुळेच आपण २६ जानेवारी रोजी निघालेल्या संविधान बचाओ रॅलीत सहभागी नव्हतो, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजुटीचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या प्रयत्नांना खोडा घातला असून काँग्रेस हीच विरोधकांच्या एकतेचा कणा बनेल, असे म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना पर्याय केवळ राहुल गांधीच असू शकतात, असेही पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ‘‘मोदींजीचा पर्याय केवळ आणि केवळ राहुलजी हेच आहेत. अन्य कोणीही होऊ शकत नाही. काँग्रेस आणि देशातील लोक राहुलजींना देशाचा पुढील पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात,’’ असे ते म्हणतात.
‘‘आज दोन मॉडेल आहेत…मोदी मॉडेल यात ते दिवसातून सहा वेळेस कपडे बदलतात, आपल्या कपड्यांची सुरकुतीही बिघडू देत नाहीत, आपल्या वेशभूषेवर शासनापेक्षा जास्त वेळ घालवतात. दुसरे मॉडेल आहे राहुल गांधी यांचे. ते साधेपणा, सरळता आणि स्पष्टतेवर आधारित आहे. राहुल गांधी राजकारणात त्यांची निर्भीडता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेमुळे प्रसिद्ध झाले आहेत. ते कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाहीत,’’ असे ते म्हणाले. विरोधकांच्या एकजुटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘बिजू जनता दल, शिवसेना आणि आता तेलुगु देसम हे पक्ष हळूहळू वेगळे होत आहेत. तर काँग्रेस वेगवेगळ्या पक्षांच्या एकतेचा कणा बनत आहे. ही एकता 2019 मध्ये बदलांचा आधार बनेल.’’
व्हीएस न्यूज - भारत सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या कोट्यधीश व्यक्तींच्या संख्येत गेल्या वर्षी वाढ झाली असून कोट्यधीशांनी देश सोडण्याच्या बाबतीत भारताचा चीननंतर क्रमांक लागला आहे. गेल्या एका वर्षात (2017) भारतातील तब्बल 7,000 व्यक्तींनी आपला कायमस्वरूपी निवास स्थायी निवास (डोमिसाइल) बदलला. आधीच्या वर्षाच्या मानाने ही संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, 2017 मध्ये 7,000 कोट्यधीशांनी अन्य देशात स्थलांतर केले. वर्ष 2016 मध्ये ही संख्या 6,000 आणि 2015 मध्ये 4,000 होती. जागतिक पातळीवर चीनमधील 10,000 कोट्यधीशांनी2017 या एका वर्षात अन्य देशांत घर केले. देश सोडणाऱ्यांपैकी भारतीय कोट्यधीशांनी अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांना पसंती दिली आहे, तर चिनी कोट्यधीशांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला निवास करणे पसंत केले आहे. अन्य देशांतील श्रीमंतांनी अन्यत्र स्थलांतर करणाऱ्यांमध्ये तुर्कीतील 6,000, ब्रिटनमधील 4,000, फ्रान्समधील4,000आणि रशियातील 3,000 कोट्यधीश व्यक्तींनी आपला देश सोडला आहे.
व्हीएस न्यूज - करणी सेना आणि इतर राजूपत संघटनांकडून ‘पद्मावत’ चित्रपटाला होणारा विरोध, चित्रपटावर मेवाडच्या राजघराण्याकडून असणारी नाराजी यासोबतच ‘पद्मावत’पुढे अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे आणखी एक आव्हान होते. पण ऐनवेळी ‘पद्मावत’साठी अक्षय कुमारने एक महत्त्वाचा निर्णय घेत या चित्रपटाच्या वाटेतील एक अडथळा दूर केला.
अक्षयने ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत होण्यासाठी त्याचा बहुचर्चित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ‘पद्मावत’नंतर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. अक्षयने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख भन्साळींच्या बिग बजेट चित्रपटाचे महत्त्व आणि त्यांनी आतापर्यंत सामना केलेल्या अडचणींचा आढावा घेत बदलली. अक्षयने हा निर्णय मोठ्या मनाने घेतला आणि त्याला पाहून भन्साळीही भारावले. ‘पद्मावत’च्या यशामध्ये अक्षयने मनापासून शुभेच्छा देत त्याने एक प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावली असे म्हणायला हरकत नाही. आता भन्साळी एका वेगळ्या मार्गाने त्याच्या याच उपकारांची परतफेड करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात अक्षयसोबत एका चित्रपटावर भन्साळी काम करणार असून याद्वारे ते त्याच्या उपकारांची परतफेड करणार आहेत. दरम्यान, ९ फेब्रुवारीला अखेर ‘पॅडमॅन’च्या रुपात अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
व्हीएस न्यूज - भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ शेतकऱ्यांसाठी विशेष क्रेडिट कार्ड सादर केले आहेत. सध्याच्या किसान क्रेडिट कार्ड्सच्या (केसीसी) विपरीत नवीन एसबीआय कार्ड शेतकऱ्यांना कमी व्याज दराने 40 दिवसांची मुदत मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड्समध्ये कर्जाची रक्कम लगेच खात्यातून डेबिट केली जाते.
सध्या, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 40 दिवसांचे क्रेडिट मिळणार आहे. तसेच इतर एसबीआय कार्डांपेक्षा या कार्डवर व्याजाचे दर कमी असतील. कार्ड धारकांना या कार्डवरील क्रेडिट मर्यादेपैकी सुमारे 20टक्के रक्कम ग्राहकोपयोगी वस्तूंवर खर्च करता येईल, तर 80 टक्के रक्कम शेती उत्पादनांसाठी वापरण्याची मुभा असेल. या योजनेअंतर्गत 100 अर्ज अगोदरच प्राप्त झाले आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षांनी दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002