व्हीएस न्यूज - शिवसेनेने केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थ संकल्पावरून समाचार घेतला असून जुनीच स्वप्ने आणि जुन्या घोषणा अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पात असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेची कासवछाप अगरबत्ती मोदी सरकारच्या एककल्ली आणि आततायी धोरणामुळेच झाल्याची टीका करतानाच केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा स्वप्नांचाच भुलभुलैय्या देशातील जनतेसमोर ठेवला असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ग्रामीण भागातील जनता दुरावत असल्याचे गुजरात निवडणुकीतून सरकारच्या लक्षात आल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर भर देण्यात आला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही शिवसेनेने लक्ष वेधले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात १० वर्षांत जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापेक्षा जास्त आत्महत्या गेल्या साडेतीन वर्षांत झाल्या आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीचे आकडे सरकारने मिरवावेत, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल हा अर्थसंकल्प काहीच सांगत नाही, असे म्हटले आहे. ‘महागाई’ या शब्दाचा उल्लेखही अर्थसंकल्प मांडताना केला नाही. काँग्रेसचे सरकार तीन वर्षांपूर्वी महागाईच्या आगीत जमीनदोस्त झाले. देशातील जनता नवे सरकार महागाई आटोक्यात आणेल आणि आपले जीवन सुसह्य होईल अशी भाबडी आशा बाळगून होती, पण जनतेच्या नशिबाचे भोग मागच्या पानावरून पुढे सुरूच राहिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..!’ असा हा अर्थसंकल्प असल्याचा चिमटा सेनेने सरकारला काढला आहे.
व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासकामांच्या बाबतीत रोज नवे आकडे देत आहेत. रतन खत्रीकडे ते काय कामाला होते का?, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतले.
पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. मोदींचे हे शेवटचे बजेट आहे. तेवढ्या वेळात आज आपला हिशोब आटोपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. त्यांनी यावेळी बोलताना अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. शाहू, फुले,आंबेडकरांचे नाव निवडणूक जिंकण्यासाठी घेतले जाते. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून पुढाऱ्यांनी वाटोळे केल्याचेही राज म्हणाले.
व्हीएस न्यूज - परराष्ट्र मंत्रालयाने अवघ्या तीन दिवसात तात्काळ पासपोर्ट हाती देण्याची सुविधा केली असून परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ पासपोर्टसाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्याकडून सत्यप्रत प्रमाणपत्र आणण्याची अट शिथील केली असल्यामुळे तुम्हाला आता तिसऱ्या दिवशी तात्काळ पासपोर्ट मिळू शकेल. साधारण ३ हजार ५०० रुपये तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी मोजावे लागणार आहेत.
तुम्हाला आधार कार्डासोबत नियमाप्रमाणे ठरलेल्या विविध १२ प्रमाणपत्रांपैकी कोणत्याही दोन प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट तयार होऊन पोलिस रिपोर्ट मागवण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने अकुशल कामगारांना केशरी पासपोर्ट देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टचे शेवटचे पान कोरे ठेवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज – गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा अभिनेता संजय दत्त याला तुरुंगातून लवकरच सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची आठ महिने लवकर सुटका करण्यात आली होती. उच्च न्यायालयात या सुटकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आज न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. यावेळी यासंदर्भातील गृह खात्याच्या निर्णयाची कागदपत्रे राज्य सरकारने न्यायालयात सादर केली. यावरून कोणाताही दुजाभाव संजय दत्तला तुरुंगातून लवकर सोडताना केला नाही, हे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
आम्हाला कोणताही विरोधाभास गृहमंत्रालयाने सादर केलेली कागदपत्रे आणि राज्य सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणात आढळलेला नाही. नियमांचे उल्लंघन किंवा अधिकारांचा गैरवापर झाल्याचेही यामध्ये दिसत नसल्याचे सांगत ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पण यावेळी न्यायालयाने भविष्यात कैद्यांची पॅरोल किंवा फर्लो रजा मंजूर करताना गरज लक्षात घेऊन आणि पारदर्शक धोरणाचा अवलंब करावा, असे सांगितले.
व्हीएस न्यूज - काँग्रेसने भाजपला राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसने येथे लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा जिंकली आहे.
मतमोजणी सकाळी सुरु झाली तेव्हाच काँग्रेसने आघाडी घेतली होती. काँग्रेसने अजमेर आणि अलवर लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडी घेतली होती. तर भाजपने मांडलगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकले होते. पण तेथेही काँग्रेसने बाजी मारली आहे. दरम्यान, राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता असल्यामुळे भाजपचा हा पराभव म्हणजे जोरदार धक्का आहे.
या तीन ठिकाणी भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. त्याची आज मतमोजणी सुरु झाली. राजस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता होती. तर दुसरीकडे काँग्रेसने आधीच विजयाचा दावा केला होता आणि तो दावा त्यांनी निवडणूक जिंकून खरा केला आहे.
अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव (४० हजार मतांनी) तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रघु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत झाली. २०,६४८ मतांनी रघु शर्मा विजयी झालेत. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.
व्हीएस न्यूज - फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने आपल्या वेबसाईटमध्ये केलेल्या सुधारणांमुळे लोक या साईटवर कमी वेळ घालवत आहेत. खुद्द झुकेरबर्गनेच ही कबुली दिली आहे. फेसबुकच्या सामग्रीत केलेले बदल हे दर्शवितात, की वापरकर्त्यांनी या सामाजिक नेटवर्कवर खर्च केलेल्या एकूण वेळेत5टक्के घट झाली आहे, असे फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या झुकेरबर्गने गुंतवणूकदारांना सांगितले.
कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा कमाई अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला. या अहवालासोबत प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात झुकेरबर्गने म्हटले आहे,की “एकूणच आम्ही जे बदल केले त्यामुळे फेसबुकवर प्रत्येक दिवशी सुमारे 5 कोटी तास कमी खर्च करण्यात आले.”
न्यूज फीडमध्ये कमी व्हायरल व्हिडीओ प्रदर्शित करण्याच्या निर्णयामुळे घट झाली आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिका आणि कॅनडामध्ये दैनिक वापरकर्त्यांमध्येही फेसबुकने पहिल्यांदाच घट नोंदविली आहे. या भागात मागच्या तिमाहीत 18 कोटी 50 लाख वापरकर्ते होते, ते या तिमाहीत 18 कोटी 50 लाखापर्यंत कमी झाले आहेत. या महिन्यात फेसबुकने वापरकर्त्यांना न्यूज फीडमध्ये ब्रँड व प्रकाशकांच्या मजकुरापेक्षा मित्रांकडून अधिक माहिती दाखविण्याची घोषणा केली. विशेषतः वापरकर्त्यांनी टिप्पणी किंवा शेअर न करता पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सामग्रीवर झुकेरबर्गचा कटाक्ष होता.
व्हीएस न्यूज - टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब असून कर्णधार विराट कोहलीचेही भारताच्या विजयात मोठे योगदान होते. ११९ चेंडूत त्याने ११२ धावांची खेळी केली.
या शतकासोबतच मोठ्या विक्रमाची बरोबरी विराटने केली असून त्याने कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली. कर्णधार या नात्याने गांगुलीच्या नावावर १४६ सामन्यात ११ शतके आहेत. तर हा आकडा विराटने ४४ सामन्यातच गाठला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांच्याही नावावर कर्णधार या नात्याने प्रत्येकी सहा शतके आहे.
व्हीएस न्यूज - भारतात बिटकॉईन सारखे चलन चालणार नाही आणि त्याचबरोबर भारतात बिटकॉईन संपूर्णपणे बेकायदा असून काळा पैसा साठवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
जगभरात सर्वात महागडे चलन म्हणून बिटकॉईन हे चलन ओळखले जाते. बिटकॉइन हे चलन ऑनलाइन गेमिंग क्विझ पूर्ण केल्यानंतर मिळते. वित्तीय व्यवहारांसाठी बिटकॉईन हे सर्वात जलद आणि कार्यक्षम चलन मानले जाते. दरम्यान जगभरातील कम्प्यूटर्समध्ये व्हायरस पाठवूनही खंडणी मागण्याचे काम बिटकॉइन मार्फत केले जात आहे. त्यामुळे अनेकांना याचा धोका पत्करावा लागला आहे.
बिटकॉईनचा काळा पैसा, हवाला घोटाळा, ड्रग्सची खरेदी, कर चुकवणे आणि दहशतवादी कारवायांमध्ये अतिवापर झाल्याने बिटकॉईन चलन चर्चेचा विषय झाला आहे.
व्हीएस न्यूज - इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांच्या निर्मितीचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून सुरू असतानाच तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे बुधवारी खडबडून जागे झालेल्या शिक्षण मंडळाने मुंबईतील दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
प्रकाशनापूर्वीच इयत्ता दहावीची विज्ञान आणि तंत्रज्ञान : भाग १ व २ या विषयांची पुस्तके पुणे आणि इतर शहरात व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली. मंडळाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली प्रत व मंडळाची प्रत याबाबत तपास करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासण्याबाबत दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय सायबर शाखेलादेखील या प्रकरणाचा तपास करण्याविषयी कळवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच नेमके काय घडले याविषयी ते छडा लावतील. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक सुनील मगर यांनी दिली.
व्हीएस न्यूज – एकनाथ खडसे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने दिले असून आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय खडसेंनी घेतला असून त्यांनी सून रक्षा खडसेंसह राहुल गांधी यांची भेट घेतली. या प्रसंगी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
एकनाथ खडसे राज्यात दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या अगोदरच वाजतगाजत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही वृत्तात करण्यात आला. एकनाथ खडसे २९ जानेवारीला दिल्लीला रवाना झाले. विमानात त्यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण हे देखील होते. रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खडसे कुटुंबीय मुक्कामी होते. खडसेंनी ‘सामना’च्या वृत्ताबाबत बोलताना हे वृत्त फेटाळले आहे. विमानतळावर पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश या दोघांची योगायोगाने भेट झाली, असे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना या अर्थसंकल्पामुळे आणखी विस्तारित झाली आहे. नवभारताच्या निर्मितीचा संकल्प सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून त्यातून शेतकरी, गरीब, महिला,युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे दोन दशकांची किमान आधारभूत किंमतीसंदर्भातील (एमएसपी) शेतकऱ्यांची मागणी आज पूर्ण झाल्याने हा एक ऐतिहासिक क्षण असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट एमएसपी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जास्तीच्या बाजारपेठा उपलब्ध करण्यासह शेतीक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादनास चालना देण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. सिंचन प्रकल्पांसाठी राज्य सरकारने नाबार्डच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचीही पूर्तता करण्यात आल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यासाठी मी मोदी, जेटली आणि नितीन गडकरी यांचा अतिशय आभारी आहे.
मुंबईच्या लोकल रेल्वे वाहतुकीला अधिक भक्कम करण्यासाठी ४० हजार कोटींची भरीव तरतूद ही मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंददायी असून इतका मोठा निधी आजवर कधीही मुंबईला प्राप्त झालेला नव्हता. १० कोटी लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न झाला आहे. यात ७ कोटी महिला आणि ५ कोटी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आहेत. त्यात आणखी ३ कोटी अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002